कॅप्टन नीलेश गायकवाड यांची माहिती
शिवसंघ प्रतिष्ठानच्या सहकार्याने विश्व मराठी परिषद गेली सात वर्षे वैश्विक स्तरावर मराठी साहित्य संमेलन आयोजित करत आहे. यंदाचे म्हणजेच आठवे विश्व साहित्य संमेलन संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष कॅ. नीलेश गायकवाड यांनी दिली आहे.
निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले हे या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत; तर माजी पोलिस महासंचालक सुरेश खोपडे हे उद्घाटक असणार आहेत. या संमेलनासाठीच्या लोगोचे अनावरण नुकतेच पुण्यातील पत्रकार भवनमध्ये पार पडले. त्यावेळी कॅ. गायकवाड बोलत होते.
ते म्हणाले, ‘ मराठी साहित्य हे अफाट आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील विषयाला अनुसरून लिहिलेल्या मराठी साहित्यालादेखील योग्य न्याय मिळावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून हे संमेलन विषयकेंद्रित करण्यात आले. गतवर्षीच्या संमेलनाचा विषय ‘वैद्यकीय क्षेत्रातील लेखन’ असा होता आणि त्या संमेलनाला वैद्यकीय क्षेत्रातील लेखकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यंदाच्या वर्षी ‘भारताचे संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा’ हा असणार आहे. निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांच्यासारख्या संरक्षण खात्यात देशासाठी आयुष्य वाहिेलेल्या एका थोर व्यक्तीने यंदाच्या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे या संमेलनाची उंची वाढेल यात शंका नाही.”
आखातात होणार्या या संमेलनामध्ये पुण्यातील ‘आकार’ संस्थेची मुले देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत. दुबई आणि अबुधाबी येथे कार्यरत असणार्या ‘गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरम’ या संस्थेने या संमेलनास निमंत्रित केले असून विश्वपांथस्थ आणि ग्रंथ आपल्या दारी या संस्थादेखील संमेलनात सहभागी होत आहेत. याखेरीज अन्य मराठी साहित्य संस्थांनी, साहित्यिकांनी, साहित्य रसिकांनी, साहित्यप्रेमींनी या संमेलनामध्ये सहभागी होऊन वैश्विक स्तरावरील मराठीच्या जागराची शान वाढवावी असे आवाहनही कॅ. नीलेश गायकवाड यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाला विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष श्रीपाद जोशींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.