कथा मातृत्वाची, संघर्षाची, त्यागाची आणि जिद्धीची
पद्मश्री डॉ. तात्या लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देणारा आणि त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा ‘डॉ. तात्या लहाने| अंगार… पॉवर इज विदीन’ या चित्रपटाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटतच चाललाय. अश्या या चित्रपटाच्या गाण्याचा दिमाखदार प्रकाशन सोहळा सिटी लाइट बँक्वेट्स माहीम (पश्चिम) येथे करण्यात आला.
या सोहळ्याला मकरंद अनासपुरे, अलका कुबल, डॉ. निशिगंधा वाड, साधना सरगम, चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते विराग मधुमालती वानखडे, सहाय्यक निर्मात्या वंदना वानखडे, चित्रपट सादरकर्ते रीना अग्रवाल, समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया आदी मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटाने रिले सिंगिंगच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विश्वविक्रम नोंदविलेल्या ‘काळोखाला भेदून टाकू जीवनाला उजळून टाकू’ या गीताचे साधना सरगम आणि विराग यांनी सादरीकरण करून आनंद द्विगुणीत केला. संपूर्ण महाराष्ट्रातील गावा-गावात व खेड्यापाड्यात या चित्रपटाचे प्रमोशन सुरु असून अतिशय भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच शाळा व महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप बुकिंग केले आहे. लायन व रोटरी क्लब तर्फेदेखील गरीब विद्यार्थ्यांना व आश्रम शाळांना या चित्रपटाचा लाभ घेता यावा म्हणून ग्रुप बुकिंगची मागणी केली आहे.
‘डॉ. तात्या लहाने … अंगार… पॉवर इज विदीन” हा चित्रपट विराग मधुमालती एंटरटेनमेंट निर्मित असून, तो १२ जानेवारी २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डॉ. तात्या लहाने यांच्या जीवनावर प्रक्षेपित केला असून, कसे त्यांनी बिकट परिस्थितीचा सामना करत आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व या क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे तसेच त्यांच्या आईने स्वतःची एक किडनी तात्यांना दान करून त्यांना पुनर्जन्म देऊन समाजाला अवयव दानाचा महत्वपूर्ण संदेशही यातून दिला आहे.
डॉ. लहानेंचा ध्यास, कष्ट, संघर्ष व त्यांच्या आईची त्यांना मिळालेली साथ एकूणच त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना इतरांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत.
डॉ. तात्या लहाने यांची ही ‘बायोपिक’ आजच्या तरुणाईसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. हा चित्रपट समाजाला नवीन दिशा व विद्यार्थी वर्गाला नवचैतन्य व प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास चित्रपटाच्या विशेष सादरीकरणानंतर समाजातील प्रत्येक घटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
‘का रे माझ्या मना छळतोस तू मला” हे तात्यारावांच्या जीवनातील अनेक उतार चढाव दर्शविणारे गीत केतकी माटेगावकर व विराग यांच्या आवाजात आहे. तसेच त्यांच्या बालपणीचा कठोर संघर्ष व त्यांची जिद्द “झाले घाव जरी काळजा तरी..हूर हूर ना आता या जीवा” या गीताद्वारे मांडण्यात आली आहे. चित्रपटाचे संगीत ‘एक हिंदुस्तानी’ नामक संगीतकाराने दिले असून, त्यांनी आपले नाव गुपित ठेवून तात्यांच्या कार्याला आपल्या संगीताद्वारे मानवंदना दिली आहे.
चित्रपटाचे पार्श्वसंगीत समीर – सचिन यांचे असून विराग मधुमालती व राहुल साळवे यांनी गाणी स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे हे डॉ. लहाने यांच्या प्रमुख भूमिकेत असून, अलका कुबल ह्या त्यांच्या आई अंजना बाईंच्या भूमिकेत आहेत. डॉ. रागिणी पारेख यांच्या भूमिकेत डॉ निशिगंधा वाड असून भारत गणेशपुरे व रमेश देव यांनीही विशेष भूमिका साकारल्या आहेत.