दोन दिवसांपूर्वी सिनेमागृहांत प्रदर्शित झालेल्या ‘शिनमा’ या चित्रपटात कॅमेरा अधिक बोलला आणि त्यातून पाणी प्रश्नावर उपरोधिक भाष्य करून जलप्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी चित्रपटाचे निर्माते अनिल जोशी यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. मात्र या चित्रपटाला मनोरंजनाची फोडणी देण्यापेक्षा तो गंभीरपणे बोलला असता तर अधिक प्रभावशाली झाला असता.
उपरोधातून पाणीप्रबोधन!
‘शिनमा’ चित्रपटाची छायांकित नजर
**1/2
चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून चित्रपट उगिचच मनोरंजन करण्यात गुंतला आणि पाण्याच्या प्रश्नही करमणूक म्हणून मांडण्याच्या प्रयत्न केल्याने एक गंभीर विषय उगीचच मारला गेल्याचे जाणवले.
लघुपटासाठी पुरस्कारप्राप्त दिग्दर्शकाच्या खासगी आयुष्यात एक अपघात होतो. त्या अपघाताने तो पुरता कोलमडतो. पैसे मिळवण्यासाठी तो कुठलेही चित्रपट घेतो आणि त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी पाठलाग करतात. त्या अडचणी सोडवत तो एका चित्रपटाच्या शुटींगसाठी एका खेडेगावात जातो. तिथे त्याला चित्रपट पूर्ण करण्याचे वेगवेगळे आव्हाने येतात. त्यातले महत्वाचे आव्हान म्हणजे त्या गावातील पाण्याचा दुष्काळ. एकीकडे गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी पायपीट आणि दुसरीकडे चित्रपट युनिटसाठी येणा-या पाण्याची नासाडी याचा कॅमे-यातून उपरोधिकपणे विणलेला संघर्ष हाच या चित्रपटाचा श्वास आहे.
या चित्रपटातील के. वासू नावाच्या दिग्दर्शकाची महत्वाची भूमिका अजिंक्य देवने उत्तम साकारली असून किशोरी शहाणे, यतीन कार्येकर, विजय पाटकर, संस्कृती बालगुडे, गुरनील चोप्रा, आनंदा कारेकर, अंशुमन विचारे, गणेश यादव, सौरभ गोखले, अरुण कदम, अभिजित चव्हाण, दिगंबर नाईक, आशिष पवार, जयवंत वाडकर, निशा परुळेकर, राहुल बेलापूरकर यांनी त्यांना यथोचित साथ दिली आहे. एका एटम सोंगसाहती पाहुणे कलाकार म्हणून गणेश आचार्य यांनी रसिकांना ठेका धरायला लावला आहे.
काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणा-या दिग्दर्शक मिलिंद अरूण कवडे यांनी ‘शिनमा’मध्येही ही परंपरा जोपासली आहे. ‘शिनमा’ केवळ मनोरंजन नव्हे तर मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वेदांत एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारा आहे. एका गंभीर विषयावर गंभीरपणेच भाष्य करण्याची संधी होती, मात्र ती काही प्रमाणात गमावली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॅमेरामन सॅन्टोनिओ टेरेझिओ यांनी या चित्रपटाचे छायालेखन केले आहे.
निर्मिती : वेदांत एनटरटेनमेंट
निर्माते : अनिल जोशी
दिग्दर्शक : मिलिंद अरुण कवडे
कथा : मिलिंद कवडे, अशोक झगडे, प्रकाश भागवत
पटकथा : मिलिंद कवडे
संवाद : सागर वानखेडे, दीपक ठुबे
कलाकार : अजिंक्य देव, किशोरी शहाणे, यतीन कार्येकर, विजय पाटकर, संस्कृती बालगुडे, गुरनील चोप्रा, आनंदा कारेकर, अंशुमन विचारे, गणेश यादव, सौरभ गोखले, अरुण कदम, अभिजित चव्हाण, दिगंबर नाईक, आशिष पवार, जयवंत वाडकर, निशा परुळेकर, राहुल बेलापूरकर, पाहुणे कलाकार गणेश आचार्य
कॅमेरामन : सॅन्टोनिओ टेरेझिओ
गीतकार : जय अत्रे, राहुल साळवे,सागर वानखेडे
संगीतकार : वरूण लिखिते आणि रोहन रोहन
गायक : आनंद शिंदे, कविता निकम, दीपाली साठे, रोहित राऊत, मनीष राजगिरे आणि आदर्श शिंदे