एकांकिका स्पर्धेत प्रवेश घेण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर
एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणा-या ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांनी विषय सुचवल्यामुळे या स्पर्धेबद्दल विशेष उत्सुकता आहे. विषय म्हणून त्यांची ‘अलाव…..!’ ही कविता एकांकिका लेखकांसमोर ठेवली आहे.
मानवी नाते सबंध हा तसा नाजूक मामला, नात्यांमधले ताणेबाणे उलगडणे तसे कठीण काम, जितके हे बंध उलगडण्याचा प्रयत्न करावा तितके ते गुंतागुतीचे होत जातात. कोणतेही नाते संपवणे तितकसे सोप्पे नाही… कितीतरी आठवणी गाडून टाकाव्या लागतात त्या नात्यासोबत. नेमक हेच मांडणारी प्रत्येक शब्दामधून गहिरा आशय व्यक्त करणारी ‘अलाव’‘ ही हळवी कविता गुलजार यांनी स्पर्धकांसमोर ठेवली आहे.
नाती सहज तुटण्याच्या सध्याच्या काळात याकडे नवे मराठी लेखक कसे पाहतात, हे माझ्यासाठी औत्सुक्याचे आहे. लेखकांना लिहण्याची नवी उर्मी देणारी स्पर्धा म्हणून “कल्पना एक..” हा उपक्रम महत्वाचा वाटल्यामुळे आपण हा विषय सुचवला असल्याचही गुलजार म्हणाले.
ही कल्पना आणि त्याअनुषंगाने असलेली कविता अधिक सुगम व्हावी म्हणून तिचा मराठी भावानुवाद प्रख्यात कवी वैभव जोशी यांनी ‘शेकोटी’ या शीर्षकाने केला आहे. या दोन्ही कविता अस्तित्वच्या संकेत स्थळावर स्पर्धकांसाठी उपलब्ध आहेत. यंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी तालीम स्वरुपात शनिवार २६ सप्टेंबरला होणार असून, अंतिम फेरी शनिवार ३ ऑक्टोबरला संपन्न होईल.या दोन्ही फे-या मुंबईत होतील. स्पर्धेचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज अस्तित्वच्या http://www.astitva.co.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येतील.
स्पर्धेचा प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख रविवार २० सप्टेंबर आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – रवी मिश्रा – ९८२१०४४८६२