रोज रात्री १०.३० वा. ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’
आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावणारी मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’. या मालिकेचा पहिला सिझन संपल्यानंतर पुढचा सिझन कधी येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. ती आता संपली असून १८ फेब्रुवारीपासून ‘दिल दोस्ती दोबारा’ या नव्या नावाने सुरु झाली आहे.

पहिल्या सिझनमध्ये आशू, सुजय, कैवल्य, मीनल, रेश्मा आणि अॅना हे सहा जण एकमेकांच्या ओळखीने एका घरात एकत्र येतात आणि त्यांची ही ओळख कधी घट्ट मैत्री बनते हे त्यांनाही कळत नाही. या मैत्रीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि कधी कधी त्यांच्या डोळ्यांच्या कडाही ओल्या केल्या. आता या नव्या सिझनमध्ये ही मंडळी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत परंतु नव्या व्यक्तिरेखांसह. साहिल, गौरव, पप्या, मुक्ता, आनंदी आणि परी अशा या सहा व्यक्तिरेखा असणार आहेत. हे सहा जण मुंबईत एकमेकांना कसे भेटतात आणि ‘खयाली पुलाव रेस्टॉरंटचा’ प्रवास कसा सुरु होतो त्याची ही गोष्ट.
‘दिल दोस्ती दोबारा’ या नव्या को-या सिझनची निर्मिती संतोष कणेकर यांची अथर्व थिएटर्स अॅंड आर्ट ही निर्मितीसंस्था करणार आहे तर दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर आणि स्वप्निल मुरकर सांभाळणार आहेत. कथा आणि संवाद सुदीप मोडक आणि अभिषेक खणकर यांचे असणार आहेत. समीर सप्तीसकरच्या संगीताने सजलेलं या नव्या मालिकेचं शीर्षकगीतही असंच फ्रेश असणार आहे.
थोडक्यात पहिल्या सिझनमध्ये धम्माल उडवून देणारे मित्र म्हणजे अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, पुजा ठोंबरे, सखी गोखले आणि स्वानंदी टिकेकर हे कलाकार या नव्या सिझनमध्ये नव्या नावांसह प्रेक्षकांना बघायला मिळतीलच पण त्यासोबतच काही नवीन पात्रांचाही यात समावेश असणार आहे.