चित्रपटगृहात दाखल झाला ‘निळकंठ मास्तर’
चित्रपट कॅमे-यातून बोलत असतो. ध्वनी, प्रकाश, अवकाश, संगीत, संवाद, व्यक्तिरेखांचे हावभाव यांच्या सुसंगत मांडणीतून चित्रपटाचे सौंदर्य खुलत जाते. या चित्रपटीय सौंदर्याची मांडणी मराठी चित्रपटात अलीकडे भक्कमपणे केली जात आहे. त्याची प्रचिती अनेक चित्रपटांनी दिली आहे. अशाच भक्कमपणावर गजेंद्र अहिरे यांचा `निळकंठ मास्तर’ रसिकांची दाद मागणारा आहे.
या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळ अधोरेखित करण्यासाठी निवडलेले लोकेशन्स, रंगभूषा, वेशभूषा, कलावंतांचा अभिनय या सा-या गोष्टीत जराही उणिव राहणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. त्यातही `मास्तर’मधील गाणी सिनेरसिकांच्या संग्रहातील अनमोल खजिना ठरणार आहे, त्यासाठी अजय-अतुलचे अभिनंदन!
`निळकंठ मास्तर’च्या कथेला स्वातंत्र्य चळवळीचा बॅकड्रॉप आहे. तसाच एक बॅकड्रॉप हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आठवडय़ालाही आहे. ऑगस्ट क्रांतीदिन आणि त्यानंतर साज-या होणा-या स्वांतंत्र्यदिनाचा हा सप्ताह आहे. याच आठवडय़ात `निळकंठ मास्तर’ सिनेमागृहात दाखल झाल्याने आपसुकच एक देशभक्तीचे वातावरण या चित्रपटाला मिळाले आहे.
अनेकांनी स्वत:च्या इच्छा-आकाक्षा, स्वप्न, घरदार, संपत्ती, नातलगांना, आप्तस्वकीयांना अक्षरश: वा-यावर सोडून स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. अनेकांनी रक्त सांडले, भूमिगत राहिले, शहीद झाले. त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले. `निळकंठ मास्तर’ स्वातंत्र्य चळवळीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणा-या देशभक्तांची गोष्ट सांगतो आहे. याच गोष्टीत एक तरल प्रेमकथाही गुंफली गेली आहे. त्या प्रेमकथेलाही वेगवेगळे पदर आहेत. त्यात गुंतागुंत आहे. त्यात रसिकांना गुंतवून ठेवणे या चित्रपटाचे बलस्थान आहे.
स्वांतत्र्य चळवळीत वेगवेगळ्या गावांत वेगवेगळ्या संघटना काम करत होत्या. इंग्रजांविरुद्ध लढणा-या अशाच एका पथकाचे नेतृत्व करणारा व्यंकटेश (आदिनाथ कोठारे). त्याच्या पथकात एक जिगरबाज तरुण विश्वनाथ (ओंकार गोवर्धन) सामील होतो. मुंबईत शिकायला गेलेला विश्वनाथ स्वातंत्र्य चळवळीत झोकून देतो. व्यंकटेशसोबत तो एका मोहिमेवर जातो. सशस्त्र लढाईच्या या मोहिमेत व्यंकटेशला गोळी लागते. तो कोसळतो. त्याला वाचवण्यासाठी विश्वनाथ प्रयत्न करतो पण; व्यंकटेश प्राण सोडतो. मृत्यूपूर्वी व्यंकटेश विश्वनाथकडे एक जबाबदारी सोपवतो. ती जबाबदारी असते व्यंकटेशची होणारी पत्नी यशोदा (नेहा महाजन)ला तो शहीद झाल्याची बातमी देणे. साधूचा वेश धारण करून तो गावात परत येतो. पोलिस त्याच्या मागावर असतात. याची खबर त्या गावातील पोलिसा (किशोर कदम)ला कळते. विश्वनाथला तो तातडीने बोलावून घेतो. त्याला पसार व्हायला सांगतो. वाटेत सगळी माहिती मिळेल, असे सांगून त्याला पळायला सांगतो. तो पळतो. वाटेतच एका शिवारात त्याला एक महिला भेटते. त्याला खबर देते. नांदुर्णीला इनामदारांच्या वाडय़ावर जायला सांगते. `निळकंठ मास्तर’ ही तुमची ओळख. तो निघतो. इनामदार (विक्रम गोखले) यांच्या वाडय़ावर जातो. यशोदा त्याच वाडय़ावर भूमिगत असते. तिला व्यंकटेशबद्दलची वस्तुस्थिती सांगण्याची जबाबदारी `मास्तार’वर सोपवण्यात येते. इनामदारांशिवाय हा मास्तर क्रांतीकारी असल्याची कुणालाच माहिती नसते. त्याच वाडय़ात इनामदारांच्या वेडय़ा पुतण्याची पत्नी म्हणून विश्वनाथवर लहानपणापासून जीवापाळ प्रेम करणारी इंदू (पूजा सावंत) त्याला `पाटलीन’ म्हणून भेटते. बालपणी विश्वनाथ आणि इंदू भातुकलीचा खेळ खेळले होते. तेव्हापासूनच इंदू विश्वनाथवर जिवापाळ प्रेम करायची. विश्वनाथ शहरात गेला आणि इंदू नाईलाजाने इकडे आली. तो लपून बसलेल्या ठिकाणी एकीकडे इंदू, दुसरीकडे यशोदा, कुणालाही आपली खरी ओळख पटू नये म्हणून त्याची धडपड. एक दिवस विश्वनाथच्या शोधात पोलिस वाडय़ात पोहचतात. इनामदार मास्तरला यशोदासोबत पसार व्हायचा आदेश देतात आणि ते दोघे पळायला लागतात. चित्रपटही त्यांच्या धावण्यासोबत कोणती वळणे घेतो, हे चित्रपटातच बघितलेले बरे.
`निळकंठ मास्तर’मध्ये काही गोष्टी थेट दृश्य संवादातून कळतात. काही गोष्टी व्यक्तीरेखांबाबत मात्र त्यांच्या अंतर्मनातील आंदोलनांचा ठाव घ्यावा लागतो. विश्वनाथ यशोदेला व्यंकटेश गेल्याची बातमी सांगायला का धजावत नाही? एका क्रांतीकारकात एवढी हिम्मत का नसावी? या उत्तरासाठी विश्वनाथच्या अंतर्मनाचा ठाव घ्यावा लागेल. त्या भावभावनांचा आलेख ओंकार गोवर्धनने छान रचला आहे. पूजा सावंतने साकारलेली इंदू आणि तिच्या वाटय़ाला आलेली गाणी आणि नृत्य लाजवाब झाली आहेत. नेहा महाजनच्या वाटय़ाला आलेली यशोदा काटय़ाकुटय़ाच्या, नदी-नाल्याच्या, डोंगरद-याच्या वाटा तुडवत यशस्वी झाली आहे. या तीनही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा ताकदीने साकारल्या आहेत. सिनेमातील पहिलेच गाणे `अधीर मन झाले’ रसिकांना चित्रपटाशी बांधून घेणारे आहे. `कोनसे देश चला…’द्वारे प्रवास छान विणला आहे. `अंधारून आले नभ, तू परतून ये ना’द्वारे चित्रपटाच्या शेवटाची हुरहुर अलगद टिपली आहे. `वंदे मातरम’ या गाण्याचे नवे व्हर्जन देशभक्ती जागवणारे आहे. सिनेमाच्या पार्श्वसंगीताने सिनेमाने गांभीर्य जोपासले आहे. वेगवेगळ्या फ्रेममध्ये दिग्दर्शक म्हणून गजेंद्र अहिरे यांनी आपल्या ख्यातीनुसार कौशल्य दाखवले आहे. सिनेमाची गरज असलेला काळ आणि ग्रामीण जीवन यथोचित साकारले आहे. ही सारी बलस्थाने असली तरी शेवटाकडे जाणारा चित्रपटाचा प्रवास अपेक्षित उंची मात्र गाठत नाही. किशोर कदम यांच्या व्यक्तिरेखेचा विचार फारच ढोबळपणे केलेला वाटतो. तेच मंगेश देसाईने साकारलेल्या भूमिकेचेही झाले आहे. प्रवीण कुलकर्णी यांनी साकारलेल्या डॉक्टरसह अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, राहुल सोलापूरकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
बलभीम पठारे यांच्या अक्षर फिल्मस् प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती असलेल्या `निळकंठ मास्तर’च्या निर्मात्या मेघमाला बलभीम पठारे या आहेत. पहिल्याच चित्रपट निर्मितीत त्यांनी शब्दश: जीव ओतला आहे, असे म्हंटल्यास अतिशयोक्ती वाटू नये. कृष्णा सोरेन यांच्या छाया लेखनाने समृद्ध झालेल्या चित्रपटासाठी स्वातंत्र्यपूर्व काळ रेखाटण्यासाठी काय-काय तारेवरची कसरत करावी लागली असेल, याची प्रचिती या चित्रपटात दिसते. त्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, छायाचित्र दिग्दर्शकाचे अभिनंदन केलेच पाहिजे.
वास्तवाच्या बॅकड्रॉपवर काल्पनिक कथा!
`निळकंठ मास्तर’ला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा बॅकड्रॉप आहे. त्याची दृष्यांकित मांडणी ताकदीने केल्याने हा चित्रपट रसिकांना त्या काळात घेऊन जाणारा आहे. या चित्रपटाला स्वातंत्र्य चळवळीचा बॅकड्रॉप असला तरी या चित्रपटाची गोष्ट ही सत्य घटनेवर आधारित आहे का? स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अशा काल्पनिक कथा, व्यक्तिरेखा जोडल्या जाव्यात का? हा प्रश्न पडतो. चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहेरे यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘ही कथा सत्य घटनेवर आधारित नाही. चित्रपटाला स्वातंत्र्य चळवळीचा बॅकड्रॉप आहे. अशा घटना घडल्या असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.’
स्वातंत्र्य चळवळीच्या बॅकड्रॉपवर निर्मात्यांनी `लिबर्टी’ घेऊन अशी काल्पनिक कथा असलेला हा काही पहिलाच चित्रपट नाही. या आधी असे अनेक चित्रपट आले. त्यातले अनेक स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारकांवरचे वास्तववादी चरित्रपटही आहेत. काही फक्त बॅकड्रॉप घेऊन काल्पनिक कथा मांडून गाजलेत. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाला अशा काल्पनिक कथेचे ढिगळ कशासाठी लावायचे? असा प्रश्न नम्रपणे उपस्थित करावासा वाटतो.
चित्रपट : निळकंठ मास्तर
निर्मिती :अक्षर फिल्मस् प्रायव्हेट लिमिटेड
दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे
कलावंत : ओंकार गोवर्धन, पूजा सावंत, नेहा महाजन, विक्रम गोखले, किशोर कदम, आदिनाथ कोठारे, प्रवीण कुलकर्णी, मंगेश देसाई, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, राहुल सोलापूरकर
***