महेश मांजरेकर यांनी निर्मिलेला आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन असलेला ‘ध्यानीमनी’ हा चित्रपट १० फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
एकीकडे काळ बदलत चाललेला असताना मराठी सिनेमा नव्या भरारी घेताना आपण बघतो आहोत. या सिनेमाबद्दल ख्यातनाम हिंदी सिनेतारे, अमिताभ बच्चन व सलमान खान यांनीसुद्धा ‘हा चित्रपट बघू नका’ असे ट्विट द्वारे केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील सचिन खेडेकर, भाऊ कदम, अमृता खानविलकर, संजय जाधव, संदीप पाठक, आनंद इंगळे, संस्कृती बालगुडे,वैदेही परशुरामी, आकाश ठोसर तसेच पूजा सावंत हे देखील चित्रपट बघू नका असे आग्रहाने सांगत आहेत. साधारणतः कलाकार एकमेकांच्या सिनेमांचे प्रसिद्धीकरण करताना दिसून येते. पण या चित्रपटा बाबत तसे नसून, तो ‘बघू नका!’,असे सर्वजण सांगत असल्याने चित्रपटाप्रतीच्या या नकारात्मक भूमिकेने अनेक प्रश्नचिन्हे उभी केली आहेत. कोणत्याही प्रकारचे रक्षा कवच न बाळगता जोखमीने केल्या गेलेल्या या सिनेमाचे असे प्रसिद्धीकरण हे वेगळच आहे. माणसाचा स्वभावच असतो की एखादी गोष्ट करू नका किंवा बघू नका सांगितल्यावर ती मुद्दाम करावीशीच वाटते. निर्मात्यांना त्यांच्या कलाकृतीविषयी असलेला आत्मविश्वास तसेच त्यांनी केलेले धाडस यातून दिसून येते. हे सांगताना प्रेक्षकांची निराशा होणार नाही अशी खात्री त्यांच्या सांगण्यात दिसून येते. सिनेमाबद्दल अशा प्रकारे बोलले जाअसल्याने त्या विषयी लोकांच्या मनात उत्सुकता आणि कुतूहलाने चांगलेच घर केले आहे.