डॉ. स्वाती राजवाडे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
नाशिक येथील प्रसिद्ध चित्रकर्ती डॉ. स्वाती राजवाडे यांनी साकारलेल्या स्वामी विवेकानंदांच्या कवितांवर आधारित चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत २२ जूनपासून सुरु झाले आहे.
सदर प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुंबईच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी सर्वलोकानंदजी महाराज, पुण्याचे रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी महाराज, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीच्या प्रमुख निना रेगे, निर्माते – दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन रसिकांना २२ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहे.
स्वामी विवेकानंदांचे विचार, मानवाला दिलेले संदेश हे त्यांच्या साहित्य – ग्रंथातून सर्व जगात पोहोचले आहेत. ते उच्च कोटीचे आणि दैवी प्रतिभेचे कविदेखील होते, ही गोष्ट सर्वसामान्य जनतेला माहीत नाही. स्वामीजींच्या जगभर विखुरलेल्या साहित्यातून त्यांनी केलेल्या कविता संकलित करून, त्यांचा काव्यसंग्रह करण्याचे काम रामकृष्ण मठाने केले. स्वामीजींनी इंग्रजी, बंगाली, संस्कृत, हिन्दी या भाषांतून काव्य रचना केलेल्या आहेत. बंगालीतील मूळ काव्यरचना, संस्कृत स्तोत्र, हिंदी भाषेतील कविता त्या सर्वांचे इंग्रजीत रूपांतर स्वामीजींनी केलेले आहे.
चित्रकर्ती डॉ. स्वाती राजवाडे यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रकाश पाठक आणि रामकृष्ण मठ पुणे केंद्राचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने स्वामी विवेकानंदांच्या काव्यावर आधारित चित्रे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. स्वाती राजवाडे यांनी याआधी कवी कुसुमाग्रज यांच्या काव्यावर चित्रे काढली होती. ही चित्रे प्रकाश पाठक यांच्या पाहण्यात आली. त्यांनी स्वामी विवेकानंदाच्या काव्यावर चित्रे काढण्यासाठी सुचविले. त्यांनी त्यांच्या काव्यावर तीन – चार महिने अभ्यास करून चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. काव्याच्या अर्थानुरूप चित्र संपन्न होत गेली. चित्रांची रंगसंगती, चित्रांची रचना, समायोजन हे सर्व होत गेले. ही चित्रे साकारताना काही चित्रे काव्यातील दोन – चार ओळींवरच तयार झाली, तर काही चित्रांना कवितेतील बर्याच ओळी घ्याव्या लागल्या. स्वामी विवेकानंदांनी वर्णन केलेल्या ‘कालीचे’ चित्र तीन चार कडव्यांचे होते, तर उंचावरून कोसळणार्या धबधब्याचे चित्र चार ओळीतच संपले. स्वाती राजवाडे यांनी आपल्या चित्र प्रदर्शनात ३० चित्रे मांडली आहेत. ही सर्व चित्रे स्वामी विवेकानंदांच्या काव्यांवर आधारित आहेत. त्यांनी काव्याद्वारे मांडलेले विचार, संदेश चित्ररूपात साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा चित्र खजिना कलात्मक अशा आविष्कारामुळे चित्ररसिकास नक्कीच मोहीत करेल.