मुंबईच्या कलावंतांनी सादर केलेली कलाकृती
‘प्यादी’ नावाने अंतिम फेरीत सादर झालेला हा दुसरा प्रयोग. पहिल्या प्रयोग रत्नागिरीच्या कलावंतांनी सादर केल्यानंतर जवळपास त्याच प्रयोगाचा पुनर्प्रत्यय पनवेलकर रसिकांनी घेतला. मनोहर सुर्वे लिखित या नाटकात सत्तेच्या सारीपाटावर ‘प्यादी’च्या रूपाने बळी जाणा-या सामान्य माणसाची गोष्ट प्रतिकात्मक रूपकाद्वारे सादर करण्यात आली.
गुरुवारी विघ्नहर्ता सेवा संघाचे विशाल साळवे दिग्दर्शित ‘प्यादी’ सादर झाल्यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात रसिकांमध्ये दोन प्रयोगांची तुलना रंगली होती.
या नाटकात शक्तीदेवीची मुख्य भूमिका वठवणाऱ्या वैशाली जाधव आणि आदित्यनाथ साकारणाऱ्या अमन दळवीच्या सत्तासंघर्षात विजय (राजन जाधव) नावाच्या सामान्य माणसाला कसे वापरले जाते याची गोष्ट विणली आहे. त्यात कौटिल्यची भूमिका साकारणाऱ्या विशाल साळवीने आपल्या अभिनयाचे सामर्थ्य दाखवत या सारीपाटात आपली वेगळेपण अधोरेखित केले. या पटावर रवींद्र जाधव (शिखंडी), स्वाती खापरे (मेनका), गजानन शेटय़े (निर्मितीदेवता), परेश मोरे (सूत्रधार)आणि मानसी उपासनी (प्रतिमा) यांनी आपापली खेळी यथोचित खेळली. दत्ता मोरे (नेपथ्य), संजय विनायक (प्रकाशयोजना),महेंद्र वेंगुर्लेकर–संतोष सारंग (पार्श्वसंगीत), रवींद्र घाग (रंगभूषा) आणि दीपक चोरगे (वेशभूषा) आदींनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे सांभाळण्याचा प्रयत्न केला.
छायाचित्र : निखिल गोडसे