दुर्वाने ६०० तर लगोरीने गाठला ३०० एपिसोड्सचा टप्पा!
स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे स्टार प्रवाहवरील मालिकांनी अनेक मैलाचे दगड पार केले आहेत. याच सूचीत अजून तीन विक्रमांची भर पडली आहे. स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ मालिकेने ९००, ‘दुर्वा’ मालिकेने ६०० तर ‘लगोरी’ मालिकेने ३०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केला आहे .
स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमध्ये नेहमीच नात्यांचे अनेक बंध उलगडून दाखविले आहेत. मानवी मनाच्या विविध पैलूंचे प्रत्ययकारी चित्रण मालिकेतील विविध व्यक्तिरेखांद्वारे दाखविले आहे. याच वैशिष्ट्यामुळे स्टार प्रवाहवरील मालिका सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना भावल्या आहेत. प्रेक्षकांच्या या प्रतिसादामुळे ‘देवयानी’, ‘दुर्वा’ आणि ‘लगोरी’ या मालिकांची ही घौडदौड अशीच सुरु राहणार आहे. आगामी काळात या मालिका अधिकाधिक रोचक होणार आहेत. ‘देवयानी’ मालिकेमध्ये एक संस्कारी आणि सुशिक्षित स्त्री आपल्या चांगुलपणाने वाईट मार्गावरील माणसाला देखील भल्यामार्गावर आणू शकते याचे चित्रण दाखविण्यात आले आहे. देवयानीने आपल्या प्रयत्नाने आजवर एक्काला योग्य मार्गावर आणले आहे. मालिकेच्या आगामी भागात देवयानी आणि एक्का यांच्यामध्ये फुलू पाहणारे प्रेम आणि त्यात येणारी संकटे याचे चित्रण दिसणार आहे.
‘दुर्वा’ मालिकेमध्ये दुर्वाचा सामान्य स्त्री ते आमदार हा खडतर प्रवास दाखविला आहे. मातृत्व आणि राजकीय नेतृत्व याचा समतोल साधणा-या स्त्रीचे प्रभावी चित्रण या व्यक्तिरेखेद्वारे दाखविले आहे. आगामी भागात दुर्वाच्या व्यक्तिगत आयुष्यातील संघर्ष बघायला मिळणार आहे. ‘लगोरी’ मालिकेत पाच मैत्रिणीच्या अनोख्या मैत्रीची कहाणी दर्शविली आहे. आजच्या युगातील या मुली आणि त्यांचे विचार प्रेक्षकांना खूपच भावले आहेत. या मालिकेमध्ये स्त्रीभ्रूण हत्या आणि एकेरी पालकत्व असे अनेक सामाजिक विषय देखील हाताळले गेले आहेत. लगोरी मालिकेच्या आगामी भागात एकमेकींच्या संकटाना तोंड देताना यासगळ्याजणी आपली मैत्री टिकवू शकतात का याचे चित्रण बघायला मिळणार आहे .
या प्रसंगी बोलताना स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील म्हणाले की, “बदलत्या काळानुसार प्रेक्षकांचे राहणीमान आणि आवडी-निवडी बदलत आहेत. आधुनिकता आणि संस्कृती यांची सांगड कशी घालावी हा प्रश्न मराठी घरांतील प्रत्येकाला सतावत आहे. जुनी आणि नवी नाती यांत सुवर्णमध्य साधताना मराठी स्त्रीला फार कसरत करावी लागत आहे. म्हणूनच आम्ही एक नवीन विचार घेवून येत आहोत ‘संस्कृतीसोबत प्रगती’. आमच्या कथा आणि व्यक्तिरेखा मनोरंजक पद्धतीने दाखवून देतील की,फक्त जुन्या संस्कृतीचा उदो उदो करणे म्हणजे मराठीपण नव्हे. तर संस्कृतीला प्रगतीची जोड देणे हे अस्सल मराठ्मोळे लक्षण आहे. ‘संस्कृती सोबत प्रगती’ कशी साध्य करता येईल या प्रश्नाचे उत्तर आमच्या कार्यक्रमांतून मिळेल.”