मुखवट्यामागील रहस्य ५ ऑगस्टला उलगडणार
‘चौर्य’ या चित्रपटाची कथा शनी शिंगणापूरवरून प्रेरित असून, ५ अॉगस्टला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अंगावर शहारे आणणार्या आणि रोमांचित करणार्या शनीशिंगणापूरमधील एका रहस्यमय घटनेवर हा सिनेमा गुंफला आहे.
नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईनच्या नीलेश नवलखा, विवेक कजारिया आणि सिनेलीला टॉकीजच्या अश्विनी पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून राजन आमले हे सहनिर्माते आहे. चित्रपटाची प्रस्तुती नवलाखा आर्ट्स व साधना सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमानाने केली आहे. याआधी शाळा, फँड्री, सिद्धांत अशा एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती नवलाखा आर्ट्स व होली बेसिल कंबाईने केली आहे.
एक असं आगळंवेगळं ठिकाण जिथे घरांना दरवाजे नाही. तिथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की, चोरी करणार्याना देव शिक्षा करतो. परंतु एक दिवस त्या मंदिरामध्ये दरोडा पडतो आणि लोकांच्या श्रद्धेला तडा पोहचतो. अंगावर शहारे आणणार्या आणि रोमांचित करणार्या या रहस्यमय घटनेतून सुरू होतो चोर आणि श्रद्धेचा शोध याविषयाभोवती चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे.
गेली अडीच वर्ष समीर आणि त्याच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेऊन हा चित्रपट तयार केला आहे. खूपच उत्तम असे संगीत मयुरेश केळकर याने दिले असून तो नक्कीच कौतुकास पात्र आहे. आजवर आम्ही निर्मित केलेल्या प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच Accessibility Format चा अभिनव प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आशय सहस्त्रबुद्धे या आमच्या मित्राने या विषयात पी. एच.डी. केली असून या चित्रपटासाठी सध्या तो यावर काम करीत आहे. आजवर हा प्रयोग बॉलिवूडमध्येदेखील झाला नसून ‘चौर्य’ चित्रपटाच्या माध्यमातून हा पहिला मान मराठीसिनेसृष्टीला मिळणार असल्याने आम्हाला याचा नक्कीच सार्थ अभिमान आहे. ह्या अभिनव प्रयोगामुळे अंध आणि कर्णबधीरांनादेखील चित्रपटचा आनंद हा सर्वसामान्य लोकांप्रमाणे घेता येईल असे निर्माते नीलेश नवलखा यांनी सांगितले.
चौर्य हा माझा पहिला चित्रपट आहे. नीलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांनी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये रस दाखविल्याने तसेच काही क्रिएटिव्ह गोष्टींच्या मार्गदर्शमुळे हा चित्रपट अधिकच रंजक झाला आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य की हा पहिलाच मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण हे राजस्थान येथील चंबळ येथे करण्यात आले आहे, असे नवोदित तरुण दिग्दर्शक समीर आशा पाटील याने सांगितले.
चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट काहीसा वेगळा आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. पोस्टर पाहिल्यावर त्यात कोणाचाच चेहरा दिसत नाही कारण त्यावर मुखवटे लावले आहेत. अतिशय रंजकपणे ह्या चित्रपटाचे कथानक गुंफण्यात आले आहे. मला असे चित्रपट करायला फार आवडतात. चित्रपटाचे चित्रीकरण हे चंबळ येथे करण्यात आले असून अशा निर्जन ठिकाणी चित्रीकरण करताना मनात भीती होती आमच्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एक वेगळाच अनुभव ह्या चित्रपटामुळे मिळाल्याचे अभिनेते मिलिंद शिंदे यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, डॉ. गणेश चंदनशिवे आणि गायिका उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजात ही चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली असून शंकरराव धामणीकर, विष्णू थोरे आणि समीर आशा पाटील यांनी या चित्रपटाची गाणी लिहिलेली आहेत चित्रपटातील तीनही गाणी ही वेगळ्या पठडीतील असून संगीत मयुरेश केळकर याचे आहे.
‘चौर्य’ चित्रपटात अभिनेते किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि आरजे श्रुती आदीं कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. श्रीशैल हिरेमठ आणि जितेंद्र पंडित यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून केतन माडीवाले याने या चित्रपटाचे संकलन केले आहे. राज ङगर यांचे कलादिग्दर्शन असून भक्ती नाईक व गणेश चंदनशिवे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. अशा या उत्कंठावर्धक “चौर्य” चित्रपटाचे मुखवट्यामागील रहस्य ५ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात उलगडणार आहे.