चतुरंगची एकांकिका स्पर्धा २५ जानेवारीला रात्रभर रंगणार !
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून रंगणा-या ‘चतुरंग’च्या प्रतिष्ठित ‘सवाई’ एकांकिका स्पर्धेतील सर्वोत्तम सात कलाकृती बघण्यासाठीच्या प्रवेशिकांचे वितरण गुरुवारी सकाळी ८.३० वाजता करण्यात आले. या प्रवेशिका मिळवण्यासाठी तरुणाईची एकच झुंबळ उडाली. प्रवेशिका मिळताच तरुणाईने जणू ‘सवाई’ जिंकल्याचाच जल्लोष केला.
सवाई एकांकिका बघण्याची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका मिळवण्यासाठी दोन दिवसापुर्विपासूनच रवींद्र नाट्यगृहाबाहेर रसिकांनी नंबर लावून ठेवला होता. त्यात आज सकाळी ७ वाजता रांगेत असणा-यांना १४५ रसिकांना कुपन्स देण्यात आले. एका व्यक्तीला चार प्रवेशिका या प्रमाणे एकूण ५८० प्रवेशिकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतरही अनेक रसिकांना तिकीट मिळाले नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लगले.
२५ जानेवारीला रात्री ८.३० पासून २६ जानेवारीच्या पहाटेपर्यंत या सात एकांकिकांची सप्तरंगी उधळण मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिरात होणार आहे. या वर्षी ‘सवाई’साठी निवडण्यात आलेल्या एकांकिकांमध्ये मुंबईच्या साठय़े महाविद्यालयाची ‘दस्तुरखुद्द’, बदलापूरच्या अनुभूतीची ‘आयुष्य एक होताना’, उल्हासनगरच्या सी.एच.एम. अक्षरची ‘मडवॉक’, औरंगाबादच्या रंगाई सांस्कृतिक परिवाराची ‘जागरण’, मुंबईच्या झेप कलामंचची ‘ई = ए.सी. स्क्वेर’, पिंपरी चिंचवडच्या अ. भा. मराठी नाटय़ परिषदेची ‘द कॉन्शन्स्’ आणि पुण्याच्या आय.एम.सी.सी.ची ‘बोर्न १’ या सात कलाकृतींचा समावेश आहे.
एकांकिका स्पर्धा म्हणजे नाटय़क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-यांसाठीची पहिली पायरी. महाराष्ट्रात अशा असंख्य एकांकिका स्पर्धा वर्षभर घेतल्या जातात. त्यातून नवे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलावंत पुढे येत आहेत. पुरस्कार पटकावत आहेत. त्याच पुरस्कारांच्या बळावर व्यावसायिक नाटकात, चित्रपट क्षेत्रात, टीव्ही मालिकांमध्ये आपली स्पेस तयार करत असतात. राज्यभरात वेगवेगळ्या स्पर्धामधून चमकलेल्या नंबरात आलेल्या एकांकिकांमधून ‘चतुरंग प्रतिष्ठान’ सर्वोत्कृष्ट सात एकांकिकांची निवड करते. त्यातूनही अव्वल एकांकिका ठरवण्यासाठी त्या सात कलाकृतीची अंतिम फेरी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या रात्री घेत असते. स्व. गणेश सोळंकीची आठवण करीत रात्रभराचे हा ‘रंगजागर’ तरुणाईच्या जल्लोषात, प्रचंड उत्साहात दरवर्षी साजरा होत असतो. यंदा देखील इस्लापूर, पुणे, रत्नागिरी, वसई, उल्हासनगर, औरंगाबाद, बदलापूर, मुंबई येथील २४ संस्थांनी नावे नोंदवून ‘सवाई’च्या प्राथमिक फेरीत सहभाग नोंदवला होता. या प्राथमिक फेरीतून जयंत सावकर, आनंद म्हसवेकर आणि गौरी केंद्रे या तीन मान्यवर परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी सात एकांकिका निवडल्या. त्या सात एकांकिकांमध्ये ‘सवाई’ कोण, याची उत्सुकता नाटय़कलावंतांसह रसिकांनाही लागली आहे.या उत्सुकतेसोबतच राज्यभरातील सर्वोत्तम सात एकांकिका बघून ‘सवाई’चे साक्षीदार होण्यासाठी ‘प्रवेशिका’ मिळण्याचीही चुरस लागलेली असते. या वर्षी या स्पर्धेच्या प्रवेशिकांचे वितरण आज २२ जानेवारीला सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू झाली आणि अवघ्या अर्ध्या तासात सर्व तिकीटा संपून दोन दिवसापूर्वीच ‘हाऊस्फुल्ल’ची पाटी लागली.
ज्यांना या स्पर्धेच्या प्रवेशिका मिळाल्या आहेत, त्यांना ‘प्रेक्षक हेही परीक्षक’ योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे. त्यासाठी प्रवेशिकाधारकांना २५ जानेवारीला पहिली एकांकिका सुरू होण्यापूर्वी (रात्री ८.१५ पूर्वी) उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशिरा येणा-यांना परीक्षणाचा हक्क बजावता येणार नाही. तसेच, तिसरी घंटा झाल्यानंतर कोणालाही नाटय़गृहात प्रवेश मिळणार नाही, असे चतुरंगने कळवले आहे.