शौर्य कला दालनात महिनाभर वेगवेगळ्या कलाकृतींचे प्रदर्शन
नवी मुंबईतील शौर्य कला दालनात महिनाभर चालणारा महाराष्ट्र कला महोत्सव १ मेपासून सुरु झाला असून, तो ३० मेपर्यंत सुरु राहणार आहे.
शौर्य आर्टस, सिटी टाॅवर, सेक्टर १५, बी-विंग, पाचवा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. त्यात प्रतिभा वाघ (टेराकोटा कला), कृष्णकांत ठाकूर (कॅलिग्राफी आणि टायपोग्राफी), दीपा परब (म्युरल कला), सुनिता खेडेकर (गणेशाची चित्रे), रेखा भिवंडीकर (वारली कला), अनिकेत कस्तुरे (किल्ल्यांची छायाचित्रे), उमेश पांचाळ (रांगोळी- महाराष्ट्राचा पारंपरिक प्रकार), कुलदीप कोरेगावकर (चित्रकला- फाइन आर्ट), दीपक पाटील (चित्रकला- लँडस्केप) आणि अच्युत पालव (कॅलिग्राफी) आदी कालांतांच्या कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत.
या प्रदर्शनांबाबत बोलताना भावेश पारेख, आयोजक आणि शौर्य कलादालनाचे मालक म्हणाले की, हे प्रदर्शन कलात्मकतेचे मिश्रण असून मला या उपक्रमाच्या माध्यमातून कलाकारांच्या प्रयत्नांसाठी मूल्य निर्माण करायचे आहे.
हे प्रदर्शन कलेचे विविध प्रकार माहीत नसलेल्या लोकांसाठी चांगले असून त्यांनी त्यांच्याबाबत माहिती करून घेण्यासाठी ते जाऊन पाहिलेच पाहिजे, असे मत अच्युत पालव यांनी या प्रदर्शनाबाबत व्यक्त केले. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रदर्शनाच्या वेळा सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असतील.