राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत `मिती-चार’ने गुंफले आठवे पुष्प
राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने पनवेलमधील आद्यक्रातीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात सुरू असलेल्या राज्य नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत बुधवारी सतीश आळेकर यांचे गाजलेले नाटक `शनिवार रविवार’ सादर करण्यात आले. माणिक शिंदे दिग्दर्शित या नाटकाद्वारे कल्याणच्या `मिती-चार’ या संस्थेने या स्पर्धेत आठवे पुष्प गुंफले. अपत्यहीन दाम्पत्याने काल्पनिक व्यक्तिरेखा, घटना, प्रसंग जन्माला घालून साजरा केलेल्या `शनिवार रविवार’मध्येरसिकही गुंतून गेले.
या चार पात्री नाटय़कलाकृतीत सुषमा फडके यांनी सुमनची तर अमोल कुलकर्णी यांनी ईश्वरची भूमिका साकारून या गाजलेल्या नाटय़संहितेचे सोने केले. त्यांना मनीष पाठकने (गंमत) आणि सफला जोशी (बबी)ची समर्थ साथ मिळाली.
माणूस नेहमीच आपल्या वाटय़ाला आलेली दु:खाची पोकळी भरून काढण्यासाठी वेगवेगळे खेळ खेळत असतो. मुळात खेळ हा प्रकारच गुंतवून घेणारा असतो. त्या खेळात आनंद शोधून विरंगुळा करून घ्यायचा असतो. शनिवार-रविवारच्या सुटीच्या दिवशी अपत्य नसलेले दाम्पत्य आपल्याला मुल नसल्याचे दु:ख कवटाळत बसण्यापेक्षा वेगवेगळी पात्र, प्रसंग, घटना `जन्माला’घालतात आणि सुटीचा दिवस साजरा करतात. त्या आनंदाच्या भास-आभासाचा उत्सव म्हणजे `शनिवार रविवार’!
नाटय़कथेच्या रूपाने ही गोष्ट जरी निपुत्रीक दाम्पत्याची असली तरी या नाटकाचा विषय फक्त त्या दाम्पत्यापुरता सिमीत नाही. त्या कथेला आणखी बरेच काही सुचवायचे आहे. माणूस हा दु:खापासून सदैव पळ काढण्याचाच प्रयत्न करत असतो. त्या दु:खातून सावरण्यासाठी आयुष्यभर वेगवेगळे खेळ खेळत असतो. त्या दु:खाची आणि खेळाची तऱहा तेवढी वेगवेगळी असते.त्याचा प्रभाव कधी दीर्घकाळ असतो, कधी-कधी क्षणभराचाही असतो. पण मूल नसल्याचे दु:ख गोंजारण्यापेक्षा, सुटीच्या दिवशी त्यात अडकून पडण्यापेक्षा या नाटकाच्या माध्यमातून मानवी मनाचे लपंडाव अधोरेखित करण्यात आले आहेत.
कथानकाच्या गरजेनुसार रवींद्र लाखे यांचे नेपथ्य, मकरंद धर्माधिकारी यांची प्रकाशयोजना, प्रितिश खंडागळे यांचे संगीत, मनीष पाठक यांचे नृत्य, सफला जोशी यांची वेशभूषा आणि महेंद्र झगडे यांची रंगभूषा नाटकाची गोष्ट रसिकांपर्यंत पोहचवण्यासाठी पुरक ठरल्यात.