रोजमर्रा जिंदगीतील रूटीन जगण्याचे तुकडे
नुकतेच रंगमंचावर आलेले ‘अगदीच शून्य’ या नाटकाच्या प्रयोगावर रंगचिंतक, प्रयोगशील दिग्दर्शकगिरीश पतके यांनी केलेले भाष्य…
दिनांक २ एप्रिल रोजी अचानक वांद्र्यातल्या कुकुज क्लब या ठिकाणी झालेल्या अगदीच शून्य या नाटकाच्या प्रयोगाला जाण्याचा योग आला. त्याबद्दल…
एक शून्य नगर….त्यातील एक शून्य बार…आता फोटोत गेलेले आणि स्टेजवर न येणारे (नाट्य) गुरूजी, त्यांनी दीक्षा दिलेले दोन शिष्य, १. शून्यपंत २. शून्यराव त्यांच्याखेरीज बील न मिळता टीप मिळणारा वेटर, आणि त्या वेटरकडूनच केली जाणारी इतर काही पात्रे…
नाटकातील हे दोन शून्य आणि प्रत्यक्ष रंगमंचावर न येता, सातत्याने त्याचा दबाब वा वावर जाणवत राहतो असा कुणी एक वा (अनेक) यांच्यातील सुप्त, उघड असा रागलोभाचा संघर्ष… हे या नाटकाचे थोडक्यात कथाबीज सांगता येईल.
अशा या दोन शून्यांपैकी एकाचा म्हणजे ”शून्यरावां”चा ‘एक’ होण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रवासातील पंत आणि रावांमधील संवाद, राग, लोभ, असूया, यांच्यामुळे दोघांवर आणि त्यांच्या जाणिवेच्या नाटकावर होणारा परिणाम, रावांची ‘एक’मध्ये सामील होण्याची इच्छा, लालसा परंतु तेथे पूर्णपणे प्रवेश न मिळणे, त्या कळपातही त्याचे शून्यच असणे इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी येथे येत राहतात…त्यातले गुंते, द्वंद्वात्मक पेच पडत जातात. गतानुगतीक रावांचा अपरिहार्य असा ठोकळबाज प्रवास तर पंतांचा नाईलाजाने होणारा सोकॉल्ड अध्यात्मिक असा एकांगी प्रवास, बाहेरच्या भवतालाचा दबाव व्यक्त करणारा वेटर वा कथानकाच्या ओघाने येणाऱ्या इतर तत्सम पात्रांचे रोजमर्रा जिंदगीतील रूटीन जगण्याचे तुकडे नाटककार युगंधर देशपांडे व्यक्त करतो.
या पात्रांना नाटक करायचे आहे किंबहुना ते नाटकच करत आहेत… त्यांच्या जाणिवेच्या नाटकात शब्द महत्त्वाचेच आहेत; परंतु नाटक शब्दबंबाळ होणार नाही याची काळजी आहे, पण उगीचच्या दाखवेगिरीला मात्र त्यांचा विरोध आहे. नाटकावर, त्यातील प्रश्नांवर तर ते बोलतातच परंतु ते केवळ नाटकावर बोलत आहेत का, तर नाही… तर ते नशेत “जग बोलतात” आणि मुख्य म्हणजे युद्ध, संघर्ष, हिंसा, स्पर्धा, जागतिकीकरण, आजूबाजूचे भवताल यात आपण बदल आणि सुधारणा करू शकणार नाही याची जवळपास खात्री असलेली ही पात्रे फक्त बोलतात… आणि एकंदरीतच केवळ बोलघेवडेपणातून, नशेतून त्यांचे वांझ रितेपण व्यक्त करतात.
हे नाटक केवळ शून्यपंत वा शून्यरावांचे नाही. आजच्या काळात ज्यांना समाधानासाठी, आत्मशोधासाठी नाटक करायचे आहे, पण असे नाटक पोटाला दोन वेळा अन्न देऊ शकत नाही त्यामुळे पोटाला जगवण्यासाठी इतर काही उद्योगधंदा, नोकरी तर करणे क्रमप्राप्त आहे, पण मग नोकरी, पैसा, सत्ता यांच्या मोहात पडून त्यातच गुरफटले तर मग आपल्या नाटकाचे काय होणार हा प्रश्न सतावणार, त्याचा मानसिक त्रास होणार, एकतर तो प्रश्न टाळायचा नाहीतर आपण आपल्या मनासारखेच जगतोय अशा भासाच्या नशेत वांझोटेपणाने जग बोलत राहायचे. अशा “जग बोलणाऱ्या” सर्वांचे हे नाटक आहे. त्यामुळेच हे शून्यपण अत्यंत भयावह आहे.
युगंधरचे मी पाहिलेले हे दुसरे नाटक आहे. याआधी त्याचे ‘अस्वस्थ समुद्रावर बैल मेलाय’ हे नाटक पाहिले तेव्हा एक आश्वासक नाटककार येऊ घातल्याची जाणीव झाली होती. त्याला काही महत्त्वाचे मांडायचे आहे परंतु साचेबद्ध नाट्यरचना त्याला भावत नाही. तो त्याच्या पद्धतीने काळ व अवकाशाची मांडणी करू इच्छितो आणि हे मला महत्त्वाचे वाटते.
परंतु त्याने नाटकाच्या आशयसूत्रांकडे नीट लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे वाटते. विचार सुचला आणि तो कागदावर उतरवून काढला असे चालत नाही तर तो आधी नाटककाराच्या मनात खोलवर मुरावा लागतो. सुचलेल्या विषयाच्या प्रेमात न पडता त्याचा खोलवर वेध घेण्याची निकड असते. त्यावर त्याचे त्याचे म्हणून काही एक चिंतन होण्याची गरज असते. इथे युगंधर थोडा कमी पडतो असे वाटते.
त्याची दोन्ही नाटके चांगली आहेत परंतु खोलवर जाणारी होत नाहीत. अगदीच शून्य या नाटकात मला काही उणिवा जाणवल्या त्या थोडक्यात सांगतो.
शून्य म्हणजे नेमके काय…कशाच्या तुलनेत कोण शून्य ठरते… खरंच ते शून्य असते की काळाच्या ओघात ते त्याचे गुणात्मक मूल्य तसे ठरत जाते… तो प्रवास नेमका कसा आणि कोणता असतो… शून्य आणि शून्येतर यात फरक नेमका कोणता असतो.. नाटकांमध्ये हा शून्य पकडता येतो का… नाटकांची प्रतवारी करताना असा तुलनात्मक विचार करता येत असेल तर ते लेखनात का उतरत नाही ? या दोन्ही शून्यांना अभिप्रेत असलेल्या नाटकाची महती काय आहे, कुणीतरी त्यांचा नाटकातील परफ्युम नेला आहे आणि तो त्यांना परत मिळवायचा आहे. तो परफ्युम म्हणजे नाटकाची महत्ता आहे परंतु त्याबद्दल फारसे बोलले जात नाही…असो.
या मला जाणवलेल्या काही उणिवा सांगण्याचे एकमेव कारण एवढेच युगंधरच्या लिहित्या हाताला खोलीही प्राप्त व्हावी. या उणिवा मला वाटलेल्या… इतरांना त्या तशा वाटतीलच असेही नाही.
या नाटकातील भूमिकांमध्ये नटाला मोह होईल असे फारसे काहीही बाह्यांगी जाणवणार नाही परंतु त्या त्या पात्राची नस ओळखून त्याच्या मनातील सर्व सुप्त भावनांचे कंगोरे, त्यातील नाट्याचे अगदी नजाकतीने सादरीकरण करत अक्षय शिम्पी, अमोल कुलकर्णी आणि ऋतुराज फडके या तिन्ही कलाकारांनी अत्यंत जाणकारीने त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांचे सोने केले आहे. ते काम करत आहेत असे वाटतच नव्हते. लेखक-दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेल्या शब्दातील, मोकळ्या जागांतील अर्थांचा त्यांनी सखोलपणे विचार केला होता आणि तो त्यांच्या सादरीकरणात जगण्याचाच भाग झाला होता. कोणत्याही मोहात न अडकता या नाटकाचे प्रयोग हे कलाकार करत राहतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
नाटककाराला अभिप्रेत असलेले नाट्य आणि कदाचित त्याच्या जाणिवेतही नसलेले काही नाट्यक्षण रवींद्र लाखे यांनी अचूकपणे हेरून नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. तांत्रिक अंगांचा बडेजाव न माजवता तसेच उगीचच नाट्याच्या मागे न लागता अतिशय नेमकेपणाने दिग्दर्शन करायचे म्हणजे कसे याचा ‘ अगदीच शून्य ‘ हा वस्तूपाठ आहे.
वस्तूपाठ एवढ्यासाठीच की, आता नाटक करणे ही खर्चिक गोष्ट झाली आहे, मोठ्या रंगमंचावर प्रयोग करायचा झाला तर त्यासाठी लागणारे पैसे आणि तिकिटविक्रीतून मिळणारे उत्पन्न यांचे प्रमाण कित्येक पटीत व्यस्त असते. त्यामुळे त्याच्या नादी न लागता अगदी थोडक्या साधनांसहित, कोणत्याही उपलब्ध जागेत नाटक सादर करत राहणे ही काळाची अत्यंत निकडीची गरज बनली आहे. हे पहिल्यादाच घडलेले नसले तरी आता त्याचे प्रमाण वाढण्याची मात्र गरज आहे.
काही एक महत्त्वाचे सांगू पाहणारी संहिता, दोन खूर्च्या, एक ठोकळा,..काही जुजबी प्रॉपर्टीज… चांगले प्रामाणिक नट… आणि हो…त्या सर्वांना योग्य दिशा देणारा दिग्दर्शक…बास …इतके असले की एक चांगले नाटक जन्माला येते.
एक उत्तम नाट्यानुभव दिल्याबद्दल अस्तित्व, मिती-चार,कल्याण यांचे मनापासून आभार आणि पुढील प्रयोगांसाठी मनापासून शुभेच्छा!
-गिरीश पतके