नाटकाच्या निवडीपासून ते रंगमंचावर सादर करण्यापर्यंतचा एक देखणा प्रवास म्हणजे ठाण्याच्या अखिल भारतीय नाट्य परिषदने सादर केलेले ‘मस्तानी’ होय.
पनवेलमध्ये सुरू असलेल्या ५४व्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मंगळवारी अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेने ‘मस्तानी’ नाटक सादर केले. या नाटकात मस्तानीच्या सौंदर्यासोबतच तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या पराक्रमाची गाथा सांगण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
मुळात हे नाटक एका नाटय़संस्थेच्या नव्या नाटकाच्या तयारीतून आकार घेत जाते. त्या संस्थेचे प्रमुख त्यांच्याच संस्थेतील विशाखाला राज्य नाटय़ स्पर्धेसाठी नाटक निवडून, त्याचे दिग्दर्शनही करायला सांगतात.त्यासाठी संस्थेतील कलावंतांची एक मिटिंग विशाखा बोलावते आणि तिथूनच नाटकाला सुरुवात होते.त्यामुळे ही कलाकृती नाटय़निर्मितीतल्या नाटय़ावर वेगवेगळ्या पद्धतीने भाष्य करणारी आहे. कलावंतांचा उत्साह, हेवेदावे, रुसवे–फुगवे यांसह हौशी रंगकर्म्ीचे भावविश्व सांगणारी ही कलाकृती आहे.
क्षितीज झारापकर लिखित आणि दुर्गेश आकेरकर–अनिरुद्ध देशपांडे दिग्दर्शित ‘मस्तानी’तील सर्व कलावंतांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या. सुमारे २५ कलावंतांच्या ताफ्यात प्रत्येकाने त्यांच्या वाटय़ाला आलेले काम समर्थपणे पेलण्याचा प्रयत्न केला. हौशी कलावंतांना नाटक करण्याची असणारी हौस,काम मिळत नसल्याचे दु:ख, अनुभवी कलावंतांना वारंवार मिळणारे काम आणि नवख्यांना नेहमी मारावी लागणारी ‘प्रॉग्झी’ असे अनेक कंगोरे या नाटकात येतातच. ऐतिहासिक नाटकात महत्त्वाच्या व्यक्तिरेखेचा बारकाईने अभ्यास करण्याचे सूत्रही हे नाटक सांगू पाहते. त्यावर चर्चा, वाद–विवाद आणि त्यात असणाऱ्या प्रत्येकाच्या सहभागावर हे नाटक बोलते. हे इन्व्हॉलमेंट नाटय़निर्मितीसाठी कसे पोषक ठरते, याचीही गरजही हे नाटक सांगते. त्या इन्व्हॉलमेंटमधली गंमत, कलावंतांचे सहकाऱ्यांसोबत तयार होणारे नाते, त्या भावबंधांना गुलाबी छटांची झालर लावून नाटकाला आकर्षक करण्याचाही प्रयत्न केला आहे.
नाटकाचे नाव ‘मस्तानी’ असले तरी, ही भूमिका वठवणाऱ्या जान्हवी किल्लेकरच्या वाटय़ाला मोजकेच प्रसंग आलेत. त्यातील मोजक्या संवादांचे सोने करण्याची किमया तिने साधली. नाटकाच्या केंद्रस्थानी असणारी विशाखाची भूमिका साकारणारी विशाखा दरेकर, अजित शिंदे(अजित–पहिला पंत), स्मिता करमकर (मम्मी–राधाबाई), रेश्मा जाधव (रेश्मा–काशीबाई), अनूज ठाकरे (अनूज–संगीतकार), प्रशांत गुरव (प्रशांत–पहिला बाजीराव), विपूल मेहूणकर (विपूल–दुसरा बाजीराव), किरण जाधव (किरण–चिमाजी अप्पा), नीरज रानडे (नीरज–मोरशेठ), अनिकेत दिघे (अनिकेत–पुरंदरे), प्रसाद पेडणेकर (प्रसाद), निनाद (निनाद –मल्हारराव होळकर), संध्या धोंडे (संध्या–दासी), सुनील गावडे (सुनील–शाहू महाराज),किरण राजपूत (किरण), प्रियंका पवार (प्रियंका–बसंती), आकाश देवकर (आकाश–दुसरा पंत), अक्षया हिंदळकर (अक्षया),नवीन कदम (नवीन), प्रणव कुळकर्णी (प्रणव) सागर साळवे (सागर), मनोज गायकवाड (मनोज) युवाराज तजाणे (युवराज) या साऱ्यांनी आपाल्या भूमिकांना यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यातही नितीन पवारने त्याच्या वाटय़ाला आलेल्या बॅकस्टेज आर्टिस्टची भूमिका यादगार ठरवण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद ठरले.
या नाटकात काही प्रसंग ऐतिहासिक असल्याने कलावंतांची रंगभूषा (शरद सावंत) आणि वेशभूषे (धनश्री आष्टेकर)ला खूप महत्त्व होते. त्यासाठी शरद आणि धनश्रीने त्या–त्या व्यक्तिरेखांना पेश करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवली आहे. विलास जाधवचे नेपथ्य, दिनेश धुरींचे संगीत आणि भूषण देसाईची प्रकाशयोजना या नाटकाला अपेक्षित उंची देण्यासाठी साजेशा ठरल्यात.