योगिनी चौक यांचे स्वगत : भाग तीन
“सूर्याची कोवळी किरणे पाठीवर घेत आम्ही त्या इवल्याश्या झोपडीत स्वताःला उसवत होतो. उसवण्यावरुन आठवलं, आपल्या गाठीचा एक जरी धागा उसवला नं, की इम्प्रुमेंट सुरू होते. मुळात एका सात्विक कलाकाराचा उगम होण्याकरिता आधी त्या व्यक्तिचा, त्या व्यक्तिमत्वाचा उगम होणं आवश्यक आहे. त्या व्यक्तिमत्वात कलात्मक ऊर्जा, कलात्मक दृष्टी तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तो निसर्गाच्या अधिक जवळ जातो.“
योगिनी चौक यांच्या तिस-या भागात निसर्गाने दिलेली कलात्मक ऊर्जा आणि दृष्टीविषयीचं स्वगत…
थिएटर ऑफ रिलेवन्स’च्या वर्कशॉपमधे ‘चैतन्याभ्यास’ ही प्रक्रिया मला फार आवडते आणि फार महत्वाची वाटते.
‘तुझ्या होण्याची, असण्याची चेतना देणारा अभ्यास म्हणजे चैतन्याभ्यास.’
प्रत्येक चैतन्याभ्यास हां नावाप्रमाणे जगण्याचं चैतन्य, निसर्गाकडे पाहण्याची, त्याच्याकडून शिकण्याची एक निराळी दृष्टी देऊन जातो आणि एकदा का ही दृष्टी निर्माण झाली, की निसर्गही जिवंत होऊन तुमच्याशी बोलू लागतो आणि कलाकार म्हणून जगताना कलात्मक वीणा झंकारू लागतात. वा-याचा स्पर्श, सूर्याचा उगम, दवबिंदूंचे मोती यांना पाहून कलात्मक चेतनेची नवी परिमाणे उभारू लागतात.
मला आठवतंय, माझ्या पहिल्याच वर्कशॉपमधील एक चैतन्याभ्यास. सकाळी ६ वाजता चैतन्य अभ्यासाला निघालो. उगवणारा सूर्य, त्याचा उगवताना तो मंद प्रकाश, बहुरंगी आकाश आणि त्यातील प्रसन्नता अनुभवली आणि मग सरांनी प्रत्येकाला विचारलं, आज काय काय करणार? आज मी अक्खा दिवस पॉसिटिव्हली जगणार!! ही ऊर्जा घेउनच पुढे चालायला लागलो.
आम्ही शेताच्या भेगाळलेल्या जमिनीवरून चालायला लागलो. चालताना मोठे मोठे दगड. पुन्हा सपाट रस्ता. कधी उतार तर कधी चढ़ लागत होते. चालताना सर म्हणाले, याच खाचखळग्यातून, चढ़-उतरावरुन आयुष्यातही पुढे जायचय. एक मोठ्ठा चढ चढलो आणि मग पुढे रस्ता लागला. सपाट डाम्बरी रस्ता. सर म्हणे, जर ती चढ चढलो नसतो तर हां सपाट डांबरी रस्ता दिसला नसता.
सूर्य कितना भी बडा ताकदवर हो रात को नही टिकता, थोडे चढाव उतार तो आएंगे.
सरांनी त्या रस्त्यावर मला उभं राहायला सांगून, मला तो रस्ता पाहायला सांगितला… माझं आयुष्य धावत होतं त्या मार्गावरून. मला ‘भाग मिल्खा भाग’मधिल तो धावता रस्ता आठवतोय…? त्याचं व्हिजन फिक्स होतं. ते त्याला दिसत होतं. मला या मार्गावरून धावायचंय. आपल्याला आपलं व्हिजन फिक्स करून लक्ष्य गाठायचंय हां संकेत होता.
मी पाहिलं, या वर्कशॉपमधे चारही दिवस एक छोटी कुत्री सतत आमच्या सोबत असायची. तिला खरंतर आम्ही कुणी कधी खायलाही दिलं नाही तरी सोबत असायची आणि चैतन्याभ्यासाला निघालो की ती बरोब्बर केवळ सरांना फॉलो करायची. बसलो की बसायची, झोपलो की तीही झोपायची. हा खेळ केवळ पौझीटिव्ह व्हायब्रेशनचाच होता.
पुढे चालत एका रानात शिरलो. रानातील विविध वनस्पती, त्याचे वेगवेगळे आकार, त्या झाडा झुडपांचा स्पर्श, एकाच रंगाच्या विविध शेड्स बघत, त्या रानटी फुलांचा सुगंध घेत पुढे जात होतो. इतक्यात एक विहीर दिसली. आम्ही आत डोकावून पाहिलं. पाण्याचा साठा दिसला. या विहरित पाण्याचा साठा आहे म्हणून नळाला पाणी येतय. विहिरीत पाणी साठवलेलच नसेल तर…. त्याचप्रमाणे कलाकार म्हणून जगताना तुमच्याकडे अनुभवांचं भांडारच नसेल, तो अनुभवांचा साठा जतन केलेलाच नसेल तर तुम्ही व्यक्त काय होणार, कुठल्या शिदोरीवर काम करणार? कलात्मक साधनेसाठी दृष्टि असणं आवश्यक आहे. म्हणून रोज डायरी लिहिल्याने त्यातील अनुभवांचा साठा तुम्हाला पुढे मदत करतो. आणि चैतन्याभ्यासातील प्रत्येक अनुभव हा त्या अनुभवांच्या विहरित रोज थेंब थेंब पाणी साठवत राहतो.
पुढे काटेरी कुंपणाने रस्ता बंद केलेला दिसला. मागे फिरलो आणि दुस-याच रस्त्याने आम्ही परत आलो तेव्हा हे शिकलो की एक रस्ता बंद झाला तरी दुसरा असतो फ़क्त तो शोध आपण घ्यायचा. मार्ग सापड़तो.
चालत चालत एका बांबूच्या झोपडीत येऊन बसलो. सरांनी प्रत्येकाला विचारलं, हे नाव ऐकून तुमच्या डोक्यात काय इमेज येते सांगा. उदा. शिवाजी मंदिर- व्यावसायिक नाटक, मदर टेरेसा – अनाथाश्रय, भगतसिंग- देशासाठी समर्पण. तेव्हा सर म्हणाले, तुम्ही किती समर्पित आहात तुमच्या कलेसाठी? आपलं नाव घेताच आपलं समर्पण आठवायला हवं.
स्थायित्व बनवता, टिकवता यायला हवं. अवार्डच्या मागे न लागता, स्वताःला त्याच चौकटीत न घालता, स्वताःला हवं ते करूनही मोठं होता येतं. प्याशन हवं. आपल्या व्यक्तिमत्वाला स्थायित्वाची जोड देता आली तर एक्टर म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकता. मग सरांनी मला विचारलं की, एक ऐसा आदमी बताओ जो तुम्हारी नझर में अचिव्हर है. मी म्हणाले, अब्दुल कलाम. सर म्हणाले, ‘त्यांचं एम फिक्स होतं, अग्निमिसाइल बनवण्याचं. त्यांनी त्यांचं काम केलं. अवॉर्डची पर्वा केली नाही आणि सकाळी सकाळी तू नव-याचं नाव न घेता, त्यांचं नाव घेतलंस हे मिळालं त्यांना अवॉर्ड. ते स्फूर्ति बनले ना तुझे… तू कधी होणार कुणाचीतरी कलात्मक स्फूर्ति?’ या वाक्यांनी एक संवेदनशील, कलात्मक, वैचारिक अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करण्याचं स्फुरण मिळत होतं.
एका कलाकाराला दृष्टी असणं महत्वाचं आणि सोबत अलर्टनेस. रस्ता माहित असणं किंवा रस्ता तयार करणं महत्वाचं. जसं, आज या जंगलात येताना आम्ही नवीन रस्त्याने आलो. नाविन्याचा शोध घ्यायला या निर्जन रानात आम्ही आलो म्हणूनच तर मार्ग सापडला.
इथे मला कळकळीने नमूद करायचंय की, आज माझी मराठी रंगभूमी बरीच समृद्ध झालेली दिसते. वेगळ्या धाटणीची, वेगळ्या वाटेवरचि नाटके अनुभवायला मिळतात. मात्र अजूनही काही अंशी आपण तथाकथित रंगभूमी, बॉक्स सेट, ‘कॉमेडीच नाटके चालतात’, ‘मराठी रंगभूमीवर असं चालत नाही बाबा…’ यात अड़कलेले दिसतो. यांतून कधी बाहेर येणार? माझ्यासारखे अनेक कलाकार सफोकेट होत आहेत. त्यांनाही नाविन्याची ओढ आहे. पण एकतर त्यांनाच याची जाणीव नाही किंवा जे मिळतंय त्यात ते समाधान मानत आहेत. अजूनही ब-याच ठिकाणी ‘कलात्मक सत्वासाठी’ तळमळ दिसत नाही. केवळ पैसा कमावणे आणि कलाकारऐवजी कलामजूर होऊन पोट भरणे हेच ध्येय दिसते. आणि ‘लोकांना हेच आवडतं..’ हाच एक्स्क्युज अजून किती दिवस देणार? ही बहाणेबाजी का? मोठ्या संख्येने नाट्यवेडे लोकं असून, मराठी प्रेक्षकांचा इतका मोठ्या प्रमाणात पाठिंबा असूनसुद्धा कलाकारांची कलासाधना किती प्रमाणात होते?
जरा पुढे चालत गेलो, तेव्हा अजून एक झोपडी दिसली… आधी फक्त ती मगासचीच बांबूची झोपडी दिसत होती पण जसं आपण पुढे चालत आलो तशी ही नवीन झोपडी दिसू लागली. याचाच अर्थ, काही आहे, जे आपल्यासाठी आहे, ते आपली वाट पाहतंय. गरज आहे मार्गातून पुढे जाउन ते शोधण्याची. गरज आहे डोळे उघडे ठेवून पाहण्याची.
सूर्याची कोवळी किरणे पाठीवर घेत आम्ही त्या इवल्याश्या झोपडीत स्वताःला उसवत होतो. उसवण्यावरुन आठवलं, आपल्या गाठीचा एक जरी धागा उसवला नं, की इम्प्रुमेंट सुरु होते. मुळात एका सात्विक कलाकाराचा उगम होण्याकरिता आधी त्या व्यक्तिचा, त्या व्यक्तिमत्वाचा उगम होणं आवश्यक आहे. त्या व्यक्तिमत्वात कलात्मक ऊर्जा, कलात्मक दृष्टी तेव्हाच प्राप्त होते जेव्हा तो निसर्गाच्या अधिक जवळ जातो.
म्हणूनच हां चैतन्याभ्यास मला कलाकार म्हणून माझ्यातील निसर्गाच्या अधिक जवळ नेणारा भासतो!!
क्रमश:
पहिल्या भागात लिहिलेले “अंतर्मुख करणारे वळणदार स्वगत” ज्यांनी वाचले नसेल त्यांना पुढील लिंकवर क्लिक करून वाचता येईल…
https://www.rangmaitra.com/index.php/2014-11-18-10-41-09/item/455-swagat01-yogini-chouk
दुस-या भागात लिहिलेले “निसर्गाने दिला परमोच्च आनंद!” ज्यांनी वाचले नसेल त्यांना पुढील लिंकवर क्लिक करून वाचता येईल…
https://www.rangmaitra.com/index.php/2014-11-18-10-41-09/item/464-yogini-swagat-2