उस्मानाबाद नाट्य संमेलनामध्ये शुभारंभाचा प्रयोग
सुप्रसिद्ध नाटककार सुरेश जयराम यांचं १९९० साली गाजलेलं ‘षड्यंत्र’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. जवळ जवळ २७ वर्षांनंतर हे नाटक पुन्हा त्याच जोमात व जोशात आताच्या दिग्गज दिग्दर्शक व कलावंतांसोबत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे.
अनिषा क्रिएशन्स निर्मित व मल्हार प्रकाशित, निर्माते मिलिंद मोरे आणि अभिनेता सुचित जाधव “षड्यंत्र” या रहस्यमय, थरारक नाटकाची निर्मिती करीत आहेत. अभिनेता –दिग्दर्शक अरुण नलावडे या नाटकाचं दिग्दर्शन करीत असून अभिनेत्री सिया पाटील, सुचित जाधव, सुदेश म्हशीलकर आणि रमेश भाटकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. हया नाटकाची तालीम सध्या जोरात सुरू असून शुभारंभाचा प्रयोग दि. २१ एप्रिल रोजी उस्मानाबाद येथे होणार्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये होणार आहे.
‘षडयंत्र’ हे नाटक एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात मिळकतीसाठी होणारा संघर्ष व त्यातून होणारे खून, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अशा गुंतागुंतीच्या कथानकावर आधारित आहे. या नाटकात अनेक धक्के आणि वळणे आहेत. त्यातून शिकार कोण आणि शिकारी कोण या संभ्रमात पडलेल्या प्रेक्षकांना खर्या अर्थाने एक रहस्यमय कलाकृती पाहिल्याचे समाधान देणारे नाटक आहे. गेली अनेक वर्ष आपल्या वेगवेगळ्या भूमिकेद्वारे रसिकांच्या मनावर राज्य करणारे अष्टपैलू अभिनेते अरुण नलावडे बर्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा या नाटकाद्वारे नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात उतरले आहेत. अभिनेता सुचित जाधव या नाटकाद्वारे निर्मितीक्षेत्रात उतरले असून या नाटकात ते अभिनयही करणार आहेत. याआधी त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकातून तसेच अनेक मालिका व चित्रपटातून आपली छाप पाडली आहे.
निर्माते मिलिंद मोरे प्रथमच या नाटकाद्वारे निर्मितीक्षेत्रात उतरले असून सुचित जाधव यांच्यासोबत ही भव्य निर्मिती करीत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील या नाटकाद्वारे प्रथमच रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. अनेक मालिका आणि नाटकातून लेखन, अभिनय तसेच दिग्दर्शनक्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करणारे सुदेश म्हशीलकर यांची या नाटकात महत्वपूर्ण भुमिका आहे. लोकप्रिय अभिनेते रमेश भाटकर या नाटकात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. योगायोग म्हणजे याआधीच्या ‘षडयंत्र’ नाटकात त्यांनी तीच भुमिका केली होती. २७ वर्षांनंतर पुन्हा त्याच नाटकात तीच भुमिका करण्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. सोबत ऋषीकेश दळी, केवलानंद बर्वे, वासंतिका वाळके, प्रगती घाणेकर, माधुरी जोशी, देवेंद्र वाघमारे, यांच्याही यात भूमिका आहेत. या नाटकाचे नेपथ्य प्रकाश मयेकर, संगीत प्रबोध शेटये, वेशभूषा पुर्णिमा ओक, प्रकाश योजना राजन ताम्हणे यांची असून सूत्रधार संतोष शिदम आहे. दमदार कथा, उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शन या जोरावर एक काळ गाजवलेले हे रहस्यमय नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर रसिक प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास येत आहे.
प्रकाश बुद्धीसागर दिग्दर्शित, अभिनेते चंदू पारखी, रमेश भाटकर, डॉ. गिरीश ओक, सविता प्रभूणे, प्रमोदीनी कदम, सुजाता कानगो, संदीप मेहता अभिनीत या नाटकाने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळविली होती.