२५ मार्चला ‘देहभान’ नाटकाने होणार शुभारंभ
आपल्या कलाकृतींद्वारे नाट्य रसिकांचं मनोरंजन करणा-या नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांच्या नाटकांचा ‘कुमार सोहोनी नाट्य महोत्सव’ ठाणे येथील रंगायतन नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्र, ठाणे यांच्या वतीने ‘कुमार सोहोनी नाट्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत २५ मार्च ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत गडकरी रंगायतनमध्ये कुमार सोहोनी यांनी दिग्दíशत केलेली नाटकं दाखवण्यात येतील.
सामाजिक विषयाची सर्वसामान्यांच्या जीवनशैलीशी अचूक सांगड घालत दिग्दर्शन करण्याची हातोटी असणा-या नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांच्या नाटकांचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी नाट्य रसिकांसाठी चालून आली आहे. केवळ मनोरंजनासाठी नाटक नव्हे तर मनोरंजनातून प्रबोधन हा वसा जपत दिग्दर्शन करणा-या कुमार सोहोनी यांच्या नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात नाट्य रसिकांना सोहोनी यांची नाटकं पाहता येणार आहेत.
कुमार सोहोनी यांनी नुकतीच ५१ नाटकं पूर्ण केल्याचं औचित्य साधत या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.२५ मार्च रोजी रात्री ८ वाजता महोत्सवाचा शुभारंभ करण्यात येईल. याप्रसंगी ‘देहभान’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होईल. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजेच २६ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता ‘सुखाशी भांडतो आम्ही’ हे नाटक दाखवलं जाईल. २७ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता ‘कहानी में ट्विस्ट’ नाटक होईल. २८ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता ‘जन्मरहस्य’ आणि ३० मार्चला रात्री ८.३० वाजता ‘मी रेवती देशपांडे’ या नाटकाचा प्रयोग होईल. ३१ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकाने महोत्सवाचा समारोप करण्यात येईल.
विजय मनोहर निमित आणि अभिराम भडकमकर लिखीत ‘देहभान’मध्ये राजन भिसे, रेश्मा रामचंद्र, प्रदीप पटवर्धन, दीपक कदम, अतुल आगलावे, बाळ बापट, शाश्वती िपपळीकर आणि ईला भाटे यांच्या भूमिका आहेत. १२ वर्षापूर्वी सर्वप्रथम रंगमंचावर आलेल्या या नाटकाने २००२-०३ सालच्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, वेशभूषा आणि निर्मितीसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरलं होतं. ‘सुखाशी भांडतो आम्ही’ या नाटकात अभिनेता चिन्मय मांडलेकरसोबत डॉ. गिरीश ओक प्रमुख भूमिकेत आहेत. याखेरीज रेखा बडे, पूर्णिमा अहिरे, विजया महाजन, अमय फडके यांच्याही नाटकात महत्त्वाच्या भूमिका आहेत. कलारंग प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘कहानी में ट्विस्ट’मध्येही डॉ. गिरीश ओक मुख्य भूमिकेत असून प्राजक्ता दातार आणि सौरभ गोखले यांसारखे कलाकार त्यांच्या साथीला आहेत. सुरेश जयराम यांनी लिहिलेल्या या नाटकाला संगीतकार राहुल रानडे यांचं संगीत लाभलं आहे. नेपथ्य प्रदीप मुळये यांनी केलं असून वेशभूषा संगीता सारंग यांची आहे. प्रख्यात मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या लेखणीतून आकाराला आलेलं नाटक आहे ‘त्या तिघांची गोष्ट’. शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, ज्ञानदा पानसे, जयंत घाटे आणि सुचेत गवई अशी या नाटकाची स्टारकास्ट आहे. नेपथ्य नितीन नेरुरकरांचं असून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिलं आहे. वेशभूषा प्रकाश निमकरांची आहे, तर अशोक नारकर व शरद बागवे यांनी नाटकाची निर्मिती केली आहे. डॉ. आनंद नाडकर्णी आणि शरद बागवे निर्मित ‘जन्मरहस्य’ या नाटकामध्ये ईला भाटे आणि अमिता खोपकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतामणीची निर्मिती तसेच शेखर पाटील लिखित ‘मी रेवती देशपांडे’मध्ये मोहन जोशी आणि रमेश भाटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कुमार सोहोनींची सर्वच नाटकं एका पेक्षा एक असून ती प्रत्येक दिवशी पाहण्याचा दुर्मिळ योग नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने जुळून आला आहे. नाटकांच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.