वनिता जाधव यांचे ‘सोल इन स्टोन’चे प्रदर्शन!
पुण्याच्या प्रसिद्ध कलावंत वनिता जाधव यांनी आविष्कारित केलेल्या महाराष्ट्रातील कला संस्कृतीचे वैभव सांगणारे ‘सोल इन स्टोन’ हे प्रदर्शन १६ नोव्हेंबरपासून मुंबईतील जहांगीर कलादालनात सुरु होत आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत या प्रदर्शनातील डिजिटल प्रयोग कलारसिकांना निशुल्क बघता येणार आहे,
महाराष्ट्रातील वाई येथील कला शिल्पे, नैसर्गिक कला वैभव आणि वारसा पर्यटन अजरामर राहावेत यासाठी काही कलावंत काम करत असतात. याच चळवळीत काम करणाऱ्या रंगलेखिका, छायाप्रकाश चित्रांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या कलावंत म्हणून वनिता जाधव यांचे नाव आदराने घेतले जाते. भारतीय कलेचा वारसा समाजमनात रुजावा, त्याचे संगोपन संवर्धन व्हावे, यासाठी त्या सतत कार्यरत आहेत. याच कार्याचा एक भाग म्हणून त्यांनी वाई येथील शिल्पे व वास्तूंच्या संवर्धनासाठी जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. त्याच चळवळीचा एक कलात्मक आविष्कार त्या ‘सोल इन स्टोन’ या प्रदर्शनातील कलाकृतीत मांडणार आहेत.
ही चित्रे आनंद देणारी शिल्पांची स्पंदने तर आहेतच, त्याशिवाय आपल्याच संस्कृतीबद्दल प्रत्येकाच्या मनात सार्थ स्वाभिमान जागृत करणारीही ठरणार आहेत. हा अभिमान पुढच्या पिढ्यांपर्यंत अजरामर राहावा, हा या कलाकृतींच्या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.
निसर्ग माणसाला जगण्याची प्रेरणा देत असतो. त्या निसर्गात असणाऱ्या वेगवेगळ्या ऊर्जा माणसाची जगण्याची उमेद वाढवत असतो. हे उमेद वाढवण्याचे काम अश्मयुगातील कलावंतांनी केले आहे. दगडांमध्ये कोरलेली अनेक मंदिरे, लेणी, वास्तू आपली श्रद्धास्थाने आहेत, ती पौराणिक स्थापत्यकला टिकवून ठेवणे, त्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याच्या जबाबदारीची जाणीव हे प्रदर्शन करणार आहे.
वनिता जाधव यांनी आजवरच्या ४५ वर्षांच्या कलाप्रवासात कलाविष्काराच्या माध्यमातून देश-विदेशातील कलाप्रेमींची मने जिंकून घेतली आहेत. त्या प्रदर्शनांना रसिकांनी उत्तुंग प्रतिसाद दिला आहे. त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला आहे.
वनिता जाधव यांना लहानपणापासून निसर्गातील झाडांचा आपल्या स्मृतीत संग्रह करण्याचा, त्यांना आठवून त्याचा आनंद घ्यायचा छंद आहे. तेवढेच आकर्षण त्यांना दगड, धोंडे, गोट्यांचे राहिले आहे. वेगवेगळ्या रंगांचे दगड त्यांच्या संग्रहात आहेत. अश्मयुगात अशाच दगडांनी माणसाचे जगणे बदलले. दगडांची चूल, भांडीकुंडी, हत्यारे, शस्त्रे, चाक, दागिने, निवाऱ्यांची सोय आणि आपल्या सृजनशीलतेला हाक घालून दगडाला कलावंतांनी देवरूपही दिले आहे. विज्ञानाचा उगम झाला. दगडाचा देव झाला आणि माणसाला पूजेचा छंद निर्माण झाला.
अश्मयुगातील आपल्या पूर्वजांनी दगडावर उदंड प्रेम केले. तेच प्रेम, तीच ओढ, आकर्षण, आस अजूनही आपल्या रक्तात खेळत आहे. तोच सौंदर्यभाव वनिता जाधव यांच्यात तंतोतंत कॅनव्हासवर उतरवलाय. त्यांची सौंदर्यपूजक वृत्त्ती त्यांना या कलेत गुंतवणारी ठरते.
वनिता जाधव यांचा जन्म सह्याद्री कुशीतील वाई येथे झाला. त्यामुळे त्यांची निसर्गावर अपार श्रद्धा आहे. घाटातील काळानिळा कातळ, पावसाळ्यातील हिरवाई त्यांनी आपल्या मनात साठवून ठेवली आहे.
आर्टिस्ट वनिता जाधव ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज’च्या ‘इंटक वाई पाचगणी चॅप्टर’च्या convener आहेत.
भारतीय सांस्कृतिक निधी संस्थेच्या ‘वाई पाचगणी अध्याय’यांच्या समन्वयक आहेत. भारतीय सांस्कृतिक वारश्याच्या जतन, संवर्धनाचे त्या काम पाहतात. त्याच प्रेरणेतून वारसा पर्यटनाचे महत्व वाढावे, आडवाटेवरील वास्तू-कला लोकांनी पाहाव्यात याच उद्धिष्टातून हा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे.
त्यांच्या कलाप्रवासातील ४५ वर्षांचा अनुभव पाहता त्यांनी वेगवेगळे प्रयोग कसे हाताळले आहेत, हे लक्षात येते.
एका छोट्या खेड्यातून येऊन न्यूयार्कच्या ब्रॉडवेवर कलेचे शिक्षण त्या सातत्याने घेत असतात. त्यांची दोन्ही मुले न्यूयार्कमध्ये वास्तव्य करीत असल्यामुळे दरवर्षी न्यूयार्कला जाणे ही त्या कलेच्या शिक्षणाची मिळालेली संधी समजून’आर्ट स्टुडंट लीग ऑफ न्यूयार्क’ याच्या सभासद आहेत. हे कॉलेज त्यांच्या प्रेरणेचा श्रोत समजतात. सामाजिक कार्यातील तळमळ बघून नुकताच २०१६ मध्ये त्यांना ‘वाई गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
वनिता जाधव म्हणतात…
‘महाराष्ट्र हे ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या वैभवसंपन्न राज्य आहे. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे, कृष्णा, कोयना नद्यांची समृद्ध खोरी महाराष्ट्राच्या प्राकृतिक सौंदर्याची साक्ष देतात. येथील कोरीव लेणी हे महाराष्ट्राचे भूषण व महाराष्ट्राची समृद्धी आहे. वारसा पर्यटन अलौकिक आहे. ही प्रेक्षणीय स्थळे धार्मिक तीर्थक्षेत्रे अलौकिक आहेत.
ही लेणी आध्यात्मिक शिक्षणाची व वास्तुशास्त्र संशोधनाची प्राथमिक केंद्रे निर्माण करताना धनिक मंत्रिगणांबरोबर सामान्य माणसांचाही हातभार लाभलेली आहेत.
लेण्यांचे योग्य संवर्धन व जतन करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हा अमोल ठेवा आणि त्याची दुरुस्ती, डागडुजी करून हजारो वर्ष भावी पिढ्यांसाठी जतन होईल, त्याचा हा प्रयत्न.
‘सह्याद्रीच्या काडेकपारीवरील मावळा सह्याद्रीसारखाच कणखर आहे. महाराष्टीयन माणसाचे स्वभावधर्म कोणी घडवलेच असेल ते आधी भूगोलाने आणि नंतर इतिहासाने. मनुष्य वास्तुकला घडवितो आणि वास्तुकला माणसाला घडविते. कलेच्या, वास्तुकलेच्या अवशेषांवरून पूर्वी घडलेल्या मनुष्य जीवनाचा परिचय होतो. मानवाची भौतिक व मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती. आध्यात्मिक व आधिभौतिक शक्तींना सामाजिक जीवन उपयुक्त बनवण्यासाठी कला म्हणजे संस्कृती.’