‘अंबर भरारी’चे नामांकने जाहीर
माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पुढाकाराने ‘अंबर भरारी’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी चित्रपट महोत्सवातील नामांकने जाहीर झाली आहेत. त्यात कोण बाजी मारतो याची अंबरनाथकरांना उत्सुकता लागली असून, १४ नोव्हेंबरला होणाऱ्या पारितोषिक वितरणासाठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत हजेरी लावणार आहेत.
यंदाच्या महोत्सवात उत्तम प्रतिसाद लाभला असून, विविध विषयांवरील २० चित्रपटांनी हजेरी लावली. त्यापैकी ‘चाहतो मी तुला’, ‘पोस्टर गर्ल’ आणि ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ आणि शामची शाळा या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली.
येत्या १४ नोव्हेंबर रोजी शहरातील वडवली विभागातील गावदेवी मैदानात सायंकाळी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत या महोत्सवात हजेरी लावणार आहेत.
उपनगरातील पहिलाच चित्रपट महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमात यंदा श्यामची शाळा, वाल्या टु वाल्मिकी, हक्क आर्त यासारखे सामाजिक चित्रपट सहभागी झाले होते. ‘आमा’ संस्थेच्या सभागृहात गेल्या आठवड्यात हे चित्रपट दाखविण्यात आले. याचवेळी मान्यवर परीक्षकांकडून चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, पटकथा, संवाद, संगीत, गीतलेखन, छायांकन आदी विविध गटात पारितोषिके देण्यात येणार आहेत. या चित्रपट महोत्सवाबरोबरच अवयवदान आणि देहदान या विषयावर लघुपट महोत्सवही आयोजित करण्यात आला होता. त्यात एकूण १० लघुपट आणि २ माहितीपट सहभागी झाले होते.
महेंद्र पाटील यांनी या महोत्सवाचे दिग्दर्शन केले, पारितोषिक वितरण सोहळा सोमवारी, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गावदेवी मैदान, वडवली विभाग अंबरनाथ पूर्व येथे होईल, अशी माहिती माजी नगराध्यक्ष आणि संयोजक सुनील चौधरी यांनी दिली.
मुंबईत विविध चित्रपट महोत्सव होतात. मात्र उपनगरांमध्ये महोत्सवाची परंपरा नाही. आता सिनेनाट्य सृष्टीतील अनेक कलावंत, तंत्रज्ञ ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात राहतात. आपण जिथे राहतो, तिथेही महोत्सवासारखे शानदार कार्यक्रम व्हावेत, अशी त्यांची इच्छा असते. त्याच भावनेतून गेल्या वर्षापासून महोत्सव भरविण्यास सुरूवात केली. त्याला यंदाही उत्तम प्रतिसाद मिळाला, असल्याचे चौधरी यांनी सांगितले.