‘राष्ट्र’मध्ये साकारणार वास्तव भूमिका
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार रामदास आठवले आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी हे दोन धडाकेबाज नेतेही आता रुपेरी पडद्यावर चमकणार आहेत.
इंदर इंटरनॅशनलची प्रस्तुती असलेल्या ‘राष्ट्र’ या आगामी मराठी चित्रपटात आठवले आणि शेट्टी आपापल्या वास्तवातील व्यक्तिरेखांमध्ये चमकणार आहेत.
निर्माते बंटी सिंग यांची निर्मिती असलेल्या ‘राष्ट्र’ या चित्रपटाची कथा आरक्षण कोटा आणि जातियवाद यांवर आधारित आहे. ‘राष्ट्र’चं दिग्दर्शन करणाऱ्या इंदरपाल सिंग यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन आणि संकलनही केलं आहे.
आजवर काही हौशी राजकारण्यांनी रुपेरी पडद्यावर हजेरी लावली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत रामदास आठवले आणि राजू शेट्टीही ‘राष्ट्र’मध्ये दिसणार आहेत. आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये ‘राष्ट्र’ हा चित्रपट समाजाला नवी दिशा देणारा असल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, या चित्रपटाची कथा आजच्या प्रवाहातील चित्रपटांपेक्षा खूप वेगळी आहे. घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वाटचाल करणाऱ्या दलित जनतेसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे. जातियवादावर प्रहार करणाऱ्या या चित्रपटामध्ये आपण तमाम दलित जनतेच प्रतिनिधीत्व करण्यासाठी सहभागी झालो असल्याचं मतही आठवले यांनी व्यक्त केलं.
या चित्रपटाची कथा सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी असल्याने यात दिसणार असल्याचं सांगत राजू शेट्टी म्हणाले की, ‘राष्ट्र’ या चित्रपटाचा विषय खऱ्या अर्थाने आजच्या समाजाला मार्गदर्शन करणारा आहे. आजवर बऱ्याच पंजाबी चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या इंदरपाल सिंग यांनी मराठीकडे वळताना अनादीकालापासून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात धगधगत असलेला ज्वलंत विषय निवडला आहे. अशा प्रकारच्या समाजोपयोगी विषयावर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती होणं ही आजच्या समाजाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्यावर या चित्रपटातील काही दृश्यांचं करण्यात आलं आहे. यासाठी केंद्र सरकार तसंच पुरातत्त्व विभागाची विशेष परवानगी घेण्यात आली होती. ‘राष्ट्र’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यशस्वीपणे पोहोचण्यासाठी शेट्टी यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टिमला शुभेच्छा दिल्या.
मराठीकडे वळताना एका केवळ करमणूकप्रधान चित्रपट न बनवता महाराष्ट्रातील दाहक वास्तवावर आधारित चित्रपट बनवण्याचा विचार पूर्वीपासूनच होता असं मत इंदरपाल सिंग यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राचं राजकारण जवळून पाहताना त्यातील अनेक खाचखळगे जाणवत होते. त्यावर आपण ‘राष्ट्र’ची कथा लिहिल्याचं इंदरपाल म्हणाले. जातियवाद आणि आरक्षणासारखा विषय निर्भिडपणे पडद्यावर मांडण्यासाठी इंदरपाल यांनी विक्रम गोखले, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, रोहिणी हट्टंगडी, रीमा लागू, संजय नार्वेकर, यतिन कार्येकर, दिपक शिर्के, गणेश यादव आणि सिया पाटील हे मराठीतील आघाडीचे कलावंत निवडले. या सर्व कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये जीव ओतला असल्याचं इंदरपाल म्हणाले. ‘राष्ट्र’चं चित्रीकरण पूर्ण झालं असून पोस्ट प्रॉडक्शनचं काम वेगात सुरू आहे. निखिल कामत यांनी या चित्रपटाला संगीत दिलं आहे.