अनिष्ट रूढी परंपरेवर प्रहार
काही अनिष्ट रूढी-परंपरांमुळे माणसातील जनावराचे रूप समोर येते. जात पंचायत हादेखील असाच एक रोग. याच विषयावर आधारित दिलीप शहा यांच्या डी.एस.फिल्म्स निर्मित,ऋषीराज क्रिएशन कृत, राजेंद्र जी. साळी लिखित दिग्दर्शित ‘आर्त’ हा मराठी चित्रपट २० मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
लेखक-दिग्दर्शक राजेंद्र जी. साळी सांगतात की, ‘आज ग्रामीण भागात महिलांना जातपंचायतीच्या परंपरेमुळे अनेक हालअपेष्टा आणि अन्यायकारक वागणूक सहन करावी लागते आहे. ‘आर्त’ चित्रपटातून आम्ही अशाच जातपंचायतीच्या समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटांत गणेश यादव, शितल साळुंखे, जयराज नायर, अजित भगत इ. कलाकारांच्या प्रमुखभूमिका आहेत.
राजेंद्र जी. साळी पुढे सांगतात की, ‘आर्त’ चित्रपटासाठी मी संपूर्ण भारतातील काही प्रमुख भागातील खेड्यांमध्ये जाऊन अभ्यास केला. अंगावर शहारे यावेत अशा घटना गावकऱ्यांकडून मला समजल्या. या विषयाची दाहकता समाजासमोर मांडणं मला माझं कर्तव्य वाटलं म्हणूनच मी ‘आर्त’सारखा सामाजिक चित्रपट केला आहे. आपली आई, पत्नी, बहीण यांचा आदर करणाऱ्या प्रत्येक पुरुषाने तर हा चित्रपट नक्कीच बघावा परंतु महिलांनीदेखील हा चित्रपट पाहून आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि जागरूक कसं रहावं हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त चित्रपट करून आम्ही थांबणार नसून, या चित्रपटाचा विशेष खेळ लोकसभेतील सदस्यांसाठी आयोजित करणार आहोत.’
चित्रपटाला सुरेश घायवट यांचे गीत-संगीत लाभले असून, सवांद-मुरलीधर भावसार आणि राजेंद्र जी. साळी यांचे आहे, कार्यकारी निर्माता विनोद भा. शिंदे आहेत.