स्पर्धेला मिळाले नाट्य परिषदेचे भक्कम पाठबळ
प्राथमिक ९ ऑक्टोबर; अंतिम फेरी १५ ऑक्टोबर
एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेला यंदा रंगकर्मींची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे भक्कम पाठबळ मिळाले आहे.
रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदने घेतला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी परिषदेच्या माहीम इथल्या यशवंतराव नाट्यसंकुलात होणार आहे.
यंदा या स्पर्धेचे संयुक्त वर्ष ३० वे असून खुल्या गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेचा विषय स्पर्धेच्या प्रथेप्रमाणे मागच्या वर्षीच जाहीर करण्यात आला होता.
यंदाच्या स्पर्धेच्या विषय सूचक आहेत आजच्या आघाडीच्या कथाकार मेघना पेठे आणि त्यांनी विषय सुचवला आहे ‘जब जागो तब सवेरा…!!’. या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी एकांकिका या स्पर्धेत स्पर्धकांना सादर करायची आहे.
यंदा एकांकिका स्पर्धांच्या आयोजकांमध्ये झालेल्या समन्वयानुसार कोणत्याही मोठ्या स्पर्धांच्या तारखा एकत्र येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली आहे, त्याप्रमाणे स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार, दि. ९ ऑक्टोबरला तर अंतिम फेरी शनिवार १५ ऑक्टोबरला होणार आहे.
स्पर्धेचे प्रवेश अर्ज www.astitva.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : रवी मिश्रा – ९८२१०४४८६२