आजपासून सुरु होणार राज्यस्तरीय स्पर्धा
श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट प्रायोजित अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २१ ते २४ जानेवारीदरम्यान रंगणार आहे. अंतिम फेरीत नगरच्या ४, पुणे आणि मुंबईतील प्रत्येकी ८, औरंगाबादच्या ४, नाशिक, जळगाव आणि सांगली येथील प्रत्येकी १ एकांकिका सादर होणार असून, त्यांच्यात महाकरंडक मिळवण्यासाठी चुरस होणार आहे.
यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. नगरच्या माऊली सभागृहात ही अंतिम फेरी रंगणार आहे. अंतिम फेरीचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. अंतिम फेरीदरम्यान २४ जानेवारी रोजी नाट्य-चित्रपट-टीव्ही मालिका लेखन कार्यशाळाही आयोजित करण्यात आली असून, स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसिडर भरत जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
भुलभुलैय्या, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं अशा दर्जेदार चित्रपटांच्या पटकथा लेखिका मनीषा कोरडे पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्राथमिक फेरीत आठ केंद्रांवर मिळून एकूण ८५ एकांकिका सादर करण्यात आल्या. त्यातील २७ एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, पत्रकार अमित भंडारी आणि अभिनेत्री हेमांगी कवी धुमाळ अंतिम फेरीचे परीक्षण करणार आहेत.
स्पर्धेसाठी एकूण तीन लाखांची पारितोषिके असून, सर्वोत्कृष्ट एकांकिकेला ६१ हजार १११ रुपये आणि महाकरंडक प्रदान करण्यात येणार आहे. त्यात सर्वोत्कृष्ट एकांकिकेची चार सांघिक पारितोषिके, उत्तेजनार्थ पारितोषिक, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका आणि अहमदनरमधील सर्वोत्कृष्ट एकांकिकेलाही गौरवण्यात येणार आहे. तसेच अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक, रंगभूषा-वेशभूषा, लेखनासाठी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. ‘एकांकिका स्पर्धांच्या विश्वामध्ये अहमदनगर महाकरंडक स्पर्धेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. उत्तम व्यवस्थापनामुळे दरवर्षी या स्पर्धेचा प्रतिसाद वाढतो आहे. स्पर्धकांच्या लेखन कौशल्याला दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली लेखन कार्यशाळा यंदाचे वैशिष्ट्य आहे,’ अशी माहिती आयोजक नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.