५४वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा पनवेलमध्ये सुरू
समाजातील रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, भोंदुगिरी यावर सडकून टीका करणारे आणि डों. नरेंद्र दाभोळकरांची हत्त्या करणार्यांना शोधू न शकलेल्या पोलिस प्रशासनाचे बुरखे फाडणारे ‘दाभोळकरचे भूत’ सोमवारी (१६ फेब्रुवारीला) राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सादर झाले.
पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात ५४व्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीची सुरुवात सोमवार (१६ फेब्रुवारी)पासून झाली. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे पहिले पुष्प ‘दाभोळकरचं भूत’ या नाटकाद्वारे गुंफले गेले.
ज्या भूतखेताच्या नावाने सामान्य माणसांना फसवणारेभोंदू बाबा ‘दाभोळकरांच्या भुता’ला कसे घाबरतात, याची प्रचिती या नाटकातून करून देण्यात आली. शेडमाके नावाच्या नववी पास पोलिस. लहानपणापसून घरात गाडगे महाराजांची विचारसारणी असलेल्या शेडमकेला दाभोळकरांची हत्त्या जिव्हारी लागते आणि ते दाभोळकरांप्रमाणे भोंदुगिरीचा पंचनामा करतात. ते बोलले तर आपले पितळ उघडे पडेल या भीतीने शेडमाकेंवर काय काय दबाव आणले जातात याची गोष्ट प्रभावीपणे या नाटकात विणली आहे.
वर्ध्याच्या अध्ययन भारतीने सादर केलेल्या या नाटकातील संवादांना, कलावंतांच्या अभिनयाला रसिकांनी दिलखुलास दाद दिली. श्याम पेठकर लिखित आणि हरिष इथापे दिग्दर्शित या नाटकात पोलिस जमादार शेडमाकेची भूमिका साकारणारे राजा भगत आणि शेडमाकेच्या पत्नीची भूमिका वठवणा:या मंजुषा भांडने त्यांच्या वाटय़ाला आलेल्या महत्त्वाच्या संवादांची प्रभावी गुंफन करून रसिकांच्या मनात आपले घर बांधले. त्यांच्यासोबतच ठाणोदार दंडवतेची भूमिका वठवणारे रूपराव कामडी, तस्करे साकारणारा प्रशांत नेतनराव, अविनाश हलुले (येरपुडे), राम तांबडी (ठोकळे), मधु जोशी (अण्णा), अरविंद बाभळे (आमदार) यांनी आपापल्या भूमिका ताकदीने रंगवून रसिकांचे कौतुक कमावले. सुशील ससाने, अमित मडे, अनिरुद्ध चौथमल, अमर इमले, प्रवीण तेलंग, प्रीति मख, संहिता इथापे, विनोद बांगडकर, कल्याणी उपाध्याय, विवेक कदम, अमित डांगे आदी कलावंतांनी छोटय़ा भूमिका साकारून मोठी मदत केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांची पुण्यात हत्या झाली. त्यांचे मारेकरी शोधण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. त्या शोधमोहिमेचा पंचनामा करणारे हे नाटक आहे.
भूताचे भय दाखवून सामान्य माणसांना लुबाडणारे ढोंगी बुवा, बाबा काही कमी नाहीत. त्याच्या या ढोंगीपणाचे बुरखे फाडून, विचारांची लढाई विचारानेच लढली पाहिजे, माणसाची हत्या करून माणूस संपतो, पण विचाराची हत्या होत नसते, यासारखे असंख्य विचारप्रवाह या नाटकातून रुजवण्याचा प्रमाणिक प्रयत्न वर्ध्याच्या रंगकर्मींनी केला. त्याला यथोचित दाद देत पनवेलकरांनी त्या विचारांचा सन्मान केला.
नाटक सादर करण्यासाठी पडद्यामागच्या कलावंतांनीही हे नाटक रसिकार्पयत पोहचवण्यासाठी मोलाची भूमिका वठवली आहे. त्यात चैतन्य आठलेचे नेपथ्य, मिथून मित्रची प्रकाशयोजना, सुहास नगराळेचे संगीत, मीनल इथापेचे रंगभूषा आणि श्वेता क्षिरसागरची वेशभूषा महत्त्व सांगून गेली.