मालिकेचे दुसरे पर्व लवकरच
महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि पारंपरिक ठेवा असलेल्या, गावोगावी भरणाऱ्या, डोळे दीपवून टाकणाऱ्या यात्रांवर आधारित ‘जत्रा’ या ‘एबीपी माझा’वरील कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला छान प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरे पर्व सुरु होणार आहे.
या मालिकेचे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी महाराष्ट्रातल्या सर्व लहानमोठ्या गावांतले हे उत्सव ‘जत्रा’ या कार्यक्रमातून दाखवण्याची कल्पना ‘एबीपी माझा’चे राजीव खांडेकर आणि शेफाली साधू यांच्यासमोर मांडली. त्यांनी ती उचलूनही धरली आणि मराठी टीव्हीच्या मनोरंजन विश्वात पहिल्यांदा गावागावातल्या रंगीबेरंगी जत्रा पडद्यावर दिसू लागल्या.
‘जत्राच्या पहिल्या पर्वातल्या २६ भागांना प्रेक्षकांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला. आपल्या गावागावात होणाऱ्या या जत्रा म्हणजे लोक परंपरांचा वारसा जपणारा उत्सवच असतो. ग्रामदेवतेच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्तानं आपापल्या रुट्सच्या शोधात मराठी माणूस गावातल्या गल्ल्यांमध्ये परत आलेला दिसू लागतो. ग्रामदेवेतेच्या वार्षिक पूजा विधीच्या अनोख्या प्रथा आणि परंपरा या मालिकेमुळे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. सामाजिक आणि सांस्कृतिक एकत्रीकरणाची परंपराही या निमित्तानं घडत असते, ही गोष्टही मालिकेच्या निमित्तानं पुढे आली. जत्राच्या दुसऱ्या पर्वासाठी आम्ही अधिक तयारीनं सज्ज होत आहोत. त्यात सर्व प्रेक्षकचीही साथ हवी आहे. या सर्व जत्रांचं नियोजनबद्ध आयोजन होत असतं. पण ते त्या त्या परिसरातल्या व्यक्तींनाच माहीत असतं. त्यांची एकत्रित माहितीही कुठे उपलब्ध नसते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तेही एक काम आम्ही करत आहोत. त्यासाठीच तुम्हाला माहीत असलेल्या जत्रांविषयी कृपया कळवा, म्हणजे सर्व जत्रा अधिक नीट आणि माहितीपूर्ण अशा पद्धतीने चित्रित करता येतील.’ असं आवाहन दिग्दर्शक संतोष कोल्हे यानी केलं आहे.