आत्ता राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालावर खिळली नजर!
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत शुक्रवारी अहमदनगरच्या वात्सल्य प्रतिष्ठानने ‘स्मशानयोगी’ नाटकाद्वारे स्पर्धेची सांगता झाली. आता सा-यांनाच या स्पर्धेत कोण बाजी मारणार याविषयीची प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, सोमवारी (१६ मार्च) या स्पर्धेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
छाया : निखिल गोडसे
अॅड. शैलेश गोजमगुंडे लिखित आणि सतीश लोटके-अनंत जोशी दिग्दर्शित ‘स्मशानयोगी’ नाटकाच्या प्रयोगाआधी या स्पर्धेचे समन्वयक युवा नाटककार समीर पेणकर आणि स्पर्धेचे परीक्षक नाटककार प्रेमानंद गज्वी, सुरेश मगरकर, अजय टिल्लू, संजीव वढावकर, डॉ. मंगेश बन्सोड यांचा सत्कार अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर स्मशानातल्या अंधारात रसिकांच्या मनात माणुसकीचा प्रकाश चेतवणारे ‘स्मशानयोगी’ सादर करण्यात आले.
स्मशानात अत्यसंस्कारासाठी जागा देणारा, स्मशानभूमीची देखरेख करणारा एक साधा चौकीदार. तो तिथला सर्वेसर्वा. अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या नियमांची पूर्तता करणारा, ती पूर्तता केली नसल्यास प्रसंगी मृतदेह परत घेऊन जा असेही सांगणारा हा स्मशानयोगी! एका रात्री एक तरुण या स्मशानभूमीत येतो. जन्मताच बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगून, त्या बाळाला पुरून टाका असे त्या चौकीदाराला सांगतो. चौकीदार त्याला मृत्यूचा दाखला विचारतो. तो त्या तरुणाकडे नसतो. तरुण गयावया करतो. कसेही करा; पण अंत्यसंस्कार करा, असे विणवतो. तरुणाच्या परिस्थितीला शरण जाऊन एक फॉर्म त्याला भरायला सांगतो. तेव्हापर्यन्त व्यवस्था करतो, असे सांगत चौकीदार निघून जातो. तरुण इकडे-तिकडे बघतो. संधी साधतो आणि अर्भकाला तिथेच सोडून पळून जातो. चौकीदार येतो तेव्हा शोधशोध करतो. तो तरुण दिसत नाही. त्याला आवाज देतो आणि ते अर्भक रडायला लागते. चौकीदार दचकतो. हे बाळ जिवंत आहे, त्याचे काय करायचे, असा प्रश्न त्याला पडतो आणि नाटक रंगायला सुरुवात होते..
या नाटकाची शीर्षकांकित भूमिका असणारा चौकीदार दीपक शर्मा यांनी कुठलीही कसर न सोडता रेखाटला. त्यासोबतच प्रवीण कुलकर्णी (भट), कीर्ती खेडकर (मेनका), पंकजा कराळे (चंद्रिका), धनश्री खोले (बाई/सुधाताई), महेश जाधव (बसण्या), महेश धोंगडे (इसम/अधिकारी), सतीश पवार (इन्स्पेक्टर), पराग पाठक (डॉक्टर) यांच्यासह विकास लोखंडे, प्रसाद टकले, संतोष ताठे, हर्षल वालेकर, शिवाजी शिवचरण, अमोल टेमकर, प्रशांत शिवचरण, संचित दिवटे, रितेश डेंगळे, हेमंत कुलकर्णी, विराज अवचिते आणि सौरभ इंगळे छोटय़ा मोठय़ा भूमिका साकारून नाटकाच्या निर्मितीला मोलाचा हातभार लावला.
स्मशानभूमीचे वास्तवदर्शी रेखाटणारे नेपथ्यकार संजय घुगे आणि अमोल खोले यांचे विशेष अभिनंदन केलेच पाहिजे. शेखर वाघ यांची प्रकाशयोजना आणि सतीश लोटके यांचे पाश्र्वसंगीत या स्मशानभूमीला श्रीमंत करणारे ठरले. सुनीता शर्मा यांची रंगभूषा आणि उर्मिला लोटके यांची वेशभूषा नाटकाच्या विषयानुरूप व्यक्तिरेखा साकारण्यास महत्त्वाच्या ठरल्या.