प्रभावीपणे सामाजिक, राजकीय भाष्य करणार
फॅशन ही काळानुरूप बदलत असली तरी रंगीबेरंगी कपड्यांच्या या फॅशनेबल जगतात गणवेशाचं एक वेगळं महत्व आहे. एकजूट तसंच एकतेचं प्रतिक असलेल्या गणवेशावर आधारित असलेला ‘गणवेश’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून, हा चित्रपट गणवेशच्या निमित्ताने हा चित्रपट प्रभावीपणे सामाजिक, राजकीय भाष्य करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
‘ईरॉस इंटरनॅशनलची प्रस्तुती’ आणि ‘विजयते एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेल्या’गणवेश’चा टीझर आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच फेमस स्टुडियो येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि मान्यवर उपस्थितीत होते. दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे, जयंत सावरकर, बाळकृष्ण शिंदे, अरुण गीते, अशोक पावडे, प्रफुल कांबळी, विजया पालव आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत आजवर कॅमेरामन म्हणून काम पाहणाऱ्या अतुल जगदाळे यांचा दिग्दर्शक म्हणून ‘गणवेश’ हा जरी पहिला चित्रपट असला तरी लेखनापासून ते सादरीकरणपर्यंत सर्वच पातळीवर त्यांनी मेहनत घेतली आहे.
‘गणवेश’बाबत बोलताना ते म्हणाले, ‘आजवर रुपेरी पडद्यावर कधीही न आलेला विषय ‘गणवेश’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. गणवेशबाबत प्रत्येकाच्या मनात आपुलकीच्या भावनेसोबतच अनेक आठवणी दडलेल्या असतात. या आठवणींना या चित्रपटाच्या निमित्ताने उजाळा मिळेलच. त्यासोबतच एका अर्थपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून गणवेशचं आजवर कधीही समोर न आलेलं रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर याची कल्पना येते. चित्रपटाच्या विषयाला अनुसरून ‘गणवेश’चा ट्रेलर तयार करण्यात आला असून तो प्रेक्षकांना चित्रपट पहाण्यासाठी प्रोत्साहित करेल याबाबत शंका नाही. ‘गणवेश’च्या माध्यमातून एक दर्जेदार कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा प्रयत्न आमच्या टिमने केला आहे.’
तेजस घाटगे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. मराठीतील आघाडीचे गीतकार अशी ख्याती असलेल्या गीतकार गुरू ठाकूर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, संगीतकार निहार शेंबेकर यांनी या गीतांना स्वरसाज चढविण्याचं काम केलं आहे. उर्मिला धनगर, तसंच नंदेश उमप या मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात संगीतप्रेमींना या चित्रपटातील गीतरचना ऐकायला मिळणार आहेत. मंगेश धाकडे यांचं पार्श्वसंगीत लाभलेल्या या चित्रपटासाठी ज्ञानदेव इंदुलकर यांनी कलादिग्दर्शन केलं आहे.
साऊंड डिझायनिंगची जबाबदारी मनीष यांनी सांभाळली असून,रंगभूषा ललित कुलकर्णी, तसंच वेशभूषा स्मिता कोळी यांनी केली आहे. राजेश राव यांनी या चित्रपटातील दृश्यांचं संकलन केलं आहे. हरपाल सिंग आणि रवी कुमार यांनी या चित्रपटातील अॅक्शन तर कार्थिक पाल यांनी नृत्य दिग्दर्शनाचं काम केलं आहे. रवी उंडाळेया चित्रपटाचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम पाहिलं असून राजेंद्र विश्वनाथ कुलकर्णी आणि शैलेंद्र गाडेकर या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. राजू झेंडे याचित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत.