२१ नोव्हेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार शंभरावा प्रयोग
प्रशांत-तेजश्री ही बाप-लेकीची जोडी हिट
तब्बल दोन दशकानंतर पुनरुज्जीवित झालेल्या आणि प्रशांत दामले फॅन फाउन्डेशन’ची निर्मिती असलेल्या ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग येत्या २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता मोठ्या धुमधडाक्यात विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होतो आहे. शताब्दी साजरी कारण-या मंगेश कदम दिग्दर्शित या नाटकातून प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान ही बाप-लेकीची जोडी हिट झाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गायिका राधा मंगेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शंभरावा प्रयोग होत आहे.मुंबईत एमआयजी क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा सोमवारी करण्यात आली. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने नाटकातील प्रमुख कलाकार प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान यांच्याशी गप्पांची एक धमाल मैफलही यावेळी रंगली. या नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याशीही गप्पा झाल्या. यावेळी बोलताना दामले यांनी त्यांच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीतील हा एक महत्वाचा आणि अविस्मरणीय टप्पा असल्याचे नमूद केले आणि ‘कार्टी’चे अगणित प्रयोग होतील असा विश्वास व्यक्त केला.
वसंत सबनीस लिखित ‘कार्टी काळजात घुसली’ पंचवीस वर्षानंतर पुन्हा रंगभूमीवर आणून दामले यांनी एक वेगळाच प्रयोग केला आहे. दामले यांच्या कार्टीची म्हणजे कांचन कान्हेरेची भूमिका साकारली आहे ती ‘होणार सून मी या घरची’फेम जान्हवी अर्थात तेजश्री प्रधान हिने. प्रशांत दामले ब-याच अंतराने रंगभूमीवर पुनःपदार्पण करणार आणि तेजश्री आपले रंगभूमीवरील पदार्पण साजरे करणार म्हणून या नाटकाकडून फार अपेक्षा होत्या. राज्यभरात झालेल्या नाटकाच्या शंभर प्रयोगांनंतर या अपेक्षा पूर्ण झाल्याचे सिद्ध झाले आहे.
नाबाद शंभरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दामले म्हणाले, ‘मी माझ्या रंगभूमीवरील ३३ वर्षांच्या कारकिर्दीत ११ हजार नाट्यप्रयोगांचा टप्पा पार करेन असे कधी वाटलेच नव्हते. पण कुटुंबाची साथ, मित्रपरिवाराने दाखवलेला विश्वास आणि रसिकांनी भरभरून दिलेले प्रेम यांमुळे मला हे साध्य करता आले. या नाटकातील कालिदास कान्हेरे अर्थात कांचनच्या वडिलांची भूमिका हे माझ्यासाठी एक आव्हान होते. तेजश्रीबरोबर ते साकारताना एक वेगळा आनंद मिळाला. या दोन्ही व्यक्तिरेखांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.’
तेजश्रीची जान्हवी आज घराघरात पोहोचली आहे. या नाटकात एका वेगळ्या बाजाची कांचन साकारताना एक वेगळीच मजा आली, असे ती म्हणते. ‘प्रशांत दामालेजींसारख्या कसलेल्या अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्यच. त्यांच्याकडून बरेच काही शिकता आले,’ असेही ती म्हणाली.
सबनीस यांच्या या नाटकाचा पहिला प्रयोग २५ वर्षांपूर्वी साकारला गेला होता. मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आता प्रशांत दामले आणि तेजश्री सकारात आहेत. अठरा वर्षांपूर्वी सोडून गेलेल्या वडिलांचा शोध घेता घेता स्वतः चित्रपटसृष्टीत करियर करू पाहणारी विशीतील कांचन वडिलांना कसे आपलेसे करते याची ही कथा आहे. खुसखुशीत संवाद, प्रसंगी त्यांवर चटपटीत मसाल्यांची पखरण आणि त्यातून आकाराला येणारी खमंग जुगलबंदी असा हा खुमासदार बेत रसिकांना आवडतो आहे.
या नाटकातील नीता पेंडसे आणि पराग डांगे या इतर कलाकारांनीही नेमकी हीच भावना या निमित्ताने बोलून दाखवली. एमआयजी क्रिकेट क्लब येथे सोमवारी रंगलेल्या या गप्पांच्या वेळी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी या नाटकाविषयी भरभरून बोलत आपल्या भावना व्यक्त केल्या. या नाटकाला प्रख्यात संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचे संगीत असून मंगेश कदम यांनी आपल्या आगळ्या शैलीत त्याचे दिग्दर्शन केले आहे.