‘स्टार प्रवाह’च्या व्हिडिओची सोशल मीडियात चर्चा
दहा दिवस मोठ्या उत्साहानं गणपती बाप्पांचा उत्सव साजरा केल्यानंतर वेळ आली आहे अनंत चतुर्दशीची. बाप्पांना निरोप देण्याची! ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात बाप्पांना निरोप दिला जातो आहे. मात्र, गणपती बाप्पा खरंच पुढच्या वर्षी येईल का, असा प्रश्न स्टार प्रवाहनं ‘गणपती बाप्पानं दहा दिवस काय पाहिलं?’ या व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. या व्हिडिओची सोशलमीडियात चांगलीच चर्चा आहे.
स्टार प्रवाहनं मागील वर्षी अभिनेता रितेश देशमुखसह ‘थँक गॉड बाप्पा’ हा म्युझिक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओतून बदलत्या गणेशोत्सवातली सात्विकता संपून होणाऱ्या बाजारीकरणावर भाष्य करण्यात आलं होतं. त्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाला होता. यंदा तोच विचार पुढे नेण्याचं काम ‘गणपती बाप्पानं अकरा दिवस काय पाहिलं’ हा व्हिडिओ करतो.
या व्हिडिओचं वेगळेपण म्हणजे, गणपती बाप्पांच्या दृष्टिकोनातून उत्सवाकडे पाहण्यात आलं आहे. त्यामुळे भक्ती ते धांगडधिंगा आणि पर्यावरणाची हानी असा प्रवास यात मांडण्यात आला आहे. त्यात घरी मनोभावे आरती करणारे भाविक ते उत्सवात पत्ते खेळणे, मद्यपान करणे, घरात कोणीच नसणे, डीजे लावून नाचणे, विसर्जन करताना तीन वेळा बुडवणे आणिविसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर पडलेली मूर्ती असं सगळं चित्रण करण्यात आलं आहे. या व्हिडिओलातीस हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
उत्सवाची वेगवेगळी रूपं दाखवतानाच एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. विसर्जनावेळी प्रत्येक गणेशभक्त ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करत असतो. मात्र, गणपती बाप्पांना दहा दिवस हा असा उत्सव पाहिल्यानंतर खरंच पुढच्या वर्षी बाप्पा येतील हा प्रश्न विचार करायला लावणारा, आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.