‘कितना हसीं है जहाँ’मध्ये जावेद अख्तर यांचे उद्गार!
“पूर्वी संगीतकारांना स्वत:च्या संगीत रचना लोकांना आवडतील, भावतील यावर प्रचंड विश्वास होता, ’सिम्पलीसिटी ऑफ नोट्स’ त्यात होती, त्यामुळे ती गाणी आजही गुणगुणली जातात. संगीतातला हा साधेपणा आणि गोडवा त्या गाण्यांना अजरामर करतो आणि हेच एन.दत्तांच्या संगीताचे महत्वाचे वैशिष्ट्य होते, असे उद्गार ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी काढले. निमित्त होते सांस्कृतिक कार्य संचलनालय, महाराष्ट्र शासन आणि एन.दत्ता मेमोरियल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कितना हसीं है जहाँ’ या विशेष सांगीतिक आदरांजली कार्यक्रमाचे.
सध्याचे जग स्मार्ट होत चालले आहे, आपण सगळेच खूप हुशार झालो आहोत, त्यामुळे अधिक हुशारी दाखवण्याची चढाओढ सध्या सुरु आहे, त्याचा प्रत्यय कलेतही येतो, कवितेत, संगीतातही दिसतो. त्यामुळे एकंदरच साधेपणा, गोडवा लोप पावला आहे. आज एन.दत्ता या महान संगीतकाराला जर श्रद्धांजली द्यायची असेल तर संगीत क्षेत्रातल्या मंडळीनी थोडा स्मार्टनेस कमी करून एन.दत्तांची कला आत्मसात करावी, नवे गाणे सहा दिवसात विसरले जाण्याऐवजी ते आयुष्यभर रसिकांची साथ देईल.असा सल्लाही जावेद अख्तर यांनी यावेळी युवा संगीतकारांना दिला.
आशा भोसले यांनी यावेळी एन.दत्तांच्या आठवणी जागवल्या, ”माझ्या संगीत कारकीर्दीच्या सुरवातीपासून एस.डी बर्मनचा सहाय्यक ते स्वतंत्र संगीत दिग्दर्शक हा त्याचा प्रवास आम्ही एकत्रच केला, आज जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा एक लक्षात येते की त्याची सगळीच गाणी अजरामर झाली, सगळीच सुंदर गाणी त्याने दिली, त्या तुलनेत त्याला इंडस्ट्रीमध्ये जो मान मिळायला हवा होता, तो मिळाला नाही कारण तो सरळ होता, फिल्मी दुनियेत सरळ असून चालत नाही अशी गुणवान माणसे इंडस्ट्रीत सरळपणे येतात आणि सरळपणे जातात, त्यांचा आवाज होत नाही, पण एकच महत्वाचे आणि ते म्हणजे त्याची गाणी आजही गुणगुणली जातात, हे अजरामरत्व कोणीही त्याच्यापासून हिरावू शकत नाही” असे भावविवश उद्गार आशा भोसले यांनी काढले.
“रॉक अँड रोल सारखा वेगळा संगीतप्रकार अगदी सहज एन.दत्ताने भारतीय संगीतात रुजवला, त्याच्याकडे मी गायलेली सगळी गाणी लोकप्रिय ठरली, त्याची आणि साहिर लुधियानवीची जोडी हे खास यशस्वी समीकरण होते, एन.दत्ता या नावाशिवाय चित्रपट संगीताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही” असे गौरवोद्गार लता मंगेशकर यांनी काढले. चित्रपट संगीत क्षेत्रात मोठे झालेल्या अनेकांना पहिली संधी एन.दत्तांनी दिली, त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत, अशी कृतज्ञता यावेळी ज्येष्ठ संगीत संयोजक अमर हळदीपूर आणि संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केली.
रवींद्र जैन, खय्याम, कल्याणजी, सुरेश वाडकर यांनीही एन. दत्तांच्या आठवणी जागवल्या. एन.दत्तांच्या नावाने राज्य शासनाने पुरस्कार सुरु करावा अशी सूचना यावेळी वाडकर यांनी केली.
एन.दत्तांची ‘सूर तेच छेडीता’ आणि ‘हे चिंचेचे झाड ही गाणी’ ड्रेसिंग रूम मध्ये विशेष करून गुणगुणली जायची, सहज गुणगुणता येणारी गाणी आम्हा क्रिकेटपटूंमध्ये लोकप्रिय होते, म्हणून ते आमचे लाडके संगीतकार होते असे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर म्हणाले.
शरद पिळगावकरांनी जेव्हा मराठीत चित्रपट करायचे ठरवले तेव्हा गाणी एन.दत्तांच करतील असा निश्चय केला होता. त्याप्रमाणे पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक राजदत्त यांनी कथा ऐकवताच त्याला तात्काळ होकार दिला आणि अपराध हा माईल स्टोन चित्रपट निर्माण झाला, असे शरद पिळगावकर यांचे पुत्र सचिन पिळगावकर यांनी सांगितले. “अपराध पाठोपाठ मधुचंद्र हा चित्रपट तसा हलका फुलका काहीसा चावट होता, तसे त्याचे संगीतही गुदगुल्या करणारे होते, या चित्रपटांनी मला इंडस्ट्रीत उभे केले, त्यापाठी या संगीताचाही मोठा वाटा होता, अशी कृतज्ञता ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमात सारेगमप तसेच अलीकडे विविध गाण्यांच्या कार्यक्रमातून आपला ठसा उमटवलेल्या अमृता, अल्ताफ, नानू, निलाधर, नीलाद्री, नानू, रीमा, केका यांनी गाणी गायली. सचिन पिळगावकरांनी हे चिंचेचे झाड आणि सूर तेच छेडीता ही गाणी दणक्यात सादर करून लागोपाठ वन्स मोअर मिळवले.
निमंत्रितांसाठी असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी प्रचंड गर्दी केली होती, या सगळ्यांना सामावून हाउसफुल्ल ठरलेल्या या कार्यक्रमात अनेक गाण्यांना वन्समोअरसह रसिकांनी अप्रतिम दाद देत एन.दत्तांना आगळी आदरांजली वाहिली.