‘नयन’च्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी फोडली हंडी
अलिबागच्या सांस्कृतिक नगरीत दृष्टीहीन मुलांनी दहीहंडी फोडली. मुंबईतील नयन फाऊंडेशनच्या या दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी चित्तथरारक थर रचून अलिबागकरांच्या डोळ्यांची पारणे फेडली.
गोकुळाष्टमीचे औचित्यसाधून चला कोकणतर्फे ‘बालगोपाल दहीहंडी उत्सव २०१६’ या सामाजिक, सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन अलिबाग येथील क्रीडाभवनात केले होते. या कार्यक्रमास शेकाप जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत नाईक, ‘चला कोकण’चे संचालक गिरीधर भदाणे आणि संचालिका लीना भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नयन फाऊंडेशन या संस्थेच्या दृष्टीहिन विद्यार्थ्यांची चित्तथरारक दहीहंडी होती. नयनच्या दॄष्टीहिन मुलाचं दहिहंडी पथक हे भारतातील पहिलं दहिहंडी पथक आहे. २० ते ३० वयोगटातील एकूण ३० दॄष्टीहिन मुलांनी ही दहीहंडी फोडली. या सोहळ्यादरम्यान अलिबागमधील विविध शाळांतील मुलांची शोभायात्रा निघाली.
शोभायात्रेमध्ये कृष्ण आणि त्याच्यासोबत असणाऱ्या बाळगोपाळांचा वेश मुलांनी परिधान केला होता. यावेळी मतिमंद मुलांसाठी असणाऱ्या शासकीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निरनिराळी वेशभूषा करुन अलिबागवासियांची मने जिंकली.
अलिबागमधील एक संस्मरणीय सोहळा असे भावपूर्ण उदगार काढत शेकापच्या जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा चित्रलेखा पाटील म्हणाल्या कि, ‘नयन फाऊंडेशनच्या मुलांनी ज्या पद्धतीने शिस्तबद्ध लयीत दहीहंडी फोडली ती खरंतर दहीहंडी सणाला नवी दृष्टी देणारी ठरो.’
‘चला कोकण’च्या संचालिका लीना भदाणे म्हणाल्या की, ‘चला कोकण’ हे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करीत आहे. आजचा महोत्सव हे त्याचं उदाहरण आहे. कोकणातील तरुणांच्या आणि लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणे हे चला कोकणचे उद्दिष्ट आहे.’