सुयोगचं नवं कोरं विनोदी नाटक
सुयोग निर्मित, निर्माते गोपाल अलगेरी यांचं “लगीनघाई”हे नवं कोरं विनोदी नाटक ५ एप्रिल पासून रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे असून संगीत अभिजीत पेंढारकर, नेपथ्य शशांक तेरे,प्रकाश शितल तळपदे, वेशभूषा प्रणोती जोशी यांची आहे. यात आदिती देशपांडे, ओंकार राऊत, नियती घाटे आणि अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘लग्न’ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा. पण प्रत्येकाच्या आयुष्यात विशिष्ट वयातच येतो असं नाही. काही जणांच्या आयुष्यात तो लवकर येतो तर काहींना त्यासाठी फार मोठी म्हणजे अगदी उतारवयापर्यंत प्रतीक्षाकरावी लागते. असा हा महत्वपूर्ण टप्पा जर एकाच घरातल्या बाप व मुलाच्या आयुष्यात एकाच वेळी आला तर काय होईल? याचं उत्तर म्हणजे “लगीनघाई”.
“लगीनघाई”नाटकातील बाप एक विधुर. बायकोनंतर आपल्या मुलाला आईची आणि बापाची माया देऊन त्याला सेटल करतो. पण आता त्याच्या आयुष्यात दुसरी स्त्री आली आहे. दोघांनाही लग्न करायचं आहे, पण अडचण आहे ती मोठा झालेल्या मुलाला ही गोष्ट सांगायची कशी?मुलाचीही एक वेगळीच अडचण आहे. तो पण प्रेमात पडलाय,पणत्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीच्या. दोघंही बाप बेटयांना आपली प्रेमप्रकरणं एकमेकांना सांगायची आहेत. पण भिडस्त स्वभावाने थेट कोणीच बोलू शकत नाही. यामुळे होते ती फक्त गोची. इरसाळ बनवाबनवी आणिधम्माल गम्मत….ती म्हणजे “लगीनघाई”.
“गोष्ट तशी गमतीची” या पुरस्कारप्राप्त आणि हिट नाटकाउपरांत दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांचे लगोलग दुसरे“लगीनघाई” हे विनोदी नाटक सुयोगतर्फे रंगभूमीवर येत आहे. हे नाटक तितकंच मोठं यश प्राप्त करील,असा लेखक–दिग्दर्शक अद्वैत दादरकर ह्यांना विश्वास आहे. नाटकातील प्रमुख भूमिका करणारे सुप्रसिद्ध अष्टपैलू कलाकार अशोक सराफ यांच्या मते हे नाटक म्हणजे यशाची पावती आहे. त्यांनी याआधी सुयोगच्या अनेक यशस्वी नाटकातून भूमिका केल्या आहेत. “लगीनघाई”या नाटकाची संहिता वाचताच त्यांना ती खूप आवडली व त्यात थोडेसेबदल सुचवून त्यांनी हयातील भूमिकेसाठी लागलीच होकार दिला. अभिनेत्री आदिती देशपांडे यांची या नाटकातीलभूमिकेसाठी अगदी सुरुवातीपासूनच निवड झाली होती. फक्त व्यक्तिमत्वामध्ये थोडासा फरक येत होता पण तोही फरक रंगभूषेने यथायोग्य करण्यात आला. ओंकार राऊत आणि नियती घाटे या दोघांना सुयोगच्या ऑफिसमध्येबोलावून घेतले. आपल्याला नाटकातील एका महत्वाच्या भूमिकेसाठी बोलावण्यात आलं आहे असं समजल्यावरत्यांना आश्चर्याचा गोड धक्का बसला. ओंकार राऊत आणि नियती घाटे या दोघांनीही आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच “टाइमपास”हया चित्रपटातून ओंकार राऊत याने तर “धानोरीएक गाव”या चित्रपटातून नियती घाटे हीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. नाटकाचे नवे तरुण संगीतकार अभिजीत पेंढारकर प्रथमच सुयोगच्या कॅम्पमध्ये दाखल झाले असून त्यांच्या गुणवत्तेमुळेच त्यांनासुयोगमध्ये संधी देण्यात आली आहे. बॉलीवुडमधील प्रसिद्ध नेपथ्यकार शशांक तेरे यांनी नाटकाच्या कथेला साजेसंअसं नेपथ्य साकारलं आहे. प्रणोती जोशी यांची आगळी वेगळी कलरफुल वेशभूषा अद्वितीय कल्पकतेची साक्ष देते.‘सुयोग’ ह्यांची आजवरची नाट्य निर्मितीची परंपरा पहाता प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन खुमासदार व मनोरंजक पहायला मिळते. “लगीनघाई”यासाठी अपवाद नाही.