‘देऊळ बंद’च्या यशानंतर रंगभूमीवरील आगळा प्रयोग
‘देऊळ बंद’ या यशस्वी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि गीतलेखक असलेले प्रणित कुलकर्णी ’सुरक्षित अंतर ठेवा’ या नाटकाद्वारे रसिकप्रेक्षकांच्या पुनर्भेटीला आले आहेत. १६ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे येथे या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर झाला.
नाटकाची संकल्पना प्रणित कुलकर्णी यांची असून लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन देखील त्यांनीच केले आहे.
आजच्या ‘टेक्नोसॅव्ही’ जमान्यात ‘अरेंज मॅरेज’ विरुद्ध ‘लव्ह मॅरेज’ असा खटला जर भरला गेला तर काय होईल याचे उत्कंठावर्धक सादरीकरण या नाटकातून करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे एक साचेबद्ध नाटक नसून नाटकाच्या फॉर्ममध्ये, सेटमध्ये वेगळेपण जपण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे. नाटकामध्ये संगीत, नृत्य यांचा मनोरंजनात्मक पद्धतीने समावेश केला गेला आहे. नाटकामधील गाण्यांमध्येदेखील कमालीचे वैविध्य असून जुनी गाणी, काही विडंबनात्मक गाणी तसेच एक लावणी यांचे एक भन्नाट कॉम्बिनेशनच आहे.
नाटकामध्ये पुष्कर श्रोत्री, माधवी निमकर, निखील राऊत, सचिन देशपांडे, तन्वी पालव, संदीप जंगम, सीमा घोगळे हे कलाकार आणि शुभांगी मुळे, गौरव बोरसे हे गायक आहेत.
जय मल्हार प्रकाशित, अष्टविनायक प्रकाशित असणारे हे नाटक शुभांगी मुळे आणि नितीन मुळे यांच्यातर्फे सादर झाले. गीतलेखन स्वतः प्रणित कुलकर्णी यांनी केले असून संगीत रोहित नागभिडे यांचे आहे. नाटकाचा ‘टेक्नो सेट’ सुमित पाटील यांनी साकारला आहे.