‘परवाना’द्वारे गुंफले राज्य नाटय़ स्पर्धेचे सहावे पुष्प
लहानपणी प्रत्येकाने गोष्टी, कथा ऐकलेल्या असतात. त्या स्फुर्तीदायी, प्रेरणादायी आणि जगण्याची वाट दाखवणाऱ्या असतात.मानवी मूल्ये जोपासून राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या आणि आपल्या मातीशी इमान राखण्याची जाणीव करून देणाऱ्याही असतात.‘परवाना’च्या अब्बूनेही अशीच एका छोटय़ा मुलीच्या पराक्रमाची गोष्ट तिला वारंवार ऐकवली होती. त्या गोष्टीच्या संस्काराने विपरित परिस्थितीशी लढाई करण्याची ताकद सांगणारे नाटक म्हणजे ‘परवाना’!
राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहावे पुष्प पुण्याच्या ‘ध्यास’ने ‘परवाना’ या नाटय़कलाकृतीद्वारे गुंफले. तालिबाण्यांच्या दहशतीने अफगाणीस्थानमध्ये स्त्रियांच्या कोंडलेल्या श्वासाची गोष्ट या नाटकात सांगितली असून, भयकंपीत करणाऱ्या परिस्थितीत ‘परवाना’ नावाच्या एका मुलीने केलेला संघर्ष रसिकांची मने जिंकणारा ठरला.
डेबोरा एलिस यांची ‘द ब्रेडविनर’ ही गाजलेली कादंबरी. या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी केला असून, त्या कादंबरीवर श्रीकांत भिडे यांनी हे नाटक लिहिले आहे. युद्धाच्या काळात अफगाणीस्तानातील स्त्रियांवर प्रचंड बंधणे लादली गेलीत. कुटुंबातील माणसे मारली गेलीत. घरात पुरुष नाही आणि एकटय़ा–दुकटय़ा स्त्रिायांना घराबाहेर पडण्याची मनाई. अशा परिस्थितीत जगायचे कसे, दैनंदिन गरजा भागवायच्या कशा, अशा असंख्य प्रश्नांनी अफगाणीस्थानातील महिलांना छळले होते. त्याच प्रश्नाची गुंतागुंत आणि त्यातून ‘परवाना’चा संघर्ष ताकदीने मांडला गेला.
शीर्षकांकित ‘परवाना’ची भूमिका वठवणारी श्रुती अत्रेने आपल्या अभिनयातून या संघर्षाला टोकदार केले आहे. आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवून तिने रेखाटलेली ‘परवाना’ रसिकांच्या मनात घर करणारी ठरली आहे. याशिवाय अम्मीची भूमिका वठवणारी यशदा फराटे, अंगद पटवर्धन(अब्बू), तेजस्विीनी बर्वे (नूरिया), रसिका कुलकर्णी (मरियम), ऋतुजा गद्रे(शौझिया), प्राजक्ता पांढरे (वीरा) यांच्यासह विनोद चव्हाण, संतोष वेलंगे,श्रीधर पाटील, श्रेयस देरे, ओंकार रेगे, अक्षय मांडे, हर्ष वाघमारे, दिनेश इंगोवले, रूपाली वैद्य आदी कलावंतांनी आपापल्या भूमिकांना यथोचित न्याय दिला आहे.
तांत्रिक बाबीही नाटकाची गोष्ट रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मोलाच्या ठरल्या. ही गोष्ट अफगाणीस्थानातील काबुलमध्ये घडत असल्याने नेपथ्यरचना महत्त्वाची बाजू होती. त्याचबरोबर अफगाणी लोकसंस्कृती दाखवण्यासाठी रंगभूषा आणि वेशभूषेला या नाटकाच्या कथानकानुसारच अपेक्षित होत्या. या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी पडद्यामागच्या कलावंतांनी मेहनत घेतल्याचे जाणवले. नेपथ्य आणि प्रकाशयोजना दिग्दर्शक श्रीकांत भिडे यांनी केली असून, पार्श्वसंगीत आकाश करवंदे याचे होते. रंगभूषा आशीष देशपांडे तर रंगमंच व्यवस्था सागर धुमाळ, प्रवीण कवितके, शिवलंग नागटिळक, राहुल पिल्ले, गणेश कांबळे यांनी सांभाळली.