दिग्गज विनोदवीरांची रंगणार मैफल
प्रेक्षकांना विनोदाचा निखळ आनंद देण्यासाठी लावण्या प्रॉडक्शन अँड क्रिएशन्सची निर्मिती असलेला ‘फॅमिली ४२०’ चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. निर्माते देव राजयांची निर्मिती असलेला ‘फॅमिली ४२०’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, दिग्गज विनोदवीरांची मैफल रंगणार आहे.
संतोष गायकवाड यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात आजच्या समाज व्यवस्थेवर विनोदी अंगाने भाष्य करण्यात आलं आहे. निखल विनोद आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांची अचूक सांगड घालत दिग्दर्शक संतोष गायकवाड आणि निर्माते देव राज यांनी ‘फॅमिली ४२०’ हा चित्रपट बनवला आहे.
मराठीतील आघाडीच्या विनोदवीरांसोबतच बॉलिवूडपट गाजवणाऱ्या कॉमेडीवीरांचा अभिनयही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं…’ यांसारखे बरेच डायलॉग आपल्या विनोदी अभिनयाच्या बळावर अजरामर करणाऱ्या असरानींसोबत सुनिल पाल, उपासना सिंह, विजय पाटकर, विजय कदम, स्वप्निल राजशेखर, आशिष नेवालकर, हर्षदा पाटील, सुकन्या कुलकर्णी, गीता निखारगे या कलाकारांच्या अभिनयाने हा चित्रपट सजला आहे.
दिग्दर्शक या नात्याने प्रथमच ‘फॅमिली ४२०’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या संतोष गायकवाड यांनी पदार्पणातच अनेक विनोदवीरांना एकत्र आणण्याचं काम केलं आहे. याबाबत बोलताना गायकवाड म्हणाले, ‘प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठया विनोदवीरांना या चित्रपटात मुळीच एकत्र आणलेलं नाही. एकापेक्षा एक धडाकेबाज विनोदवीर असणं ही ‘फॅमिली ४२०’च्या कथेची गरज होती. प्रत्येक कलाकाराने आपपली भूमिका योग्य प्रकारे साकारली. निर्माते देव राज यांनी मोकळीक दिल्यानेच कथेची गरज असलेल्या दिग्गज विनोदवीरांना या चित्रपटात आणणं शक्य झालं.’
निर्माते देवराज यांनी सांगितले, ‘या चित्रपटात प्रेक्षकांना धोत्रे पाटील या कलरफुल कुटुंबाची कथा पाहायला मिळेल केवळ कथा, पटकथा, संवाद आणि अभिनय या पातळीवरच हा चित्रपट प्रेक्षकांना समाधान देणारा नसून तांत्रिक बाजूही सक्षम आहेत. दर्जेदार निर्मितीमूल्ये प्रेक्षकांना काहीतरी भव्य दिव्य पाहिल्याचं समाधान नक्कीच देतील. गीत-संगीतापासून पार्श्वसंगीतापर्यंत आणि कॅमेरावर्कपासून संकलनापर्यंत सर्वच बाबतीत हा चित्रपट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे.’
सुबोध नागदेवे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं असून बीना सातोस्कर आणि सुबोध नागदेवे यांनी गीतलेखन केलं आहे. संगीतकार सुशील पेंढारी यांनी या गीतांना स्वरसाज चढवला आहे. अवधूत गुप्ते, वैशाली माडे, बेला शेंडे, सुदेश भोसले, नेहा राजपाल या मराठीतील आघाडीच्या गायकांनी या चित्रपटातील गीतांना स्वर दिला आहे.