सध्याच्या घडामोडीचा आढावा घेणारं नवं नाटक
शुभानन आर्टस निर्मित व प्रवीण शांताराम लिखित सस्पेन्स थ्रिलर विनोदी नाटक “कट टू कट” लवकरच रंगभूमीवर येत आहे. सध्याच्या घडामोडीचा विनोदी कथानकातून आढावा घेणार्या या नाटकात मनोरंजनाचे फुल पॅकेज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या नाटकाचे दिग्दर्शन प्रभाकर मोरे यांनी केले आहे.
‘आमच्या घरात’, ‘येवा कोकण आपलाच असा’, ‘अभिमन्यु’ आणि सध्या रंगभूमीवर सुरू असलेले ‘टॉस’ या नाटकानंतर लेखक प्रवीण शांताराम यांनी आगळ्या वेगळ्या विषयावरील हे नाटक लिहिले असून गेली २० वर्ष अविरतपणे अभिनय क्षेत्रात आपले वर्चस्व गाजविणारे प्रभाकर मोरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. प्रभाकर मोरे यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’पासून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी ‘आम्ही पाचपुते’, ‘घासरे रामा’, ‘करून गेलो गाव’ अशा अनेक नाटकातून त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखवलं आहे. त्याचप्रमाणे झी टीव्हीवरील ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, कलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’, ‘बुधवारची जत्रा’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या मालिकामधुनही अभिनय केला आहे. त्यांना विविध स्पर्धेतून अभिनय आणि दिग्दर्शनाची पारितोषिके मिळाली आहेत. या नाटकाचे नेपथ्य अंकुश कांबळी, प्रकाश योजना योगेश केळकर, वेशभूषा रुचिता पाटणकर व संगीत अमीर हडकर यांचे आहे.
या नाटकात दिगंबर नाईक यांची प्रमुख भूमिका आहे. पण हे नाटक मालवणी नाही तर शुद्ध मराठी आहे. दिगंबर नाईक यांनी या नाटकात एका स्त्री भूमिकेसह पाच विविध भूमिका साकारल्या आहेत. सोबत सविता हांडे, मयूर पवार, सुरेश चव्हाण, तृषाली चव्हाण, कमलाकर बागवे, हरिष मयेकर व प्रभाकर मोरे हयांच्या प्रमुख भूमिका आहेत. सविता हांडे गेली २० वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत असून ‘चौरंग’मध्ये त्या सलग पंधरा वर्ष कार्यरत होत्या. त्यांनी आतापर्यंत रंजना, लक्ष्मीकांत बेर्डे, कुलदीप पवार, सतीश तारे, चेतन दळवी अशा नावाजलेल्या कलाकारांबरोबर भूमिका केल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही हिन्दी मालिका तसेच ‘विवाह बंधन’ या मराठी मालिकेत महत्वाची भुमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे ‘नारी झाल्या भारी’, ‘रात्रीच घोटाळा झाला’, ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘सासू पाहून लग्न करा’ या नाटकातून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. ‘काळी माती’, ‘लेक माझी लाडकी’ हे त्यांचे दोन चित्रपट लवकरच येत आहेत. यातील मयूर पवार यांनी ‘दगडी चाळ’ चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. रसिकांना मनमुराद हसवून आजच्या परिस्थितीचं वास्तव दर्शन घडवणारे ‘कट टू कट’ हे नाटक प्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन करेल असा निर्माते – दिग्दर्शकांना विश्वास आहे.