‘चाहतो मी तुला’ चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार
अंबरनाथमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवामध्ये ‘शामची शाळा’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला असून, ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटाला विविध प्रकारांत तब्बल ११ पुरस्कार मिळाले आहेत.
अंबरनाथमध्ये दिमाखदार सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील बडे कलाकार कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘अंबर भरारी’ या संस्थेतर्फे अंबरनाथमध्ये मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे चित्रपट महोत्सवाचे हे दुसरे वर्ष होते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अनेक चित्रपटांनी महोत्सवामध्ये सहभाग नोंदवला होता. पोस्टर गर्ल, शामची शाळा, चाहतो मी तुला, शिनमा असे प्रसिद्ध चित्रपटांनी स्पर्धेत प्रवेश घेतला होता. त्यानुसार परीक्षकांनी परीक्षण केल्यानंतर ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान निवडक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले होते. या परीक्षकांच्या निर्णयानुसार ‘शामची शाळा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटाने तब्बल अकरा पुरस्कार मिळवत सर्वाधिक पुरस्कार जिंकण्याचा मान मिळवला.
‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या चित्रपटानेही महोत्सवात ५ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. त्यानंतर शामची शाळा आणि पोस्टर गर्ल या चित्रपटांनी प्रत्येकी ४ पुरस्कार मिळवले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जसराज जोशी तर पार्श्वगायिकेचा पुरस्कार वैशाली सामंत यांना देण्यात आले.
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार ‘शिनमा’ या चित्रपटासाठी गणेश आचार्य यांना देण्यात आला. तसेच ‘चाहतो मी तुला’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री मिथीला मिरजकर यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कारही याच चित्रपटासाठी विशाल पवार यांना देण्यात आला.
या पुरस्कार प्रदान सोहळ्याला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निकीता मोघे, वैशाली सामंत, जसराज जोशी, सतीश रणदिवे, नंदू आचरेकर उपस्थित होते.