योगिनी चौक यांचं ‘स्वगत’ : भाग दोन
‘मी आत्तापर्यंत केवळ शरीर संबंधातूनच आपण त्या परमोच्च आनंदापर्यंत पोहचू शकतो असं ऐकलं होतं पण आज निसर्गाने मला जो परमोच्च आनंदाचा क्षण दिला ते शब्दात कसं मांडू…?’
योगिनी चौक यांचं दुस-या भागात अंतर्मुख करणारं ‘स्वगत’…
माझा निर्णय झाला वर्कशॉप अटेंड करायचा. अश्विनीला कळवलं, मी येतेय. तेव्हा तिने सांगितलं, ‘तुझा अजेंडा पाठव.’ अजेंडा म्हणजे कार्यावली. तुला तुझ्यात काय बदल घडून येण्याची अपेक्षा आहे, तू वर्कशॉपला का येते आहेस हे थोडक्यात लिही. ‘मला योगिनीला भेटायचंय’ असं सहज मी बोलून गेले….पण त्या सहज बोललेल्यावर इतक्या गंभीररीत्या काम होईल याची कल्पनाच केली नव्हती.
१२ एप्रिल २०१४. मी ५ दिवसीय निवासी कार्यशाळेसाठी सकाळी पनवेलजवळील ‘शांतीवन’ येथे पोहचले. मला जरा पोहचायला उशिरच झाला होता. मंजुल भारद्वाज सर आणि अश्विनी पुढे निघून गेले होते, मला पिक अप करायला सायली पावसकर थांबली होती. रिक्षा शांतिवनाच्या कैंटीनजवळ उभी केली. समोर मंजुल भारद्वाज सर आणि अश्विनी नाश्ता करत बसलेले दिसले. इतक्यात रिक्षावाल्याने ओळखलं, ‘तुम्ही सीरियलमधे काम करता नं… इकडं शूटिंग आहे का?’ आता त्याला काय सांगू, ‘मी इथं मलाच ‘शूट’ करायला आलेय..’
मला उशीर झाला होता… धावत जाऊन सरांना भेटले, हेल्लो सर, ‘हुम्म… २० मिनिट्स लेट हो, सगळ्यात आधी तर तू क्लिअर हो, की हां तुझ्या शूटिंगचा सेट नाही आणि इथे तुला कुणी शॉट रेडी असं सांगायलाही येणार नाही. सो बी प्रिपेअर’
बापरे!! आल्या आल्या माझं असं ‘जंगी स्वागत’ झालं. विषय बदलावा म्हणून मी म्हंटलं, ‘आपल्या मुंबईत इतकी शांत आणि हिरविगार जागा आहे हे माहितच नव्हतं…’ ‘अगं ती जागा तुझ्यातही आहे हे तरी तुला माहीत होतं का…?’ बापरे… पुन्हा एकदा मंजुळवाणी झाली.
मग म्हंटलं, जाउ दे, आपण खाऊन घ्यावं म्हणून नाश्टयाच्या प्लेटची वाट बघत बसले तर पुन्हा मंजुळ आवाज आला, ‘इथे तुला कोणी काही आणून देणार नाही. हेल्प युवरसेल्फ..’ उठले. डिश घेतली. चुपचाप नाश्ता करायला बसले. मला कळेचना, हां माणूस मी आल्यापासून माझ्याशी असं का बोलतोय… आजुबाजुला पाहिलं तर सर, आशु (अश्विनी नांदेडकर), सायली आणि अली असे ४ जण सोडले तर माझ्याव्यतिरिक्त तिथे नवीन असं कुणीच दिसत नव्हतं. आता वर्कशॉप म्हंटलं की साधारण २५-३० जणांचा ग्रुप असेल असं काहिसं मी इम्याजीन केलं होतं… इथे मोजून ५ जण बघून मी हळूच आशुला विचारलं, ‘आपण एवढेच…? बाकी कुठेयेत…?’ ‘तू इथे स्वतःसाठी आलीएस की इतरांसाठी? लोकांना शोधायचंय की तुला… हे ठरंव आधी…’ पुन्हा मंजुळ बॉम्ब!!
झालं… मी बोल्ले की दणादण वार होत होते… इथे आल्याच्या ५व्या मिनिटाला मी रडत होते. सरांनीही मला रडू दिलं… माझं अवसानच गळून पड़त होतं जणु त्या अश्रुतूंन… हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की आपलं पोस्टमॉर्टम होतंय. सरांनी माझ्या बोलण्यात येणारा नकारात्मक भाव ‘पण, पाहिजे, बघेन, करेन’ हे शब्द टॉन्ट करायला सुरवात केली आणि माझं लक्ष सतत त्या शब्दांकडे वळवण्यात आलं. ‘मी हे केलं पाहिजे’ ऐवजी ‘मी हे करायला हवं.’ किंवा ‘नाटक चालू होतं’ ऐवजी ‘नाटक सुरु होतं’, ‘नाटक बसवलं’पेक्षा ‘ नाटक उभं केलं’ या शब्दांचा वापर अधिक सकारात्मकता देतो…. माझ्या लक्षात आलं की माझ्या बोलण्यात सतत नकार येतोय आणि त्यावर काम सुरु झालंय. मग सुरु झाला तास.
शांतिवनाच्या त्या जंगलात आम्ही एकत्र बसलो. आजूबाजुला झाडे झुडुपे, पक्ष्यांचा मधुर किलकिलाट, मोकळी जागा, मोकळी हवा अशा मोकळ्या वातावरणात हळूहळू स्वत:ला उलगडू लागलो… इतक्यात, सरांनी लिहिलेल्या ‘मैं औरत हूँ’ नाटकाचं स्क्रिप्ट माझ्या हतावर टेकवत सरांनी विचारलं, ‘हे किती वेळात परफॉर्म करशील?’ पुन्हा एक बॉम्ब!! बरं आधी वाच… ते क्लिष्ट हिंदी वाचून सुरवातीला तर मला काहीही कळलं नाही आणि आता ते परफॉर्म करणं… मला टेंशनच आलं. ‘नाही सर, मला नाही जमणार’ हां घोष सुरुच होता. समजून घ्यायचा प्रयत्न केला, तरी ते समजत नव्हतं. आता तर हे लिहितानाही हसू येतय….
इथे मला नमूद करावंसं वाटतं की, आपल्याला केवळ मराठी भाषेतून कामं करत असताना हिंदी किंवा इतर भाषांचं केवळं बर्डन वाढतं म्हणून इतर भाषिक कामं नाकारणारे कलाकार आहेत. पण मग वैश्विक अनुभव कसा घेणार? कलाकार म्हणून आपण समृद्ध कसे होणार? आपण स्वतःवर काम करायला टाळाटाळ का करतो? सरांना यांतून मी सेल्फ डिपेंडेंट होणं अपेक्षित होतं. दिग्दर्शक सांगेल तो आणि तोच अर्थ अंतिम असं आपण ऐक्टर्स मानून चालतो. इथे आल्यावर, ‘या स्क्रिप्टचा तुला जो आणि जसा अर्थ लावायचा तो लाव आणि परफॉर्म कर’ ही मोकळीक होती, संधी होती. पण तेव्हा ती समजली नाही. सरांनी मला त्या विचित्र स्क्रिप्टसोबत एकटीलाच सोडून दिलं…
माझा तिच्याशी काही ताळमेळच जुळत नव्हता. खुप झगडून पाठांतरास सुरवात केली तर पुढचं पाठ मागचं सरसपाट होई कारण त्या शब्दांमागचा गर्भितार्थ समजत नव्हता आणि तो समजाउन सांगणा-याची गरज भासत होती. अश्विनीने हिंट दिली की नुसतं बसून वाचू नको. फ्लोअरवर उतर… परफॉर्म करता करताच शिकशील आणि वाक्यही लक्षात राहतील.
चहां प्यायला भेटलो तेव्हा सरांना डोकं धरून सांगितलं. सर वाट लागलिये, नाही होतेय. तेव्हा सरांनी इतकं सुंदर समजावलं की, जेव्हा कुठलीही स्क्रिप्ट तुमच्याकडे येते तेव्हा तुम्हाला एक्साईटमेंट होते कि बर्डन येतं. विचार कर… एक्साईटमेंट असेल तर मेहनत कर आणि तिची दिशा ठरंव आणि बर्डन येत असेल तर… तुम शो ऑफ़ कर रहे हो, तुम्हे सिर्फ दिखावे मेँ इन्ट्रेस्ट है, मेहनत नही करनी. खोज नही रही हो तुम… मला अक्षरशः थोबाडित मारल्यासारखं झालं.
खरंच मी शो ऑफ़लाच महत्व देत होते. मला आवडतं कुणी माझं कौतुक केलेलं.. आम्ही तुम्हाला सीरियलमधे पाहतो, छान काम करता… असं ऐकायला आवडतं. पण म्हणजे लोकं ठरवणार का, मी चांगली अभिनेत्री आहे? आणि लोकं बोलली म्हणून मी चांगली अभिनेत्री होते का? चांगली अभिनेत्री होण्याचे मापदंड काय? मला एक संवेदनशील अभिनेत्री व्हायचंय… किती दिवस खोटी जगू? सुप्तावस्थेत एक जाणीव होती की, मी वागतेयं ते खोटय. त्यात प्यूरिटी नाही. कळत असूनही वळत नव्हतं, सरांच्या बोलण्याने डोळे खाड़कन उघडले. जब आपको कोई रोल मिलता है प्रिपेअर होने के लिए तब आप क्या करते हो…?
स्क्रिप्ट वाचणे,
अर्थ समजून घेणे,
मुद्दे लक्षात घेणे,
फील करणे,
स्वताःला व्यक्त करणे
परफोर्म करणे. या पाय-यांमधे मी कुठेय? पुस्तकी वाटतात हे पॉइंट्स. मीच लिहिलेल्या वरील मुद्द्यांत मी पाचव्या पायरीवर आहे.
आनंद कुठेय?
मला स्क्रिप्ट मिळाली
मला काम मिळालं
मला चॅलेंज मिळालं याचा आनंद…. ऐक्टिंग करनेके लिये टेन्शन आता है तो आप ऐक्टर मत बनिए. ते आव्हान म्हणून स्वीकारा. आनंदी राहा आणि पुढे चला. हे मी शिकले. आप खुद ही जीवित नही हो तो ऐक्टर में कहाँ जान आएगी…और कैरेक्टर तो दूर की बात है. मला मोकळं जगायचंय, मोकळं हसायचंय, जगणं शिकायचंय आणि म्हणून मी इकडे आहे. ‘थिएटर ऑफ रिलेवन्स’ पुन्हा रडून मोकळी झाले आणि तड़क स्क्रिप्टवर काम करायला लागले.
सरांनी मला सगळ्यांच्या डोळ्यांत पाहायला सांगत सगळ्यांशी कनेक्ट व्हायला सांगून एक्शन ला रीएक्शन या तत्वानुसार सगळ्यांना कनेक्ट, इन्वोल करून घे सांगितलं. तुम्ही एक्झिट घेतल्यानंतरही लोकांनी तुम्ही परत कधी येता अशी वाट पाहायला हवी… तो एक्टर किंवा परफार्मर. सेल्सगर्ल जीला सगळ्यांमधे मीच उठून दिसावं असं वाटतं…. काही ऐक्टर्स नाटकातही हेच करतात. इथे केवळ “तो” किंवा “ती” दिसतो/दिसते. पण नाटक मरतं… तुम्ही ठरवायचं तुम्हाला नेमकं काय व्हायचं.
त्यानंतर एक महत्वाची गोष्ट घडली जी इथे नमूद करायलाच हवी. संध्याकाळी आम्ही दूरवर शेतात फिरायला निघालो. मी केवळ सरांना follow करत होते. सरांनी आम्हा चौघांना त्या भेगाळलेल्या जमिनीवर झोपायला सांगितले. मला त्या मातीवर झोपणं विचित्र वाटत होतं पण हा अनुभव वेगळा होता. आम्ही सांगितल्याप्रमाणे झोपलो आणि आकाशातील चंद्र पाहू लागलो. सरांनी त्या चंद्राशी गप्पा मारा असं सांगितलं.
मी त्या नीरव शांततेत, त्या चंद्राच्या शीतलतेत न्हाउन निघत होते. तो थंड, मंद प्रकाश अंगावर घेत, त्याच्याकडे बघत, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते. त्याचा माझ्याकडे येणारा शीतल प्रकाश मला आशीर्वाद देतोय असं भासलं आणि माझ्या स्वर्गीय बाबांची आठवण आली. आज ते असते तर…. तुझी शीतलता आणि शांतता मला मिळू दे. मला न्हाउन निघायचंय, मोकळं व्हायचंय मला पदरात घे!! मग डोळे मिटून चंद्राला डोळ्यांत सामावून घेत हमिंग सुरु केलं. पुन्हा ती शांतता अनुभवली. मन शांत शांत होत होतं आणि आनंदी वाटू लागलं होतं.
सरांनी, काय वाटलं, असं विचारलं, तेव्हा चंद्राचा प्रकाश चेह-यावर घेत, त्याच्याकडे बघत, मी काय बोल्ले मला ठाऊक नाही, पण मी पूर्णतः कनेक्ट झाले होते. माझ्या आजूबाजूचा परिसर, माणसे या सगळ्याचा विसर पडला होता आणि तिथे फक्त मी आणि चंद्र असे आम्ही दोघेच उरलो होतो. अत्तुच्च आनंद डोळ्यांतून घळघळ ओसंडत होता. मी खरंच न्हाऊन निघत होते. माझं “मी”पण गळून पडलं आणि मी कधी चंद्राशी एकरूप झाले मला कळलंही नाही.
एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव होता तो…. मी आत्तापर्यंत केवळ शरीर संबंधातूनच आपण त्या परमोच्च आनंदापर्यंत पोहचू शकतो असं ऐकलं होतं पण आज निसर्गाने मला जो परमोच्च आनंदाचा क्षण दिला तो शब्दात कसं मांडू…? आज मी भरून पावलेय. घेतलीय एनर्जी निसर्गाकडून. प्यूअरिटी आणखीन काय असते…. आता ती टिकवून ठेवणं महत्वाचं, ते जमायला साधना हवी!! सरांना मीठी मारुन हमसाहमशी रडले…. शांत झाले. समृद्ध झाले.
क्रमशः
पहिल्या भागात लिहिलेले “अंतर्मुख करणारे वळणदार स्वगत” ज्यांनी वाचले नसेल त्यांना पुढील लिंकवर क्लिक करून वाचता येईल…
https://www.rangmaitra.com/index.php/2014-11-18-10-41-09/item/455-swagat01-yogini-chouk