‘कित्येक नाटकं आवडतात, बरीच नाटकं खूप काळ लक्षात राहतात, काही मनात घर करतात, पण फारच क्वचित एखादं नाटक या सगळ्याच्याही पलीकडचं असतं… कारण त्यात प्रेक्षकांना अस्वस्थ करण्याची क्षमता असते. ‘CODE मंत्र’ हे अशाच काही बोटावर मोजण्याइतक्या नाटकांपैकी एक आहे! हे नाटक प्रेक्षागृहातल्या प्रत्येकाला अस्वस्थ करतं.’
खास ‘रंगमैत्र’साठी ‘CODE मंत्र’ या नाट्यप्रयोगाबद्दल प्रसिद्ध सिने-नाट्य आणि टीव्ही मालिका कलावंत, लेखिका श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केलेले मत…
‘कोड मंत्र’ची पहिली जाहिरात आली तेव्हापासूनच त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. ‘CODE मंत्र’ या शीर्षकावरून लगेच काही अंदाज बांधता येत नाही. मात्र मुक्ता बर्वे आणि दिनेश पेडणेकर ही नावे आली म्हणजे काहीतरी ‘हटके’ असणार ही खात्री असतेच. अखेर परवा प्रयोग बघण्याचा योग आला आणि तिसऱ्या घंटेनंतर कोणालाही आत प्रवेश मिळणार नाही या सूचनेपासूनच या नाटकाचं वेगळेपण दिसू लागलं.
पडदा उघडतो आणि सुरू होतो चक्क एक सिनेमा… होय सिनेमाच! आपण थेट भरदार व्यक्तिमत्वाचे कर्नल निंबाळकर यांच्या मराठा रेजिमेंटमधे दाखल होतो. तिथल्या आर्मीच्या ड्रील्स, अत्यंत कठीण ट्रेनिंग सेशन्स, काटेकोर नियम, कडक शिस्त, चपळ कमांडोज, नियम मोडल्यास त्यांना होणारी कठोर शिक्षा… सीमेवर अचानक सुरू होणारा गोळीबार, गन्स, क्रॉस फायर, हे सगळे सगळे घडते त्या सीमित रंगमंचावर…. आणि तो एक रंगमंच आहे याचाच विसर पडतो. दोन तास आपण एका निराळ्याच दुनियेत जगत असतो. सीमेवर, देशाच्या सुरक्षेसाठी तैनात मराठा रेजिमेंटचा आपणही एक भाग होऊन जातो… आणि नाटक संपल्यानंतरही आपण तिथेच असतो.
हे नाटक एका उत्तम टीमवर्कचे मूर्तीमंत उदाहरण आहे. नाटकाच्या सगळ्याच बाजू भक्कम असल्याखेरीज एवढी सुरेख निर्मिती होऊच शकत नाही. खुपदा आपल्याला एखादी कथा, सिनेमा आवडतो. त्यावर काम करायचं, त्या धर्तीवर एक नाटक करायचं, असंही फार वाटतं, पण तितक्याच तत्परतेने त्याचा पाठपुरावा केला जात नाही आणि या गोष्टी चर्चेपुरत्याच मर्यादित राहतात. मात्र गुजरातीमध्ये हे नाटक पाहिल्यावर, याचे मराठी नाटक करायचेच, हे मुक्ताने आणि दिनेश पेडणेकरांनी फक्त ठरवलेच नाही तर तेवढ्याच ताकदीने ते खरोखर मराठी प्रेक्षकांसाठी आणले. यात भरत नारायणदास ठक्कर यांचीही साथ लाभली. या तिघांचेही अभिनंदन करावे की आभार मानावे हेच कळत नाही.
अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्त्यव्यनिष्ठ कर्नल निंबाळकर (अजय पूरकर) यांना रणांगणावर बजावलेल्या कामगिरीबद्दल परमवीर चक्राने सन्मानित करण्यात येणार असते. जिवंतपणी परमवीर चक्र स्वीकारणे हा अलभ्य असा मान! कर्नल निंबाळकर हे शिस्तीपुढे कशालाही न जुमानणारे. कोणीही त्यांच्या शब्दाबाहेर जाणे त्यांना खपत नाही. कर्तव्यापुढे आणि नियामांपुढे नाती, मैत्री यांचे त्यांच्यालेखी काडीभरही महत्व नाही. अशा कर्नल निंबाळकरांच्या रेजिमेंटमधील कमांडो रवी शेलार ट्रेनिंगचा शारीरिक आणि मानसिक ताण सहन न होऊन आजारी पडतो, हेच त्यांना पचत नाही. तो आजारी पडतो. तरी त्याची बदलीची याचिका ते फेटाळून लावतात आणि मग त्याला देण्यात येतो ‘CODE मंत्र’! या Code मंत्रापायी अखेर तो आपले प्राण सोडतो. त्याची गरीब वृद्ध आई न्याय मिळवण्याच्या आशेने ती केस, मिलिटरी लॉ एक्स्पर्ट अहिल्या देशमुख (मुक्ता बर्वे) हिच्याकडे आणतात आणि मग सुरू होतो कर्तव्यतत्परता आणि नीतिमत्ता यातील एक आगळा संघर्ष… एक जबरदस्त कोर्टमार्शल!
कोड मंत्र म्हणजे काय? तो नक्की कोणी दिला? का दिला? कमांडो रवी शेलारच्या मृत्यला नक्की जवाबदार कोण? त्याचा मृत्यू आजाराने झाला, की एखादे त्याच्या मनात दडलेले रहस्य त्याने उघड करू नये म्हणून त्याचा खून केला गेला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा अहिल्याचा प्रवास SUPERB! पुरावे जमा करणे, साक्षीदार गोळा करणे हे तर आपण एरव्हीही बघतो. पण हे सगळे आर्मीच्या पार्श्वभूमीवर बघणे जास्त रोमांचक ठरते. सामान्य माणसाला न दिसणारी सैन्याची बाजू ह्यात दिसते.
स्नेहा देसाई यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलंय. विजय निकम यांनी केलेले रुपांतरपण फार छान. प्रत्येक टप्प्यावर एक नवा धक्का आपली वाट बघत असतो. कथा प्रचंड वेगाने पुढे सरकत शेवटाजवळ एक अनपेक्षित वळण घेते आणि काही कळायच्या आत नाटक संपतेही ! व्वा! ही खरी बांधणी!
मूळ गुजराती नाटकाचे दिग्दर्शक राजेश जोशी यांनीच या मराठी नाटकाचेही दिग्दर्शन केले आहे. त्यांची मेहनत प्रत्येक प्रसंगात दिसते. सेट तर उत्तम आखला आहेच पण त्याचा कोपरा न कोपरा त्यांनी फारच उत्कृष्ट पद्धतीने वापरला आहे. एकही ‘अंधार’ न करता एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात अलगद जाण्याची पद्धत तर लाजवाब! रंगमंचावर एकच जागा अनेक ठिकाणे दर्शवण्यासाठी वापरली आहे, पण त्या-त्या वेळी ते तेच ठिकाण वाटणे, हे खरे कौशल्य! स्टेजवर वापरण्यात आलेले फर्निचरपण फार रेखीव आणि त्याचा केलेला वापर तर त्याहून कल्पक!
प्रसंगांची बांधणीही उत्कृष्ट आहे. एकीकडे सैन्याच्या रेजिमेंटमधील रुक्ष, कठोर वातावरण आणि एकीकडे भावनांचा कोवळा शिरकाव.. दोन्हीचा समतोल त्यांनी अचूक सांभाळला आहे. मराठीमधील त्यांचे पदार्पण खरोखरीच दमदार झालेय.
या नाटकाचं कास्टिंगही एवढं चपखल झालं आहे की अर्धा गड तिथेच सर होतो. अभिनयातही कोणीच कोणापेक्षा कमी नाही. मुक्ता बर्वे, अजय पूरकर, अतुल महाजन, उमेश जगताप, विक्रम गायकवाड, मिलिंद अधिकारी, कौस्तुभ दिवान, स्वाती बोवलेकर या प्रमुख कलाकारांमधील एकही नाव रसिकांसाठी नवीन नाही. पण त्यांनी साकारलेल्या भूमिका निश्चितच नेहमीपेक्षा वेगळ्या आहेत. सैन्यातील प्रत्येक जण खरोखर सैन्यातलाच वाटतो आणि वकील खरोखर वकीलच! देहबोली, आवाज, चालणे, उठणे-बसणे… प्रत्येकानेच आपापल्या भूमिकेचा फार सखोल अभ्यास केला आहे. अजय पूरकर आणि मुक्ता बर्वे यांनी आपल्या वाटेला आलेल्या भूमिकांचं सोनं केलं आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी. कोर्टातले शाब्दिक रणकंदन तर मार्व्हलस!! कथेच्या केंद्रस्थानी जरी हीच दोन पात्रे असली, तरी नाटकाच्या अभिनयाच्या बाजूविषयी बोलायचे तर कोणा एकाला संपूर्ण श्रेय देताच येणार नाही. हे नाटक त्यातल्या प्रत्येकाचे आहे. बरोबरीने. अगदी मरणाऱ्या कमांडो रवी शेलारपासून ते कोर्टात फक्त वर्दी देण्यासाठी उभ्या असलेल्या कमांडोपर्यंत, अगदी प्रत्येकाचे! जवळ-जवळ ३५ जवान या नाटकात आहेत आणि त्यांनी युद्धभूमीवरील सगळे प्रसंग तंतोतंत उभे केलेत.
अभिनयासोबत हेच नेपथ्याच्या पुनर्रचनेतही महत्वाची कामगिरी बजावतात. या साऱ्यांची मेहनत नाकारून कसे चालेल? खूप दिवसांनी प्रचंड समाधान देणारं आणि खोलवर अस्वस्थ करणारं नाटक बघायला मिळालं. एक अविस्मरणीय रंगाविष्कार! दिग्दर्शन, नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना आणि अभिनय सगळ्याच बाजू उ-त्त-म आणि भारतीय सेनेप्रमाणेच भक्कम!!
हे नाटक निव्वळ नाटक नाहीये… ह्यात कितीतरी संदेश लपलेत. फक्त ते समजून घ्यावे लागतात कारण ते मोठमोठ्या पल्लेदार वाक्यात बोलून दाखवले किंवा बिंबवले जात नाहीत. तर त्यातील घटनांमधून, पात्रांमधून अलगद आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण खूप काही सोबत घेऊन जातो. आपण हसतो, दचकतो, अंगावर काटा येतो, आपण आ-वासून बघतो, डोळ्यांना पाण्याच्या धारा लागतात, पोटात गोळा येतो हे सगळं हे नाटक बघताना होतं. नाटक संपते तेव्हा मात्र आपण सुन्न होतो. तो अनुभव मनात साठवून बाहेर पडतो. म्हणूनच कदाचित ४ दिवसांनी थोडं सावरल्यावरच मी त्यावर असं थोडं फार लिहू शकतेय.
मी चवथ्या वर्गात असताना ‘जाणता राजा’ या नाटकाचा प्रयोग बघून हरखून गेले होते. त्याची भव्यता सामावून घ्यायला माझे डोळे फार लहान होते. नाटक संपल्यावर मी वडिलांजवळ हट्ट केला की मला तो राजवाडा आतून बघायचाय. बालहट्ट तो.. पूर्ण होऊ शकत नव्हताच! पण परवा हे नाटक संपल्यावर माझी तशीच अवस्था झाली… मी शांतपणे स्टेजवर गेले आणि चक्क त्या प्रत्येक दगडावरून… भिंतीवरून हात फिरवला. हे असे मी का केले, याचे स्पष्टीकरण माझ्याकडेच नाही. मी ते शोधणारही नाही.
राजेश जोशी यांच्या दमदार दिग्दर्शनाची जोड घेऊन केलेली अनामिका रसिकाची ही निर्मिती -CODE मंत्र म्हणजे एक महानाट्य आहे. ज्याची भव्यता त्याच्या आकारात आणि आवाक्यात आहे. एका परिपूर्ण नाट्यकृतीला मुकायचे नसेल तर प्रत्येकाने हे नाटक आवर्जून बघावे.
श्रेयनामावली
CODE ‘मंत्र’
निर्मिती : अनामिका रसिका; अमरदीप साईसाक्षी प्रकाशित
दिग्दर्शक : राजेश जोशी
मूळ लेखिका : स्नेहा देसाई
मराठी रुपांतर : विजय निकम
सहदिग्दर्शक : सूरज व्यास
नेपथ्य : प्रसाद वालावलकर
पार्श्वसंगीत : सचिन जिगर
प्रकाशयोजना : भौतेष व्यास
वेशभुषा : अजय अरविंदभाई खत्री
कॅडेट्स प्रशिक्षण : वॅलेन्टाईन फर्नांडिस, संदीप शर्मा
सह निर्माता : अजय कासुर्डे
निर्माते : भरत नारायणदास ठक्कर, दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे
भूमिका आणि कलाकार
अहिल्या देशमुख : मुक्ता बर्वे
कर्नल प्रतापराव निंबाळकर : अजय पुरकर
कंपनी कमांडर शशिकांत जाधव उमेश जगताप,
विश्वास राजेशिर्के : विक्रम गायकवाड
सुमित्रा शेलार : स्वाती लेफ्टनंट
विनायक थत्ते : अतुल महाजन
विक्रम शेलार : मिलींद अधिकारी
रोहन देशमुख : कौस्तुभ दिवाण
बलविंदर सिंग : अमित जांभेकर
ब्रिगेडिअर : संजय महाडिक
रवि शेलार/अवतार सिंग : फैज खान
डाॅ. गोखले : अजय कासुर्डे
कमांडो : संजय खापरे आणि कॅडेट्स सह अन्य २७
-श्वेता पेंडसे
(लेखिका प्रसिद्ध सिने-नाट्य आणि टीव्ही मालिका कलावंत आणि लेखिका आहेत.)