‘शाली’मध्ये पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंचा सहभाग!
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेत जनसामान्यांची सेवा करण्याचं व्रत जोपासत ‘पद्मश्री या उपाधीपर्यंत पोहोचलेले डॉ. तात्याराव लहानें ‘शाली’ या सामाजिक मराठी चित्रपटातून चाहत्यांना दर्शन देणार आहेत. प्राणांपेक्षाही प्रिय असलेली आपली तत्त्व जोपासत जनसेवेचा वसा जपणा-या डॉ. तात्याराव लहाने यांना रुपेरी पडद्यावर आणण्याची किमया या चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल साटम यांनी साधली आहे. येत्या २७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
प्रख्यात साहित्यिक कै. शंकर पाटील यांच्या शारी या कथेवरून प्रेरित होऊन शाली या मराठी सिनेमाची निर्मिती केली जात आहे. याच सिनेमात डॉ. तात्याराव लहानें स्वतःच्याच भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक अतुल साटम यांनी या संदर्भात डॉ. तात्याराव लहानें यांची भेट घेऊन चित्रपटाची कल्पना दिली तेव्हा विषयाने त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेत त्यांना प्रभावित केल्याचे सांगितले. कथेची गरज तसेच विषयाचे गांभीर्य ओळखून या चित्रपटात सहभागी होण्याबाबत लगेच होकार देत डॉ. लहानें यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून ताबडतोब चित्रीकरणासाठी तारीखही दिली. ‘तुम्ही कामाला लागा, मी तुम्ही सांगाल तिथे येईन,’ असे आश्वासन देऊन डॉ. लहानें यांनी तो शब्द पाळला.
वरचेवर प्रसारमाध्यमांना मुलाखती देण्याची सवय असल्याने मनात कॅमे-याविषयी जराही भय नसलेले डॉ. तात्याराव लहानें चित्रिकरणाविषयी खूप उस्तुक आणि उत्साही होते. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, कॅमेरा माझ्यासाठी नवा नाही. प्रसारमाध्यमांसोबतच्या कायमच्या मुलाखतीमुळे तो आता चांगला परिचयाचाही झाला आहे आणि मित्रही बनला आहे. पण मुलाखती देताना मी माझे संवाद बोलत असतो. चित्रपटात काम करताना मात्र मला लेखकाने लिहिलेले संवाद म्हणायचे होते, त्यामुळे नेहमी परिचयाचा असलेला हा कॅमेरा थोडासा नवखा वाटला पण भूमिका तीच असल्याने विशेष अडचण जाणवली नाही. एक वेगळा अनुभव देणारा हा क्षण ‘शाली’ सिनेमाच्या निमित्ताने अनुभवता आल्याचं समाधान लाभल. वेगळ्या विषयावरील हा एक धाडसी सिनेमा आहे असं मला वाटतं. अतुल साटम हा एक तरुण आणि होतकरू दिग्दर्शक असून त्याचं पूर्वीचं काम पाहिल्यानंतर तो हा विषय अतिशय हळुवार आणि संवेदनशिलतेने पडद्यावर मांडेल याबाबत जराही शंका नसल्याचे डॉ. तात्याराव लहानें यांनी व्यक्त केलं.
शाली हा सिनेमा कोकणातील नयनरम्य वातावरण, चालीरीती, परंपरा, लोककला तसेच फणसाप्रमाणे वरून काटेरी पण आतून रसाळ अशा मानवी व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणार आहे. ‘कनक एंटरटेमेंट” या बेनरखाली ‘शाली’ची निर्मिती करण्यात आली असून जयसिंग साटम या सिनेमाचे निर्माते आहेत. पंचविशीतल्या एका सुशील, शालीन, बुद्धिवान तसेच कर्तव्यनिष्ठ मुलीभोवती सिनेमाच कथानक गुंफण्यात आलेलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील सध्याचे आघाडीचे गीतकार गुरु ठाकूर आणि मकरंद सावंत यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार विजय नारायण आणि नंदू घाणेकर यांनी रुपकुमार राठोड, आरती अंकलीकर-टिकेकर, बेला शेंडे यांच्या सुमधुर आवाजात स्वरसाज चढवला आहे. छायाचित्रण सुरेंद्र सिंग यांनी केले आहे. तर कलादिग्दर्शन अल्हाद साटम यांचे असून, कार्यकारी निर्मिती शंकर धुरी यांची आहे. एका वेगळ्या विषयावर आधारित असलेल्या ‘शाली’ सिनेमाला पद्मश्री डॉ. तात्याराव लहानेंच्या उपस्थितीमुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.