गाथा अभिमानाची… महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची
झी युवा ही नवीन मराठी वाहिनीवर लवकरच ‘शौर्य – गाथा अभिमानाची’ ही मालिका सुरु होणार असून याद्वारे आपले रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या कार्याला सलाम केला जाणार आहे,
महाराष्ट्र पोलिसांचे अकल्पनीय शौर्य, पोलिसांच्याच दृष्टीने आणि त्यांच्याच मदतीने सांगितले जाणार आहे. या मालिकांमध्ये हाताळलेले संवेदनशील विषय, सामान्य नागरिकांच्या नजरेसमोर जसेच्या तसे उभे करण्यासाठी, आता त्या घटनांचे खरेखुरे साक्षीदारच, त्या घटना तेव्हा कश्या घडल्या? तेव्हाची नाजूक परिस्थिति कशी होती? तेव्हाच्या पोलीस अधिका-यांची मानसिकता काय होती?… या आणि अश्या अनेक गोष्टींची गाथा अत्यंत अभिमानाने झी युवावर सांगतील.
या कार्यक्रमाच्या निर्मितीबाबत बोलताना झी युवाचे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले कि ‘महाराष्ट्र पोलीस गेली कित्येक वर्ष प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीशी सामना देत उत्कृष्टरित्या कायद्याचे रक्षण करीत आहेत. विविध प्रकारच्या केसेस सोडवताना मीडियाच होणारं सततच प्रेशर, कामाच्या प्रेशरमुळे फॅमिलीला न देता येणारा वेळ, त्यात लोकांच्या अपेक्षांचे असह्य होणारे ओझे हे पोलिसांना भंडावून सोडते. पण तरीही अनेक अडचणींना, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही तोंड देत महाराष्ट्र् पोलीस धैर्याने उभा आहे आणि गुन्हेगारीशी शौर्याने लढतही आहे. अश्या धाडशी महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्यगाथा लोकांसमोर आणि मुख्यतः आजच्या पिढीसमोर येणं खरंच महत्वाचं आहे. हे शौर्य लोकांकडून नावाजलं जाणं महत्वाचं आहे. झी युवा, अश्या धाडशी महाराष्ट्र पोलिसांना सलाम करते आणि त्यांना गौरवण्यासाठीच ‘शौर्य – गाथा अभिमानाची’ हा कार्यक्रम सादर करीत आहे.’
विसरायचं जरी म्हंटल तरीही आपल्या मनावर आघात करणाऱ्या अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या केसेस आहेत – केस २६ नोव्हेंबर आणि मन्या सुर्वे एन्काऊंटर, यावेळी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांचे दाखवलेले शौर्य, केस चार्ल्स शोभराज, ज्यात पोलीस अधिकारी मधुकर झेंडेच शौर्य, केस १९९३ बॉम्बस्फोट – टायगर मेमन, ज्यात पोलीस अधिकारी राकेश मारिया यांचे शौर्य, पहिल्या महिला डिटेक्शन अधिकारी हिरेमठ मॅडम यांची गुन्हेगारी विरोधातील कारकीर्द हे शौर्य खरंच उल्लेखनीय आहे.गुन्हेगारी विश्वाने अख्खा महाराष्ट्र हादरवला पण तेव्हाही सांभाळला तो महाराष्ट्र पोलिसांनीच. या आणि अश्या अनेक शौर्य गाथा झी युवावर प्रेक्षकांना, पोलिसांच्या नजरेतून पुन्हा जगायला मिळतील.
‘शौर्य – गाथा अभिमानाची’ या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंटचे सचिन मोहिते असून, लेखन अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे , छायांकन शाहिद आणि संगीत अमितराज यांनी केले आहे.