मानसशास्त्रीय पद्धतीने घेतलेला नाट्यमय परामर्श
निर्मोही क्रिएशंस प्रस्तुत, माणूस लिखित, पंकज मिठभाकरे दिग्दर्शित ‘कवडसा’ हे प्रायोगिक नाटक लवकरच रंगभुमीवर येणार आहे. माधुरी जोशी, प्रवीण चौगुले, किशोरी पाठक, प्रसाद कुलकर्णी आणि अमोल पाठक अभिनित या नाटकाला दिग्दर्शकाने मानसशास्त्रीय ट्रीटमेंट देऊन विषयानुरूप झालर लावली आहे.
संशयग्रस्तता हा मानसिक आजार सध्या मोठया प्रमाणात दिसतो, ज्याला स्किझोफेनिया म्हणतात. परक्या, लांबच्या माणसांच्या बाबतीत संशय पिशाच्च मानगुटीवर बसलं तर जोर लावून काढता येतं, आपल्या जवळच्या माणसांविषयी संशय मनात फेर धरायला लागला की मग जे होतं ते आपल्याला कवडसा या नाटकात बघायला मिळेल.
संशयग्रस्तता मुख्यतः प्रेमीजनात मोठया प्रमाणावर दिसून येते. सर्वात जवळचं सगळं भावविश्व व्यापलेल्या नात्यात किंचितसा सुद्धा दुरावा मनाला सहन होत नाही. आमचं दोघांच जे घट्ट भावविश्व आहे ते फक्त दोघांचच आहे, होतं आणि राहील असा विश्वास प्रेमीजनाच्या मनात निर्माण होतो. दोन घट्ट मैत्रीणींमध्येदेखील एक मैत्रीण जरा इतर मुलींमध्ये मिसळायला लागली की दुस-या मैत्रिणीला त्रास होतो. जेव्हा आणखी कुणाबरोबर तरी असाच एकजिन्सीपणा पार्टनरने अनुभवलाय किंवा अनुभवतोय हे कळतं तेव्हा मग संशयाला सुरुवात होते. संशयावर मात करण्यासाठी त्यातून बाहेर पडण्यासाठी नेहमीच समोरच्या माणसांच प्रेम अनुभवता यावं लागतं. अगदी संशयग्रस्त छिन्नमनस्क (Paronoid Scizophrenic) रुग्णसुद्धा ज्या माणसावर संशय घेत असतो त्या माणसाचं प्रेम अनुभवतो. मानसिक आजारी माणसाला स्वत:ला होणारा भावनिक त्रास, भासमय जग आणि वास्तविकता यात चाललेला संघर्ष आणि आपल्या माणसाचं जाणवणांर प्रेम हे आलटून पालटून जाणवत राहतं.
नाटक बघत असताना प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी साधर्म्य जाणवेल, ते तसं जाणवावं.. प्रेक्षकांनी हे नाटक बघताच स्वतःकडे बघावं असा लेखक- दिग्दर्शक पंकज मिठभाकरे यांचा मतोद्यय आहे. नाटकाचा पडदा पडेल तेव्हा रंगमंचावरचं नाटक संपेल, प्रेक्षकांनी या नाटकातून स्वतःकडे, आपल्या मानसिक प्रश्नांकडे आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या प्रवासाकडे जाणीवपूर्वक पहावे हाच नाटकाचा मुख्य उद्देश आहे.
नेपथ्य- प्रवीण चौगुले, प्रकाशयोजना- संतोष लोखंडे, संगीत- निखिल लांजेकर, वेशभूषा- मेघना मिठभाकरे, रंगभूषा- पंकजा पेशवे यांचे आहे.
‘२१ व्या शतकाच्या सुरुवातीपासून जनमानसात, समाजात, घरा-घ्ररांत तसे प्रश्न कमी होते, जसेजसे तंत्र आणखी प्रगत होवू लागले तसेतसे प्रश्न निर्माण होवून प्रश्नांचा आकारही वाढू लागला..प्रश्नाला प्रश्न येऊ लागले. अर्थात मी सगळा दोष तंत्राला नाही देत, परंतु ते (तंत्र) मानसिक द्वंद्वात भर नक्कीच घालते यावर मी ठाम आहे. गेल्या काही वर्षात लोकांमध्ये सोशल साईटस वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मैत्रीच्या नात्याने साता समुद्रापलिकडे देखील ठाण मांडले आहे. अशात घनिष्ट नात्यांमध्ये संशय वाढू लागले आहेत. स्त्री-पुरुषांमध्ये (नर-मादी) संशयाने वितुष्ट वाढू लागले आहे. आजुबाजुच्या वातावरणाला संशय विकृतीमध्ये अडकलेल्या अनेक लोकांना अनुभवले, जाणले, संशय विकृतीमध्ये अडकलेली व्यक्ती यशस्वीरित्या बाहेर पडू शकते, हे मी ‘कवडसा’च्या माध्यमातुन कागदावर उतरवले आहे. संशय विकृतीचे एक भयानक सत्य मी कवडसा या माझ्या दोन अंकी नाटकाद्वारे लिहिले आहे.‘-लेखक
‘नाट्यशास्त्राची पदवी घेतल्यानंतर मानसशास्त्राचा अभ्यास करताना मानवी मनाच्या विविध कंगोर्यानी, पैलूँनी काळजाला हात घातला. सबंध मानसशास्त्रात विविध आजारांचा अभ्यास करताना संशय विकृती या आजारामुळे हळुवार, निखळ नातेसंबंधामध्ये कशा कशा प्रकारे वितुष्ट येउन मानसिकरित्या माणूस किती विकोपाला जातो, त्यातून नाती संपुष्टात येतात हे जाणले. जनमानसात, समाजात संशय विकृतीमुळे कित्येक संसार, नाती वेशीवर टांगली जातात, हे कुठेतरी थांबायला हवे. या कल्पनेतून कवडसा नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. संशय विकृतीमधून माणूस बाहेर पडू शकतो. हे मला ठामपणे मांडायचे होते. तसेच नाटक या माध्यमातुन एक वेगळा विषय सोप्या आणि मनोरंजनात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवणे हा माझा दिग्दर्शकीय हेतू…‘ -दिग्दर्शक