अरबिंदा सामंता यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन सुरू
मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार अरबिंदा सामंता यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये १२ मेपासून सुरू झाले असून ते रसिकांना १८ मेपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहे.
अरबिंदा सामंता यांनी आपल्या चित्रात अनोख्या व वास्तववादी शैलीचा उपयोग केला आहे. अरबिंदा सामंता यांचे कलाशिक्षण कोलकाता येथील शासकीय कला महाविद्यालयात झाले. नंतर त्यांनी कोलकाता, मुंबई, बंगलोर, दिल्ली वगैरे ठिकाणी अनेक कलादालनातून आपली चित्रे सादर केली. अनेक मान्यवर व कला संग्राहक तसेच कलाप्रवर्तक संस्थांनी त्यांच्या कामाची स्तुती केली.
चित्रकार अरबिंदा सामंता यांनी आपल्या चित्रात मानवी मनातील दुर्दम्य भावना, आसक्ती, प्रेमभावना, भक्ती तसेच समर्पण, निरामयता, समरसता व तादाम्य वगैरे भावनांचे विविध पैलू वैशिष्ट्यपूर्ण शैलीत मांडले आहेत. योग्य संकल्पन, उचित रंगलेपन तसेच काही वैशिष्ट्यपूर्ण दृश्यमयता, प्रकाश, छाया ह्यातील समन्वय अतिशय स्पष्टपणे आपल्या चित्रांमधून सादर केले आहेत. तसेच विविध भौतिक व आधिभौतिक सुखप्राप्तीसाठी आवश्यक ती प्रबळ व तीव्र भावना, संकल्पना व त्याच्या पूर्तीसाठी लागणारी मानसिकता व अभिव्यक्तित्व / अनुभव प्रकर्षाने त्यांच्या चित्रात ठळकपणे आढळतात. काहीशा भावनिक व अध्यात्मिकतेकडे झुकणारा हा कलाविष्कार आकर्षक मांडणी, रचना आणि रंगसंगती हयामुळे मनोवेधक व पुरेसा बोलका झाला आहे. हा कलाविष्कार सर्व रसिकांशी जणू सुसंवाद साधतो आणि त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेतो.