ऋषिकेश कोळी लिखित, प्रल्हाद कुडतरकर दिग्दर्शित नवं नाटक
सारीका नाईक आणि पल्लवी भोजने यांनी रुद्र थिएटर या नाट्यसंस्थेअंतर्गत ‘वीर दौडले सातच’ची निर्मिती केली या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. ऋषिकेश कोळी लिखित आणि प्रल्हाद कुडतरकर दिग्दर्शित या नाटकाबद्दल नाट्यरसिकांना उत्सुकता लागली आहे.
प्रल्हाद कुडतरकर यांनी यापूर्वी ‘एक बाकी एकाकी’ या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. ‘झी गौरव पुरस्कार सोहळ्या’त सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक आणि दिग्दर्शनाचे पुरस्कार या नाटकाने मिळवले होते. ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम केलेल्या प्रल्हाद कुडतरकर यांनी ‘आंबट गोड’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘आभास हा’, ‘लक्ष्य’ आणि ‘का रे दुरावा’ या लोकप्रिय मालिकांचे लिखाणही केले आहे. इतक्या मोठ्या अनुभवाच्या शिदोरीवर कुडतरकर आता ‘वीर दौडले सातच’ हे ‘एका वेगळ्या धाटणीचं नाटक घेऊन येत आहेत.
दरवर्षीप्रमाणे एका मराठी शाळेने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नाटक बसवण्याची जबाबदारी आपल्या शिक्षकांवर सोपवलेली असते. ओघाने ही जबाबदारी इतिहासाच्या शिक्षकांकडे येते आणि ते इतिहासावर नाटक बसवायचं ठरवतात. नाटकाच्या अनुषंगाने मुलांना इतिहासही समजावा यासाठी ते या विषयात ढ असलेल्या सात विद्यार्थ्यांची निवड करतात. पण इतिहासाशी छत्तीसचा आकडा असलेले हे सात विद्यार्थी हे नाटक कशाप्रकारे बसवतात आणि आंतरशालेय स्पर्धेत आपल्या शाळेचं नाव राखतात की घालवतात ते ‘वीर दौडले सातच’ या नाटकात पाहायला मिळेल.
ऋषिकेश कोळी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. ओंकार भोजने, अजय कांबळे, अभिषेक गांवकर, संजय जामखंडी, भाग्यश्री पाने, संतोष सरोदे, प्रियंका हांडे, केतन साळवी आणि स्नोहल शिदम यांनी ‘वीर दौडले सातच’मध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. समीहन यांनी या नाटकाला स्वरसाज चढवला आहे. प्रकाशयोजना अमोघ फडके यांची असून नेपथ्य अजय पुजारे यांचं आहे. वेभभूषा महेश शेरला यांची असून रंगभूषा उदय तांगडी यांची आहे. सचिन गजमल नृत्यदिग्दर्शन करणार असून नितीन नाईक या नाटकाचे सूत्रधार आहेत.