पुण्याच्या ‘आमचे आम्ही’ने गुंफले नववे पुष्प
पनवेलमध्ये सुरू असलेल्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुरुवारी पुण्याच्या ‘आमचे आम्ही’ या संस्थेने मराठी–कानडी वादावर झगडणाऱ्या माणसांची गोष्ट ‘रानभैरी’ या कलाकृतीच्या माध्यमातून सांगत प्रेमकथा फुलवली.
पनवेलमधील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात सुरू असलेल्या या स्पर्धेत ‘रानभैरी’द्वारे नववे पुष्प गुंफणाऱ्या प्रभाकर पवार लिखित आणि दिग्दर्शित या नाटक महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन राज्यांच्या सीमावादावरून जनतेची होणारी होरपळ मांडण्यात आली आहे. त्याच सीमेवर आकाराला येणारी एक प्रेमकथा या नाटकात गुंफली आहे. देशातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या समस्या आहेत. माणसे झगडत आहेत. तो वाद चेतवला जातो. पेटवला जातो. माणसेच माणसाच्या जिवावर उठतात. तसाच वाद महाराष्ट्र–कर्नाटकाच्या सीमेवर वर्षानुवर्षापासून धगधगतो आहे. याच वादावर हे नाटक भाष्य करणारे आहे.
या नाटकात बनीची भूमिका साकारणारी अमृता ओंबळे, प्रभाकर पवार(पिल्या इंजिन्येर), मोहित जट्टे (दौल्या), सुहास जोशी (मुथ्या) यांनी आपल्या अभिनयाद्वारे नाटकाची गोष्ट रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यासोबतच जुबेन शेख (शित्या), प्रशांत म्हसवडे(भालचंद्र रेड्डी), सौरभ साळवणे (बेळगाव इन्स्पेक्टर), अमृता नावडकर(कनी), सचिन बहिरगोंडे (कन्नड इन्स्पेक्टर), प्रदीप पगारे (बालप्पा)यांच्यासह सचिन भाट, शुभम सोनावणे, रवी सांडभोर, सेल्विन नदार,स्वराज शिंदे आदी सहकलाकारांनी साथ देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
कथानकानुरूप लागणारे नाटकाचे नेपथ्य सचिन बहिरगोंडे यांनी केले असून, अक्षय यादव (प्रकाशयोजना), राजू भोसगे (संगीत संयोजन), मनोहर जुटावकर (रंगभूषा),उर्मिला ओंबळे (वेशभूषा) यांनी तांत्रिक जबाबदाऱ्या आपापल्या परिने यथोचित करण्याचा प्रयत्न केला.