राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकच्या कलावंतांचे नाटक सादर
आपले वर्चस्व राहावे यासाठी दहशत माजवली जात आहे. माणसेच माणसांना मारताहेत. कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. कुठे बॉम्बस्फोट होतात, कुठे गोळीबार. कुणाची कत्तल केली जात आहे. निर्दोष माणसे मारली जात आहेत. कशासाठी? कुणी धर्म पांघरूण, कुणी आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे विकृत कृत्य करताहेत. हे आजचे चित्र. पूर्वीही हीच परिस्थिती होती.‘वसाहतवादा’तून सामान्य माणसे मारली जात होती. वर्चस्व गाजवले जात होते, दहशतीच्या जोरावर. ही संपण्यासाठीचा एकमेव मार्ग बुद्धाने सांगितला, ‘न हि वैरेन वैरानी’ अर्थात वैराने वैर संपत नाही!
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित ५४ व्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मंगळवारी नाशिकच्या कलावंतांनी भगवान हिरे लिखित आणि मुकुंद कुलकर्णी दिग्दर्शित ‘न हि वैरेन वैरानी’ या नाटकाचा प्रयोग सादर केला. दहशत विरुद्ध अहिंसा या दोन परस्पर विरोधी विचारसरणीचे द्वंद्व मांडून मानवी कल्याण हे मैत्री, प्रेम, अहिंसेतच सामावले असल्याचा संदेश या नाटकाने दिला.
‘लोकहितवादी मंडळा’ने हे नाटक सादर केले.शीर्षकानुषंगे बुद्ध धम्मपदाचे वैश्विक सत्य सांगण्यात आले आहे. बुद्धाने जगाला करुणा, अहिंसेची शिकवण दिली. माणसाच्या मनातील क्रूरतेचा नाश करण्यासाठी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाची गरज आजच्या काळातही कशी गरजेची आहे,हे ताकदीने बिंबवण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.कुठलाच धर्म दहशतवादाचे, अहिंसेचे, विकृतीचे समर्थन करत नाही. परंतु आपले वर्चस्व टिकवण्यासाठी तथाकथीत ‘बेटाधीश’ धर्माच्या नावावर सामान्य माणसांना भडकवून दहशतवादाचे समर्थन करत असतात. युद्ध लादत असतात. वेरमणी बेटावरचा प्रमुख रावत आता युद्ध नको, शांती हवी यासाठी पुढाकार घेतो. वैराने वैर कधीच मिटत नाही, ते वाढतच जाते हे आपल्या बेटावरील माणसांच्या मनात रुजवतो.शत्रूच्याही मनात अहिंसेची ज्योत पेटवून ‘दहशत चिरायू हो’ असे सांगणाऱ्या दुस–या बेटावरील अजानीची दहशत संपवतो.
अजानीची आक्रमक व्यक्तिरेखा साकारताना हेमंत देशपांडे यांनी कुठलीही कसर न सोडता अभिनयातून तो क्रूरपणा प्रचंड ताकदीने रेखाटला आहे. त्याची खबरी म्हणून काम करणाऱ्या पिपीलिकाची भूमिका वठवणाऱ्या पूजा वेद्विख्यात हिने अभिनयातून आपले वैशिष्टय़ अधोरेखित केले आहे. रावत साकारणारा अरुण गीते, प्रशांत देशपांडे (दालाभ), प्रथमेश देशपांडे (ददाना), शिरिष कठाळे (भूई), आरुषी भोरकर (तुती),गीतांजली घोरपडे (कल्पी), रसिका पुंड (सांजी), महेंद्र चौधरी(शिम्ब), मुकुंद मोरे (युग्मन), सागर संत (सम्पाक), आकाश पाठक (दिगंत), रमेश काळे (गाजी), निखिल भोर (दमन), कुमार कपाळे (खंजन), तेजस कुलकर्णी (फाहा) यांच्यासह माधुरी वैशंपायन, अमित बुवा, डॉ. मंजुषा कुलकर्णी, रोहिणी जोशी, संकेत गोरवाडकर, तुषार नागपुरे, भक्ती आठवले, रश्मी विसपुते, रूपश्री जोशी, निलेश घोरपडे, अनिकेत शिंदे, प्रिन्स गौड, अदित्य समेळ, अनिल गौड, गायत्री वारुंगसे, सुभाष पाटील यांनी आपापल्या भूमिका यथोचित साकार केल्या आहेत.
वेगवेगळी बेटे दाखवण्यासाठी नेपथ्य, प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीताची सुसंगती हे या नाटकाचे बलस्थान ठरले. त्याच प्रमाणे रंगभूषा (माणिक कानडे) आणि वेशभूषेतून (अपूर्वा शौचे–देशपांडे) वसाहतवादी लोकजीवन मांडण्यात या नाटकाने यश कमावले आहे. किरण समेळ यांच्या संकल्पनेतून ललित खैरनार यांनी नेपथ्य निर्मिती केली. प्रसाद भालेराव आणि निषाद हलकर्णी यांनी पार्श्वसंगीत तर विजय रावळ यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे.