‘पुढचं पाऊल’ने घेतले नवे वळण
सरदेशमुखांच्या घरात नेमक्या कुठल्या सुनेचे वर्चस्व निर्माण होणार याची चुरस तिन्ही सुनांमध्ये लागलेली आहे. दुसरीकडे हे घर कधीच तुटू न देण्याचा अक्कासाहेबांचा निश्चयही तितकाच ठाम आहे, आता नेमके काय होणार याची खरी उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
गेली पाच वर्ष रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्टार प्रवाहच्या पुढचे पाऊल या मालिकेने आता नवे वळण घेतले आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता प्राईम टाईमची सुरवात करणाऱ्या या मालिकेत अक्कासाहेबांच्या घरात आधुनिक विचारांचा पुरस्कार करणारी सायली ही नवी सून आल्याने एक वेगळेच नाट्य रंगते आहे.
ऑस्ट्रेलियावरून भारतात लग्न करून आलेली रोहितची बायको ‘सायली’ ही मुळातच व्यावहारिक, सडेतोड, आपली मुलगी आणि नवऱ्याबाबतीत निर्णयांवर ठाम असलेली, बिझनेसमध्ये पारंगत असलेली त्यामुळे या सुनेमुळे सरदेशमुखांच्या घरात खटके उडायला सुरवात झालीये पण तिची मत मात्र चुकीची नाहीत तर ती व्यावहारिक आहेत. घरात पहिल्यांदाच कोणीतरी अक्कासाहेबांच्या विरोधात बोलणार असल्यामुळे याचे परिणाम काही दिवसांपूर्वीच सून म्हणून घरात आलेल्या तेजस्विनीवर व्हायला लागले.
घरातील नियमांबद्दल कोणीतरी बोलायला आलं याचा तिला आनंदच होतो पण सायलीही तिला वाऱ्याला उभी करत नसल्यामुळे तिची कुरघोडी कल्याणीवर व्हायला लागली. कल्याणी मुळातच शांत, भोळी भाबडी, लगेच कुणाच्या तरी गोड़ बोलण्यात फसणारी त्यामुळे तेजूने हिचा फायदा घायला सुरवात केली. सुनांच्या या कुरघोडीच्या स्पर्धेत कल्याणीच्या वाट्याला हार आली तर घरातील तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. अक्कासाहेबांचा कल्याणीला कायमच पाठिंबा असतो पण व्यावहारिकपणा आणि भावनिकता यांच्यात नेहमी व्यवहारच विजयी होतो हे मात्र त्या जाणून आहेत त्यामुळे कल्याणी विषयीची चिंता त्यांना आहे.