नाट्य संमेलनाध्यक्ष फय्याज यांची कृतज्ञता
बेळगावात संपन्न होत असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती फैय्याज यांचे अध्यक्षीय भाषण…
मी फैय्याज. आजच्या नाटय़संमेलनाची अध्यक्षा, अभिनेत्री आणि गायिका. तुम्हा सर्व नाटय़रसिकांना वडीलधा-यांना,सर्व रंगकर्मिंना आदरपूर्वक, प्रेमपूर्वक प्रणाम करते.
मी अभिनेत्री, गायिका असले तरीही लेखिका, समीक्षक नाही. एक कलावंत आणि रसिक प्रेक्षक म्हणून मी आज बोलणार आहे. गेली ५० वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असल्यामुळे माझ्या संग्रही काही अनुभव जमा झाले आहेत. तसेच एक रसिक प्रेक्षक म्हणून मी अनेक नाटकांचा आस्वादही घेतलेला आहे. त्या अनुषंगानेच मी तुमच्याशी हितगुज करणार आहे, गप्पा मारणार आहे, माझे विचार मांडणार आहे.
आपल्या मराठी रंगभूमीला समृद्ध परंपरा आहे, तिला स्वत:ची म्हणून एक संस्कृती आहे. मराठी नाटय़आविष्काराच्या विविध पद्धती आहेत. आपली रंगभूमी विविध स्तरांवर, पातळयांवर काम करते आहे.
मला असं वाटतं की मराठी रंगभूमी ही एखाद्या विशाल वटवृक्षासारखी आहे. जिला अनेक शाखा आहेत, मुळं आहेत. त्या सगळ्यांच्या सहकार्याने, प्रेरणेने, प्रयत्नाने या रंगभूमीचा महान वृक्ष चैतन्याने सळसळतो आहे. आपण असे म्हणूया की बाल, हौशी, कामगार, प्रायोगिक/समांतर, लोककला, संगीत आणि व्यावसायिक या नाटय़वृक्षांच्या शाखा आहेत. आणि मुळं आहेत ती भारतीय संस्कृतीची, परंपरेची.
मी या विविध प्रकारच्या शाखांचा माझ्यापरीने धांडोळा घेणार आहे. माझे त्यात असलेले योगदान नमूद करणार आहे. त्याची बलस्थाने, पूर्वीची स्थिती, सद्य:स्थिती आणि त्यातल्या त्रुटी, उपाय माझ्या बुद्धीनुसार, क्षमतेनुसार मांडणार आहे.
माझी एकच एक इच्छा आहे की आपली ही मराठी रंगभूमी सर्वार्थानं समृद्ध व्हावी, संपन्न व्हावी, परिपूर्ण व्हावी,आशयघन व्हावी आणि तिचा लौकिक त्रिखंडात पसरावा.
बालरंगभूमी
मी मुंबईत आले तेव्हा बालरंगभूमीवर अनेक बालनाटय़ जोरात चालू होती. तेव्हां सुधाताई करमरकर हे नाव प्रकर्षाने चमकत होते. त्यांच्या अनेक बालनाटय़ांसाठी तेव्हा मी गायले होते. रंगभूमीवरच्या अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंतांनी त्यात भूमिका केल्या होत्या. वानगीदाखल दोन नावे सांगते – काशिनाथ घाणेकर, भक्ती बर्वे.
तसेच सुलभा देशपांडे, रत्नाकर मतकरी, आविष्काराचे काकडेकाका यांनीही बालरंगभूमीसाठी खूप काम केलं आहे.‘दुर्गा’ झाली गौरी’ हे त्या वेळेचे एक जबरदस्त लोकप्रिय बालनाटय़ होते. पुण्यात ग्रीप्स नाटय़चळवळ ही मुख्यत:रूजविली ती रंगा गोडबोले, विभावरी देशपांडे आणि इतरांनी. तसेच गौरी केंद्रे आणि कांचन सोनटक्के यांचेही मोठे योगदान आहे.
परंतु आज बालनाटय़ चळवळ काहीशी थंडावली आहे. तसेच तिच्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याची कारणे माझ्या मते अशी आहेत –
१. आजकालच्या मुलांना अधिक चॉईस आहे.
२. तंत्रज्ञानामुळे टीव्ही आणि मोबाईल प्रगत, आधुनिक झाला आहे. त्यावर घरबसल्या विविध रियालिटी शोज,सिनेमा, गाणीबजावणी, एॅनिमेशन फिल्मस् बघता येतात.
३. जीवनाचा वेग वाढला आहे.
४. मुलांवर शिक्षणाचे ओझे आहे. त्यांना थिएटरवर जाऊन बालनाटय़ बघायला वेळ नाही.
५. बालनाटय़ सादर करायला खूप खर्च येतो. थिएटर भाडे, नेपथ्य, पोशाखखर्च संस्थांना आजकाल परवडत नाही.
६. आज जमाना इन्स्टंटचा आहे. मुलांच्या पालकांकडे वेळ नाही. बालनाटय़ाची तालीम करा, वेळ द्या, यात त्यांना आणि मुलांना रस नाही. त्याऐवजी रियालिटी शोज मध्ये भाग घेतला, प्रसिद्ध असलेल्या गाण्यावर हिरो हिरॉईनप्रमाणे नृत्य केले की लगेच प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. महागायक, महागायिका, महानर्तकी होता येते.फारसे कष्ट न करता, विनासायास सर्व मिळते. मग कशाला बालनाटय़ करा असा एकूण सूर असतो.
उपाय –
१. शासन आणि नाटय़परिषदेने संयुक्तपणे बालनाटय़ चळवळीला उत्तेजन देणे.
२. आर्थिक तरतूद करणे आणि सवलतीत थिएटर मिळवून देणे.
३. शाळांचे मुख्याध्यापक, प्रतिनिधी यांच्याशी सल्लामसलत करून बालनाटय़ाची जोपासना करण्याचे प्रयत्न करणे.
४. बालनाटय़ लेखकांकरिता कार्यशाळा घेणे.
५. सबंध महाराष्ट्रभर बालनाटय़ चळवळीचा प्रसार करण्याकरिता त्या क्षेत्रातल्या तज्ञांची समिती नेमणे व प्रत्यक्ष कार्यवाही करणे.
७. उद्याच्या रंगभूमीवरचे कलाकार हे बालनाटय़ातूनच निर्माण होणार आहेत याचा विचार करून राज्यस्तरीय बालनाटय़ स्पर्धाचे आयोजन करणे. या स्पर्धा पुण्या-मुंबईपुरत्याच मर्यादित न राहता गावागावातून घेतल्या जाव्यात.
हौशी रंगभूमी / कामगार रंगभूमी
हौस म्हणून नाटकात काम करणारे जे असतात त्यांची रंगभूमी म्हणजे हौशी रंगभूमी. माझ्यावेळी गावागावात अशी अनेक मंडळे होती. बहुतांशी ही मंडळी पूर्वीचे गाजलेले एखादे नाटक रंगमंचावर सादर करायची. मुंबईत त्याला बहुतकरून क्लबची नाटके म्हणतात. नाटक करण्याची जबरदस्त आवड असणारी ही मंडळे, प्रसंगी स्वत:चे पैसे घालून, वेळ खर्च करून, नाटक करण्याची हौस भागवत असतात. विविध कॉलेजच्या गॅदरींगमध्ये आणि गणेशोत्सवात सादर होणारी नाटके, एस्.टी. नाटय़ मंडळ किंवा रेल्वे ग्रुप नाटक मंडळी ही खरी हौशी नाटय़ मंडळी.
मी मूळची सोलापूरची. जेव्हा मी १५ वर्षाची होते तेव्हा रेल्वेच्या नाटय़मंडळामधून पहिल्यांदा काम केले. तेव्हा जो माझ्या तोंडाला रंगभूमीच्या रंगाचा स्पर्श झाला तो अजूनही तसाच आहे. या रंगभूमीच्या रंगस्पर्शानेच माझ्या आयुष्याला ख-या अर्थाने रंगत आणली आहे.
मी नृत्य करायची, गायची पण नाटकातला अभिनय मला नवा होता. सुरुवातीला मला भीती वाटायची, संवाद कसे पाठ करणार याची काळजी वाटायची. पण नंतर रेल्वेतल्या लोकांनी ‘ललित कला मंदिर’ ही संस्था स्थापन केली व त्यांच्या अनेक नाटकातून काम करण्याची संधी मला मिळाली. फैय्याज नावाच्या एका अभिनेत्रीने आयुष्यात जे नाव कमावले त्याची पार्श्वभूमी ही आहे.
कामगार रंगभूमी
कामगार रंगभूमी ही मुख्यत: विविध कंपन्यांच्या पािठब्यामुळे गाजली, बहरली. अनेक कंपन्या, उदा. टाटा, बजाज,किर्लोस्कर, एस.के.एफ. यांनी कामगारांच्या कलागुणांना दाद देण्याकरिता कामगार नाटय़मंडळे स्थापन केली.राज्यशासनाच्या कामगार स्पध्रेत ही नाटय़मंडळे हिरीरीने उतरायची व नाटके सादर करायची. आजचे रंगभूमीवरचे अनेक यशस्वी, अभिनयकुशल नट हे कामगार रंगभूमीवरूनच आले आहेत. दिवंगत नट यशवंत दत्त हे त्यातील एक महत्त्वाचे नाव.
हौशी आणि कामगार रंगभूमीच्या अडचणी
१. टीव्ही. मोबाईलमुळे घरबसल्या करमणूक होते.
२. एक नाटक सादर करणे हाच इतका मोठा व्याप असतो की त्याकरिता फार वेळ खर्च करावा लागतो. सध्याच्या वेगवान जीवनचक्रामुळे माणसांकडे पैसा असतो पण वेळ नसतो.
३. कंपन्यांची कामगार नाटय़ मंडळे ही नामशेष होत आलेली आहेत.
४. कला सादर करण्यासाठी नाटकाव्यतिरिक्त इतर अनेक माध्यमे आहेत.
उपाय
१. नाटकाची आवड जोपासण्याकरिता शाळा कॉलेजातून प्रयत्न करणे.
२. नाटक करणे हा ध्यास असतो, ते एक वेड असते आणि वेड किंवा ध्यास हा निर्माण करता येत नाही. चाळीस वर्षापूर्वी जे आवडत होते, लोकप्रिय होते ते आत्ताही आवडेल याची काहीच शाश्वती नाही. त्याकरिता काळानुसार नाटकामध्ये बदल केला पाहिजे.
३. राज्यनाटय़ स्पर्धा करत राहणे हा उद्देश ठेऊन नाटक करणे हेही काही वाईट नाही. परंतु त्याहीपलिकडे जाऊन नाटकाचा मूलभूत विचार करणे, मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा नाटकासाठीच उपयोग करणे आवश्यक आहे.
४. कंपन्यांनी कामगारांच्या कलागुणांना उत्तेजन देण्याकरिता सांस्कृतिक मंडळे स्थापन करणे.
प्रायोगिक / समांतर रंगभूमी
माझ्या आकलनाप्रमाणे प्रायोगिक/समांतर रंगभूमी म्हणजे एखादा विषय, विचार नव्या पद्धतीने मांडणे. त्याचे सादरीकरण वास्तववादी आणि प्रायोगिक पद्धतीने करणे. प्रयोगशीलता हा मूळ पाया त्यात अंतर्भूत असतो. बहुतांशी प्रायोगिक/समांतर नाटकात प्रेक्षकांना काय आवडते याचा विचार करण्यापेक्षा विषय आणि आशयाकडे अधिक लक्ष दिले जाते.
काही नाटय़वेडे एकत्र येतात, संस्था स्थापन करतात आणि नाटक करतात. त्यातून संस्थेला आणि कलाकारांना अर्थप्राप्ती व्हावी हा मूळ उद्देश नसतो. तसेच या संस्थेतील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनही वेगळे असते. नाटक ते अर्थार्जनासाठी करत नाहीत तर स्वत:ला व्यक्त करण्यासाठी करतात. काही संस्थांमध्ये मानधन दिले जाते. परंतु ते सगळयांना सारखेच असते. प्रसिद्धी, लोकप्रियता हा निकष नसतो.
आपल्याकडे व्यावसायिकता या शब्दाबद्दल थोडासा गरसमज आहे. व्यावसायिकता म्हणजे पैसे देऊन कलानिर्मिती करणे. पण हा फार संकुचित अर्थ आहे. व्यावसायिकता म्हणजे पूर्ण निष्ठेने, बिनचूक, तन्मयतेने, निर्दोष नाटय़ निर्मिती करणे, त्यासाठी क्षमतेनुसार, लोकप्रियतेनुसार, प्रतिभेनुसार योग्य ते मानधन घेणे. बहुतांशी व्यावसायिक कलाकारांचे उपजिविकेचे साधन नाटकच असते.
एखादा नाटय़निर्माता जेव्हा नाटकात त्याच्या स्वत:च्या पैशाची गुंतवणूक करतो, तेव्हा तो त्या गुंतवणूकीकडे बिझनेस म्हणूनच पहात असतो. त्यामुळे त्याने फायदा मिळविणे हे गृहितच असते. एखादे नाटक चांगले आहे, उत्तम अभिनय करणारे नट/नटी त्यात आहेत, ते नाटक एखादा नवीन विचार मांडते आहे. परंतु ते नाटक फायद्यात नसेल तर निर्माता ते नाटक बंद करतो.
अर्थात प्रायोगिक/समांतर नाटक करणारा कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मात्र व्यावसायिक पद्धतीनेच म्हणजे पूर्ण निष्ठेने बिनचूक, तन्मयतेने अपार कष्टाने नाटक करत असतो.
थोडक्यात व्यावसायिक नाटकात प्रयोगशीलता असू शकते, असावी आणि प्रायोगिकतेत व्यावसायिकता असणे गरजेचे असते..
गाजलेली काही प्रायोगिक/समांतर नाटके/लेखक/दिग्दर्शक/कलाकार/ वानगीदाखल – घाशीराम कोतवाल–तेंडूलकर,जब्बार पटेल, डॉ.मोहन आगाशे
महानिर्माण – सतीश आळेकर, चंद्रकांत काळे
लोककथा 78 – रत्नाकर मतकरी तसेच चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, अजित दळवी, प्रतीक्षा लोणकर यांनी त्यांच्या ‘जिगिषा’ ग्रुपतर्फे केलेली नाटके. पुरूषोत्तम बेर्डे यांची प्रायोगिक नाटके. चेतन दातारांची नाटके आणि एक महत्त्वाचे नाव म्हणजे पं. सत्यदेव दुबे.
साधारणपणे ३०-४० वर्षाचा प्रायोगिक/समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीचा इतिहास पाहिला तर असे दृष्टोत्त्पत्तीस येते की प्रायोगिक/समांतर रंगभूमीवरून अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकार हे अंतिमत: व्यावसायिक रंगभूमीवरच कार्यरत झालेले आहेत. तसेच अशी अनेक प्रायोगिक/समांतर नाटके पण आहेत की जी कालांतराने व्यावसायिक रंगभूमीवर प्रस्थापित झाली. म्हणजे आजचे प्रायोगिक/समांतर नाटक हे उद्याचे व्यावसायिक नाटक असते.
या ठिकाणी मी काही नाटय़लेखकांचा, दिग्दर्शकांचा, कलाकारांचा उल्लेख करते जे मूळात प्रायोगिक/समांतर रंगभूमीवरूनच व्यावसायिक रंगभूमीवर आलेले आहेत. तेंडूलकर, मतकरी, जयंत पवार, शं.ना.नवरे, विजया मेहता,चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे, कुमार सोहनी, विजय केंकरे, डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर, मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, विनय आपटे, सदाशिव अमरापूरकर, अरिवद देशपांडे, सुलभा देशपांडे, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले,रीमा, नीना कुलकर्णी अशी अनेक असंख्य नावे आहेत. पण सगळ्यांचाच उल्लेख जागेअभावी अशक्य आहे.
आजची जी नाटककारांची, कलाकारांची, दिग्दर्शकांची नवीन पिढी आहे, त्याबद्दल मला फार कौतुक वाटते. या पिढीमुळेच प्रायोगिक/समांतर, व्यावसायिक हा भेद पुसला जाणार आहे. तसेच नव्या कल्पना, नवे विचार, नव्या पद्धती रंगभूमीवर रूजणार आहेत. जग जवळ येत आहे आणि जगाला सांस्कृतिकदृष्टय़ा भारताशी जोडण्यात ही युवा पिढी यशस्वी होणार आहे. वानगीदाखल काही नावे.. इरावती कर्णिक, मनस्विनी लता रिवद्र, परेश मोकाशी,धर्मकिर्ती सुमंत, प्रदीप वैद्य, गिरीश जोशी, अभिराम भडकमकर, अतुल पेठे, मोहित टाकळकर, सचिन कुंडलकर,निपुण धर्माधिकारी, अतुल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, आलोक राजवाडे, पर्ण पेठे, राधिका आपटे तसेच गावागावतले अनेक गुणी युवा कलाकार..
अर्थात प्रायोगिक/समांतर रंगभूमीला अनेक अडचणी भेडसावत आहेत. नाटय़गृह नाही, पुरेसा पैसा नाही.नाटकाकरिता वेळ देता येत नाही. प्रॅक्टीससाठी हॉल उपलब्ध नाही. निधीअभावी दोन किंवा तीनच प्रयोग करावे लागतात. बाहेरगावी प्रयोग करता येत नाहीत. तरुण वयातच करियर करणे गरजेचे असल्यामुळे नाटक का शिक्षण का नोकरी का व्यवसाय असे अनंत प्रश्न युवापिढीसमोर उभे असतात. इच्छा असूनही पूर्ण वेळ नाटक करता येत नाही.
उपाय –
१. प्रायोगिक/समांतर नाटकांचे महोत्सव भरवणे.
२. धनिक वर्गाने चळवळीला आर्थिक मदत करणे.
३. तीनशे ते चारशे आसन क्षमतेची थिएटर्स उपलब्ध करून देणे.
४. राष्ट्रीय स्तरावर मराठी नाटके घेण्याकरिता निवड समितीचे निकष अभ्यासणे.
५. प्रायोगिक/समांतर नाटकाचे गावोगावी दौरे करण्याकरिता अर्थसहाय्य करणे.
लोककला रंगभूमी
लोककला रंगभूमी ही भारताची/महाराष्ट्राची वेगळी ओळख, शान आहे. तिला आपण आद्यरंगभूमी म्हणू शकू.
लोककला म्हणजे लोकांकडून विकसित झालेली, लोकांनीच निर्माण केलेली, लोकांसाठीची कला!
राष्ट्रसेवा दलातर्फे लोककलेचा ख-या अर्थाने जागर केला गेला. निळू फुले, राम नगरकर, लीलाधर हेगडे, अण्णाभाऊ साठे, अमर शेख, वसंत बापट ही त्यातली काही बिनीची नावे.
माझा लोककलेशी, लोकनाटयाशी संबंध आला तो दादा कोंडके यांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या लोकनाटय़ामुळे.या लोकनाटय़ातल्या ७५० प्रयोगातून मी गायले. ‘विच्छा’मध्ये तर कधी–कधी मी नऊवारी साडी नेसून दादांबरोबर गवळणही गात असे. ‘विच्छा’मधला लावणीचा माझा प्रवास, बैठकीची लावणी गाण्यापर्यंत पोहोचला. दादांसारखा उत्स्फूर्त, लवचिक, हजरजबाबी शाहीर मी पाहिला नाही.
या लोकरंगभूमीमुळेच मला राजा मयेकर, शाहीर साबळे, सुहास भालेकर, दादू इंदूरीकर, काळूबाळू, विठाबाई नारायणगावकर या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कलावतांचा परिचय झाला. त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. ती शिदोरी मला आजवर पुरत आली आहे. ‘विच्छा’मधल्या लावण्या मी आजही गाते व स्वत: त्याचा आनंद घेते.
आपल्याकडच्या लोकरंगभूमीचा, लोककलांचा आवश्यक तेवढा अभ्यास अजूनही झालेला नाही. हा एक महासागर आहे, ज्याचा तळ शोधण्याकरिता कदाचित अनेक जन्म घ्यावे लागतील. मला वाटतं नाटय़परिषदेनंच एक स्वतंत्र विभाग लोकरंगभूमीसाठी स्थापन करावा, ज्यात अनेक नव्या जुन्या शाहीर, कलावंतांना सामील करून घ्यावे व पुन्हा एकदा या लोककलेला ऊर्जतिावस्था प्राप्त करून द्यावी..
व्यावसायिक – पद्य (संगीत) नाटक – गद्य नाटक
पद्य (संगीत) आणि गद्य नाटक या रंगभूमीवरच्या अनेक व्यावसायिक नाटकातून कामे करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. आजमितीस व्यावसायिक रंगभूमीवर मी केलेल्या प्रयोगांची एकूण संख्या साडेचार हजार आहे.
महाराष्ट्रातील अग्रगण्य नाटय़संस्थांच्या अनेक नाटकातून भूमिका करण्याची मला संधी मिळाली. उदा.-ललितकलादर्श, गोवा हिंदू असोसिएशन, नाटय़संपदा, रंगशारदा, कलावैभव, सुयोग. अनेक दिग्गज दिग्दर्शकांच्या हाताखाली मी काम केले. उदा. नानासाहेब फाटक, पु.ल.देशपांडे, पुरूषोत्तम दारव्हेकर, कांती मंदिया, मामा तोरडमल,अरिवद ठक्कर, विजय केंकरे, नंदकुमार रावते, दिलीप कोल्हटकर. रंगभूमीवरच्या अनेक गुणी आणि अभिनयसंपन्न कलाकारांसमवेत मी अनेक नाटकातून अभिनय केला. उदा. प्रभाकर पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर, काशिनाथ घाणेकर, भालचंद्र पेंढारकर, छोटा गंधर्व, प्रकाश घांग्रेकर, प्रसाद सावकार, डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, सुधा करमरकर, मा. दत्ताराम, मधुकर तोरडमल, रामदास कामत, रमेश भाटकर आणि पु.ल.देशपांडे.
प्रतिथयश नाटय़संस्था, दिग्गज दिग्दर्शक आणि प्रतिभावान सहकलावंत यांच्या परीसस्पर्शानं माझी अभिनयकला उजळून निघाली. मी कीर्तीवंत झाले.
व्यावसायिक (संगीत) नाटक
माझे पहिले संगीत नाटक ‘गीत गाईले आसवांनी’ हे होते. या नाटकाचे परीक्षण सर्वश्री वा.य.गाडगीळ आणि राजा कारळे यांनी असे केले होते. ते पुढीलप्रमाणे.. ‘ती आली, तिने पाहिले व तिने जिंकले!’
त्यानंतर मी ‘मत्स्यगंधा’ या नाटकात काम केले. तेही आधीचे ७०० प्रयोग झाल्यानंतर. त्यातील मत्स्यगंधेची भूमिका आशालता वाबगावकरांनी गाजवली होती. त्यामुळे त्या भूमिकेत छाप टाकणे हे खरं तर खूप अवघड होते.परंतु मी जिवापाड श्रम घेऊन माझ्या पद्धतीने, माझ्या विचाराने ‘मत्स्यगंधा’ साकार केली. ती साकार करण्यासाठी मला मा. दत्तारामबापू आणि रामदास कामत यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्यानंतर ‘लेकुरे उदंड झाली’ या संगीतिकेत काम करण्याचे भाग्य मला लाभले. या दोन्ही नाटकाला संगीत दिले होते प्रतिभाशाली संगीतकार जितेंद्र अभिषेकी यांनी.
ज्या नाटकामुळे मी रसिकांच्या मनावर ख-या अर्थाने आधिराज्य गाजविले ते नाटक म्हणजे ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘कटय़ार’ बद्दल मी काय लिहू? ‘कटय़ार हा संगीत नाटकातला एक हिरा आहे. ज्याला पैलू पाडले होते ते पुरूषोत्तम दारव्हेकर, वसंतराव देशपांडे आणि जितेंद्र अभिषेकी यांनी.
मी गर्वाने नाही पण अभिमानाने सांगू इच्छिते की ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकात मी साकार केलेल्या ‘जुलेखा’या पात्रामुळे मला एक अभिनयकुल अभिनेत्री हे बिरूद प्राप्त झाले. जुलेखा साकार करणे ही अभिनयकलेची कसोटी होती. कारण या पात्राला विविध शेडस् होत्या. तात्यासाहेब शिरवाडकरांनी अनेक नाटके लिहिली पण हे त्यांचे सर्वात आवडते नाटक होते.
थोर साहित्यिक आणि ख्यातनाम लेखक पु.ल.देशपांडे यांच्या ‘वटवट’ नाटकात मला काम करण्याची संधी मिळाली.तो माझ्या आयुष्यातला एक सुवर्णयोग होता असे मला वाटते.
माझ्या संगीत नाटकाच्या कारकीर्दीत महत्त्वाची ठरतील अशी इतर नाटके आहेत ज्यांचा मी फक्त उल्लेख करते..चि.य.मराठे यांचे ‘संगीत होनाजी बाळा’,बाळाजी राणे यांचे ‘संगीत संत तुकाराम’ (मार्गदर्शक नानासाहेब फाटक)संगीत संशयकल्लोळ. (माझे सहकलाकार होते दिग्गज अभिनेते – छोटा गंधर्व, दाजी भाटवडेकर, विजया मेहता)विद्याधर गोखले यांचे बावनखणी हे वेगळया प्रकारचे नाटक होते ज्याला इंग्रजीमध्ये ‘रिव्हयू’ म्हणतात. ज्यात सूत्र एक पण कथा वेगवेगळया असतात. अशोकजी परांजपे यांचे ‘संत गोरा कुंभार’.
संगीत रंगभूमीवर एवढा माझा नाटय़प्रवास झाल्यानंतर जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा संगीत रंगभूमीचा जुना काळ, माझ्या वेळचा काळ आणि सध्याचा काळ याचा तौलनिक विचार मनात येतो तेव्हा मनाला खिन्नता येते.आजची संगीत रंगभूमी ही जवळजवळ संपुष्टात आलेली दिसते. शिलेदार कंपनीचा नाटय़ग्रुप, शुभदा दादरकर,श्रीकांत दादरकर अशी आणखी काही नावे सोडली तर संगीत रंगभूमी कुठे दृष्टोत्पत्तीस पण येत नाही. यांची कारणे माझ्या मते –
१. जीवनाचा जीवघेणा वेग
२. प्रेक्षकांची बदलती अभिरूची
३. नवीन संगीत नाटकाच्या संहितांची वानवा
४. गाणारे आणि अभिनय करणारे अभिनेता/अभिनेत्री यांची उणीव
५. तरूण प्रेक्षकांचा, नव्या पिढीचा संगीत नाटकाबद्दलचा निरूत्साह.
माझं एक निरीक्षण आहे की तरूण पिढीला संगीत आवडतं,शात्रीय संगीताच्या मैफिलींना तरूण वर्ग गर्दी करतो. उदा.सवाई गंधर्व. पण तो संगीत नाटक बघायला मात्र जात नाही. अर्थात या पिढीची एक अडचण म्हणजे त्यांच्या आयुष्याशी रिलेट होणारं संगीत नाटक आहे कुठं रंगभूमीवर? तो तरूणवर्ग जुन्या काळची संगीत नाटकं, जुने विषय बघायला नाखूष आहे. अर्थात तेही प्रयोग फारसे होत नाहीतच म्हणा !
उपाय –
१. नाटय़परिषदेनं संगीत नाटक असा विभाग काढणे.
२. नाटय़निर्मात्यांनी विविध वाहिन्याच्या अंतर्गत जे विविध संगीत कार्यक्रम चालतात, त्यातल्या चांगल्या गाणार्या कलावंतांना नाटय़संगीताचे शिक्षण देणे.
३. गद्य लिहिणा-या नवीन नाटककाराकडून संगीत नाटक लिहून घेणे.
४. आजकाल शात्रीय संगीत उत्तम गाणारे अनेक युवा कलावंत मैफिली गाजवित असतात. त्यांना अभिनयाचं शिक्षण देऊन संगीत नाटक निर्माण करणे सहज शक्य आहे. वसंत देशपांडे यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहूल देशपांडे यांनी नव्या कलावंतांना एकत्र आणून ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत कटय़ार काळजात घुसली’ इत्यादी संगीत नाटकं रंगमंचावर आणून त्याला अमाप लोकप्रियता मिळवून दिलेली सर्वश्रूत आहे.
बदल हा जीवनाचा स्थायीभाव आहे. संगीत नाटक जर हा बदल पचवून पुन्हा उभे राहिले, नवे प्रयोग, नवे संगीत आपलेसे करत राहिले तर पुन्हा एकदा संगीत रंगभूमीला सोनियाचे दिवस येतील असा मला विश्वास वाटतो.
व्यावसायिक (गद्य) रंगभूमी
माझ्या काही वैशिष्टय़पूर्ण नाटकांचा मी उल्लेख करणार आहे. त्या नाटकांच्या लेखकांची नावेच फक्त मी सांगणार आहे.
नाटककार नाटक
वसंत कानेटकर – अश्रूंची झाली फुले
शं.ना.नवरे – सूर राहू दे
शं.ना.नवरे – गुंतता हृदय हे
अनिल बर्वे – थँक्यू मिस्टर ग्लाड
जयवंत दळवी – किनारा
मो.ग.रांगणेकर – भटाला दिली ओसरी
प्र.के.अत्रे – तो मी नव्हेच
डॉ.शिरीष आठवले – मित्र
मधुसूदन कालेलकर – पेईंग गेस्ट
शेखर ताम्हाणे – वादळवाट
आनंद म्हसवेकर – दुधावरची साय
माझ्या नशिबाने मला विख्यात आणि जबरदस्त नाटय़संस्था, दिग्दर्शक, सहकलावंत मिळाले. तसेच वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या. माझ्या नाटकाचे असंख्य शोज महाराष्ट्रात, सबंध भारतात आणि परदेशात झाले.माझ्या विविध भूमिकांमुळे मी व्यावसायिक रंगभूमीवर माझा वेगळा ठसा उमटवू शकले. शेवटी काय पाहिजे एखाद्या कलावंताला आपल्या आयुष्यात ?
गद्य रंगभूमीची परिस्थिती ही संगीत रंगभूमीपेक्षा निश्चितच प्रगतीपथावर आहे. याचे कारण नवी पिढी जोरदारपणे,जोरकसपणे नाटय़निर्मिती करते आहे. अनेक युवा कलाकार रंगभूमी गाजवत आहेत. त्याचबरोबर जे बुजुर्ग कलाकार आहेत ते पुन्हा एकदा रंगभूमीवर विविध नाटकातून आपले अभिनय रंग दाखवत आहेत.
अर्थात गद्य नाटकांना पण काही समस्या भेडसावत आहेत
१. पुरेशी थिएटर्स नाहीत.
२. आजचे कलाकार टीव्ही, जाहिरात, सिनेमा या सगळया माध्यमात काम करत असतात. त्यामुळे त्यांना तालमीसाठी, प्रयोगासाठी पुरेसा वेळ देता येत नाही.
३. कलावंताचे कार्यक्रम एवढे व्यस्त असतात की ते दौरे करू शकत नाहीत. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक,औरंगाबाद, नागपूर ही मोठी शहरं सोडली तर इतर ठिकाणी व्यावसायिक नाटकांचे प्रयोगच होत नाहीत.
४. ब-याच शहरातील थिएटर्स ही महानगरपालिकांची आहेत. त्यामुळे नाटकाला तारखा मिळाल्या तरी ऐनवेळी महानगरपालिका त्यांच्या स्वत:च्या कार्यक्रमांना, राजकीय व्यक्तींच्या कार्यक्रमांना त्या तारखा देते. त्यामुळे प्रयोग रद्द करावा लागतो. निर्मात्याचे नुकसान होते.
५. एकूणच महाराष्ट्रातील थिएटरांची सगळी व्यवस्थाही अतिशय वाईट आहे. ब-याचवेळा खुर्च्या खराब असतात,लाईट जातात. त्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग होतो. कलाकारांसाठी असलेली मेकअप रूम, बाथरूम व्यवस्था अतिशय गलिच्छ असते. स्त्री कलाकारांचे तर फार हाल होतात.
आजची सिनेमाची थिएटर्स आणि नाटकाची थिएटर्स यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सिनेमाची थिएटर्स अधिक चकचकीत, स्वच्छ, आधुनिक होत आहेत. तर नाटय़गृहे ही वाईट स्थितीला जात आहेत. थिएटर वाईट अवस्थेत असेल तर मराठी प्रेक्षक पदरमोड करून तीही माणशी रूपये १५०, २०० खर्च करून थिएटरला कशाला येतील?शहरातल्या नाटय़गृहांची ही अवस्था तर गावागावातील थिएटर्स कुठल्या अवस्थेत असतील देव जाणे.
एवढे असूनही आजकाल व्यावसायिक गद्य नाटकाला प्रतिसाद वाढतो आहे. याचं कारण मला वाटतं आता प्रेक्षक टिव्हीला, त्या वरच्या मालिकांना कंटाळत चाललेले आहेत. शेवटी नाटक ही एक जिवंत कला आहे आणि जिवंत जे जे काही असतं ते नेहमीच चैतन्यदायी असतं.
गद्य व्यावसायिक नाटकाच्या समस्या सुटण्याकरिता परिषद, शासन, नाटय़निर्माता संघ, कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक यांनी एकाच व्यासपीठावर येऊन, आपापसात चर्चा करून उपाययोजना केल्या पाहिजेत. प्रत्येक समस्येवर उत्तर असतं, उपाय असतात असं मला वाटतं. मग याही समस्यांवर एकत्र येऊन निश्चितपणे मात करता येईल.
शेवटी माझ्या मते बालनाटय़, हौशी, कामगार, प्रायोगिक/समांतर, लोककला, व्यावसायिक हे महत्त्वाचे नाटय़िबदू आहेत. आणि हे सगळे नाटय़िबदू एकत्र येऊन एक सघन, सुस्पष्ट, सुस्थिर रेषा निर्माण झालेली आहे. जिला आपण मराठी रंगभूमी म्हणतो. यातला एक जरी बिंदू निसटला, तुटला किंवा दुबळा झाला तरी तो मराठी रंगभूमीला कमकुवत करेल. म्हणूनच या सगळया नाट्यबिंदूंना सबळ, परीपूर्ण, अर्थपूर्ण करणे हे प्रत्येक मराठी रसिकांचे,रंगकार्मिंचे आद्यकर्तव्य आहे.
समारोप
मी व्यावसायिक रंगभूमीवर जे काम केले त्याबद्दल मी समाधानी, कृतज्ञ आहे. मला हा नाटय़व्यवसाय वाईट आहे असे चुकूनही कधी वाटलं नाही. तुम्ही चांगले आहात असे तुम्हाला अंत:करणपूर्वक वाटत असेल तर, तुम्हाला चांगली माणसेच भेटतात यावर माझा ठाम विश्वास आहे. शेवटी कुठलाही व्यवसाय, प्रामाणिकपणानं केलेला वाईट नसतोच. दोष कुठल्या व्यवसायात नसतात?
माझ्या आयुष्यात आलेल्या, मला मदत केलेल्या, मार्गदर्शन केलेल्या असंख्य व्यक्ती आहेत. त्यांचे माझ्यावर डोंगराएवढे ऋण आहेत.
आज मला आठवण येते ती माझ्या आईची, आजीची आणि गार्डीयन शीला शुक्ल यांची! तसेच मला अमाप कृतज्ञता वाटते ती कुमुद मेहतांची आणि श्री. मेहतांची ज्यांनी माझ्यावर मुलीसारखी माया केली. मेहतांचे स्नोही सत्येंद्रभाई त्रिवेदीमुळे माझा बेगम अख्तरांशी परिचय झाला. बेगम अख्तरांचा सहवास मला सहा वष्रे सतत लाभला. तसेच कुमुद मेहतांमुळे, पु.ल., गिरीश कर्नाड, हृदयनाथ मंगेशकर, दुर्गा भागवत या अनन्यसाधारण, प्रतिभावान व्यक्तींशी माझा परिचय झाला. त्यांचे मला मार्गदर्शन लाभले. त्यामुळे मी अंतर्यामी समृद्ध झाले, परिपक्व झाले.
या माझ्या नाटय़वाटचालीत अनेक नाटय़संस्था, दिग्दर्शक, कलाकार मला लाभले. ज्यांच्याकडून मी थोडंबहुत शिकू शकले. या सगळ्यांमुळे माझे आयुष्य उजळून गेले आहे असे मला वाटते.
आज बेळगावात मला जो सन्मान मिळतो आहे, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. जणूकाही माझ्या ५० वर्षाच्या नाटय़कारकीर्दीला तुम्हा रसिकांची पोचपावती मिळते आहे असे मला वाटते. मला बेळगाव आवडते आणि बेळगावी लोकही आवडतात. तुमच्या या प्रेमाला, सत्काराला मी कुर्निसात करते.
तसेच माझ्यावर अपरंपार प्रेम करणा-या सर्व रसिकांचे, चाहत्यांचे, श्रोत्यांचे, अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या सर्व पदाधिकार-यांचे, सहकार्याचे, परिषदेचे अध्यक्ष श्री. मोहन जोशी यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे या नाटय़संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे, बॅकस्टेज वर्कर्सचे, तंत्रज्ञांचे, मिडीयाचे आणि हे संमेलन यशस्वी करण्याकरिता झटणा-या सर्वजणांचे मी आभार मानते.
या प्रसंगी मला आठवण येते आहे ती माझ्या दिवंगत सहकलाकारांची, माझ्या दिग्दर्शकांची आणि माझ्या सर्व नाटककारांची. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते.
आपल्यासारख्या रसिकांचे प्रेम मला आजन्म लाभो ही श्री नटराज चरणी प्रार्थना !
पुनश्च एकदा अभिवादन आणि धन्यवाद !